BLOG : शेअर बाजार म्हणजे सगळा पैशांचा खेळ. पैसे गुंतवायचे अन् त्यातून पैसे कमवायचे हा मूलभूत सिद्धांत. त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांनाच लक्ष्मीमातेला प्रसन्न करून घ्यायचं असतं. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करता यावी यासाठी प्रार्थना करतात आणि त्या दिशेने प्रयत्न करत असतात.


शेअर बाजारात दोन मुहूर्त महत्वाचे मानले जातात. एक असतो तो “अक्षय तृतीया” आणि दूसरा म्हणजे “लक्ष्मी पूजन”. अक्षय तृतीया म्हणजे चांगल्या गोष्टींचा संचय करणे, त्याचा क्षय न होऊ देणे. एखादी चांगली वस्तू आपल्याकडे अक्षयपणे राहावी अशी त्यामागची भावना. अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारा वर्ग एखादा चांगला शेअर खरेदी करून ठेवतो. तो चांगला शेअर कायम आपल्याकडे राहावा, त्यातून संपत्ती वाढत जावी अशी त्यामागची भावना. 


शेअर बाजारात दूसरा महत्वाचा मुहूर्त म्हणजे “लक्ष्मी पूजन.” या दिवशी जगभरात दिवाळीचा उत्साह असतो. सर्वजण कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत असतात. फटाक्यांची आतिषबाजी सुरू असते अन् लक्ष्मी देवतेची पुजा केली जाते. लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठी हे सगळं उत्साही वातावरण असतं. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअर बाजारात “मुहूर्त ट्रेडिंग” नावाचा एक प्रकार असतो. थेट पैशांशी निगडीत असलेलं हे क्षेत्र असल्याने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बंद ठेऊन कसं चालेल? ज्या पद्धतीने सर्वत्र लक्ष्मीपूजन सुरू असतं तसंच ते Exchanges (जिथे शेअर्सची देवाण-घेवाण होते असं आर्थिक व्यवहारचं केंद्र) येथेही लक्ष्मीपूजन होत असतं. त्यामुळेच दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी शेअर बाजार, अर्थात NSE-BSE हे साधारणपणे एक तासासाठी चालू केले जातात. 
या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी-विक्री करता येते. चांगल्या मुहूर्तावर चांगले शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडता येतात. त्या शेअर्सच्या माध्यमातून अर्थसमृद्धीची मुहुर्तमेढ रचता यावी अशी अपेक्षा असते. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अनेकजण या दिवशी एखादा शेअर खरेदी करून ठेवतातच. या दिवशी Intraday Trade फारसे होत नाहीत. या मुहूर्तावर शेअरची Delivery घेण्याला महत्व असतं. कुठलातरी चांगला शेअर खरेदी करून ठेवावा जो भविष्यात किंवा पुढील पिढीला चांगला परतावा देईल अशी त्या मागची भावना असते. अनेक नवगुंतवणूकदार याच शुभ मुहूर्तावर नव्याने गुंतवणूक सुरू करत असतात. जे मोठे गुंतवणूकदार असतात ते या मुहूर्तावर नव्यानं रणनीती आखतात अन त्या दृष्टीने पाऊल टाकतात.


या वर्षी “मुहूर्त ट्रेडिंग” ची वेळ लक्ष्मी पूजनाच्या (24 ऑक्टोबर 2022) संध्याकाळी 6.15 ते 7.15 असणार आहे. भारतीय शेअर बाजार हा सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत असतो. आपल्याला या वेळेतच शेअर्सची खरेदी-विक्री करू शकतो. शनिवार-रविवार आणि सरकारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा शेअर बाजार बंद असतो. पण याला एक अपवाद आहे तो म्हणजे दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगचा!
दिवसा सुट्टी असली तरी संध्याकाळी या कालावधीत शेअर बाजार सुरू असेल. Equity Shares मध्ये (Investment) पैसे लावणार्‍यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. जी व्यक्ती या मुहूर्तावर ट्रेड करते ती दीर्घकाळ शेअर बाजारात राहते असंही काहीजण मानतात. चांगल्या शेअर्सच्या रूपाने लक्ष्मीमातेला आपण आपल्या घरात घेत असतो अशीही मान्यता आहे.


आजपर्यंतचा इतिहास असं सांगतो की या मुहूर्तावर शेअर बाजार सकारात्मक अर्थात पॉजिटिव्ह असतो. त्याला अपवादही आहेत. 2007 आणि 2012 च्या मुहूर्त ट्रेडिंगवर बाजार Negative मध्ये बंद झाला होता. योगायोग म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी शेअर बाजाराने Negative Returns दिले होते. 2008 ला तर जागतिक मंदीमुळे बाजार रसातळाला गेला होता.


2020 हे वर्षे जगभरातील शेअर बाजारासाठी कोरोना नामक आपत्तीमुळे खूप आव्हानात्मक होतं. रसातळाला गेलेला बाजार पुन्हा नव्याने झेप घेऊन उच्चांकी पोहोचला. अनेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर अनेकांनी भरपूर नफाही मिळवला. हाच शेअर बाजाराचा भाग आहे. 2021 हे वर्षही शेअर बाजारासाठी उत्तम राहिलं आहे. कोरोना आणि Lockdown मुळे जायबंदी झालेली अर्थव्यवस्था सुधारताना दिसत आहे. हे संकट अजून निवळलेलं नाही असं तज्ञ मानतात. गेल्या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग 4 नोव्हेंबरला होतं. त्यावेळी शेअर बाजार 18600 च्या जवळ होता. त्यानंतर वर्ष झालं पण तो स्तर अजूनही गाठता आला नाही.
परिस्थिति कशीही असली तरी शेअर बाजार विराम घेतो आणि पुन्हा एकदा चालत जातो, अगदी आपल्या आयुष्यासारखा.! सध्या शेअर बाजारात गुंतवणूक न करणे हीच सर्वात मोठी Risk आहे. त्यामुळे 


गुंतवणूक करावी, सुरुवात करावी आणि चालू ठेवावी हेच दीर्घकालीन सत्य आहे. खासकरून दिवाळीच्या मुहूर्तावर गुंतवणुकीचा श्रीगणेशा करायची हीच ती वेळ! या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा झळाळी यावी, सर्वांना उत्तम आरोग्य लाभवे एवढीच अपेक्षा करुयात!!!