Mukesh Death Anniversary: आपल्या दर्दभऱ्या जादुई आवाजाने अनेक पिढ्यांवर सूरराज्य करणारे मुकेश यांचा 27 ऑगस्ट हा स्मृतिदिन. अनुनासिक स्वर ही मुकेश यांची खरी खासीयत. विशेष म्हणजे शोमॅन राजकपूर यांचा आवाज ही मुकेश यांची ओळख. ते उत्तम गायक होतेच, त्या पलीकडे ते उत्तम मनुष्य होते. अगदी, 'सबकुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनियावालो के हम है अनाडी' या गाण्याप्रमाणे ते आजच्या व्यवहारी जगात अनाडी होते.


मोहम्मद रफी, लता मंगेशकर, किशोरकुमार आदी गायकांवर के. एल. सैगल साहेबांच्या गायकीचा खूप प्रभाव होता. त्याला मुकेश यांचाही अपवाद नव्हता. त्यामुळे सुरुवातीच्या काळातील मुकेश यांची गाणी म्हणजे सैगल यांच्या आवाजाची कॉपी म्हटली जायची. विशेष म्हणजे मुकेश यांनीही ते कधी नाकारलं नाही. मात्र, हळूहळू त्यांची स्वत:ची अशी शैली निर्माण केली.


मुकेश यांचं खरं नाव मुकेश माथूर, 22 जुलै 1923 रोजी दिल्लीत त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील इंजिनिअर होते. मुकेश यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. 100 वर्षांपूर्वीचा तो काळ लक्षात घेतला तर घरची परिस्थिती उत्तम होती, हे आपोआपच लक्षात येतं. असं असलं तरी मुकेश यांचा ओढा गाण्याकडेच होता. त्यातच के. एल. सैगल यांच्या गाण्याचा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव होता. 


सुरूवात अभिनेता म्हणून... 


पुढे मुकेश यांनी पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घेतले. मग त्यांना स्वप्न पडू लागली की, आपण सैगल साहेबांसारखं गात आहोत. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी त्यांनी मुंबईत चित्रपटसृष्टीत प्रयत्न केले. मात्र झालं वेगळंच. कारण दिसायला मुकेश खूप देखणे होते. त्यामुळे गायक व्हायला आलेल्या राजबिंड्या मुकेश यांना पहिली संधी मिळाली ते अभिनेता म्हणून. तो चित्रपट होता 'निर्दोष' आणि वर्ष होतं 1947.


पण याच चित्रपटानंतर मुकेश यांची अभिनेता म्हणून कारकीर्द संपली आणि गायक म्हणून उदयास आले. त्यांचं पहिलं गाणं होतं 'दिल जलता है तो जलने दो' आणि चित्रपटाचं नाव होतं ‘पहली नजर’ हे गाणं त्याकाळी तुफान हिट झालं. आजही हे गीत जाणकारांच्या चांगलंच लक्षात आहे. त्यावेळी हे गाणं सैगल साहेबांनी गायलंय का अशी विचारणा होत होती. इतका सैगल साहेबांच्या गायकीचा मुकेश यांच्यावर जबरदस्त पगडा होता.


वास्तविक मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्ना डे आदींप्रमाणे मुकेश यांच्या आवाजात वैविध्यता नव्हती. मात्र अनुनासिक गाणं हे त्यांचं वैशिष्ठ्य होतं आणि त्यांच्या दर्दभऱ्या आवाजाने किशोरकुमार आणि मोहम्मद रफींएवढीच लोकप्रियता मिळवली. यातचं सर्व काही आलं.


मुकेश स्वभावाने अगदी साधे होते. कुणाशी भांडण नाही की कुणाला त्रास नाही. आपण बरं आणि आपलं गाणं बरं अशा वृत्तीचे ते होते.


राज कपूरचा आवाज बनले 


मुकेश आणि राज कपूर यांचं नातं अतिशय घट्ट होतं. राजकपूर यांचं गाणं म्हणजे मुकेश यांचा आवाज हे त्याकाळी समीकरण होतं. त्यामुळे श्री 420, आवारा, अनाडी, परवरिश, जिस देश में गंगा बहती है, मेरा नाम जोकर हे आणि यासारख्या आरके फिल्मच्या बॅनरमध्ये मुकेश, लता मंगेशकर आणि संगीतकार शंकर-जयकिशन हमखास असायचे.


मुकेश यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत शेकडो गाणी गायली. राज कपूर यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम'मधील 'चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी सूरसजनी' हे त्यांचं शेवटचं गाणं. या शिवाय 'चंदनसा बदन' (सरस्वती चंद्र), 'मेरा जुता है जपानी' (श्री 420), 'सबकुछ सीखा हमने' (अनाडी), 'जाने कहा गये वो दिन' (मेरा नाम जोकर), 'सजन रे झुठ मत बोलो' (तिसरी कसम), 'जिंदगी ख्वाब हे' (जागते रहो), 'चल अकेला चल अकेला' (संबंध), 'मै ना भुलूंगा' (रोटी कपडा और मकान), 'कही करती होगी, वो मेरा इंतजार' (फिर कब मिलोगी), 'सावन का महिना पवन करे सोर' (मिलन), 'एक प्यार का नगमा हैं' (शोर), 'मेहबूब मेरे' (पथ्थर के सनम) ही आणि अशी शेकडो गाणी खूप गाजली.


राज कपूर यांचा आवाज ही मुकेश यांची ओळख असली त्याव्यक्तिरिक्त त्यांची अनेक गाणी खूप श्रवणीय आणि लोकप्रिय आहेत. त्यातील एक म्हणजे 'रजनीगंधा'मधील 'कई बार यूही देखा है' हे गाणं. या गाण्यासाठी मुकेश यांना 1974 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हे गाणं खूप सुंदर आहे. असंच आणखी एक गाणं म्हणजे 'छोटी सी बात' या चित्रपटातील. 'ये दिन क्या आये, लगे फूल हसके' हे गाणं तर आजही खूप लोकप्रिय आहे. मुकेश यांनी 'सप्तपदी' (1962) या मराठी चित्रपटासाठी 'एकदा येऊन जा' हे गीत गायलं होतं. 


तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. ज्या दोन सुपरस्टारची नेहमी चर्चा होते, त्यांच्यासाठीही मुकेश यांनी गाणी गायलीत. यातला पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना. त्यांच्यावर चित्रित केलेलं 'कटी पतंग' चित्रपटातील 'जिस गली में तेरा घर ना हो बालमा' हे गाणं आजही सर्वांच्या ओठांवर आहे. त्याचप्रमाणे 'आनंद' चित्रपटातील 'कही दूर जब दिन ढल जाये' हे गाणं तर एव्हरग्रीन आहे. तर दुसरे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासाठी 'कभी कभी' चित्रपटासाठी गायलेलं 'कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है',  'मै पल तो पल का शायर हूं' ही गाणी तर लाजबाब म्हणावी लागतील.


एक जिंदा दिल दर्दभऱ्या आवाजाचे गायक, तेवढेच कुटुंबवत्सल असलेले मुकेश अतिशय स्वच्छ मनाचे म्हणजे 'होठों पे सच्चाई रहती है' या गाण्याप्रमाणे ते निर्मळ होते.


मुकेश आणि लता मंगेशकर यांचं नातं अगदी सख्या भावा-बहिणीसारखं होतं. लता मंगेशकर यांचं विषय निघालं म्हणून सांगतो. लता मंगेशकर आणि त्यांचा मुकेश भय्या अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. मिशिगनच्या दौऱ्यात असताना मुकेश यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर आणि लाडक्या मुकेश भय्याचं पार्थिव मुंबईत आणण्याची वेळ लतादिदींवर आली. तो दिवस होता 27 ऑगस्ट 1976. 


आज 47 वर्षे झालीत मुकेश आपल्यात नाहीत. 'हम छोड चले है मेहफिल को' असं म्हणत वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी त्यांनी अचानक मैफल सोडली ती कायमचीच. मात्र गाण्यांच्या रुपात ते कायम आपल्यातच आहेत आणि राहतील.


याच लेखकाचा हा लेख वाचा: