भारताला पाकिस्तानकडून टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दोन धक्के सुरुवातीलाच दिले. याआधीही काही महत्त्वाच्या मॅचेसमध्ये भारताच्या आघाडीच्या फळीला प्रतिस्पर्धी संघाच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी त्रास दिलाय. याचा संदर्भ घेत या सामन्याचा घेतलेला हा आढावा.


सामन्यात बहुदा पहिल्यापासूनच एकेक पाऊल मागे पडत गेलं. आधी टॉस हरलो, नंतर रोहित शर्मा शून्यावर तंबूत, मग राहुलही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये. सहाला दोन अशा कमकुवत तब्येतीचा धावफलक नंतर बाळसं धरुच शकला नाही. कोहलीच्या मॅच्युअर्ड इनिंगमुळे 151 पर्यंत कसेबसे पोहोचलो. त्याला साथ मिळाली ती ऋषभ पंतची. असं झालं तरीही टी-ट्वेन्टी किंवा वनडेतही स्लॉग ओव्हर्स किंवा पॉवर-प्लेमध्ये जे गियर बदलणं असतं ते होऊच शकलं नाही. किंबहुना शाहीन आफ्रिदी नावाच्या नवख्या तरीही गुणवत्तावान गोलंदाजासमोर रोहित आणि राहुल हे दोन बुरुज ढासळले. लेफ्ट आर्म स्विंग गोलंदाजीला उंचीची साथ यामुळे आफ्रिदी पहिल्या काही ओव्हर्समध्ये धोकादायक ठरला. त्यात काहीशा उष्ण-दमट वातावरणात चेंडू स्विंगही होत होता. पण, आफ्रिदीला मार्क द्यायला हवेत, ते त्याने दाखवलेल्या बौद्धिक चातुर्याला. न्यू बॉलवर सहसा कोणी यॉर्कर टाकत नाही, फलंदाजाची फूट मूव्हमेंटही सुरुवातीच्या काळात तितकी चांगली नसते. तो क्रीझमध्ये घुटमळत असतो. हे आफ्रिदीने चाणाक्षपणे हेरलं. त्याने रोहित शर्माला थेट पहिलाच बॉल यॉर्कर टाकला. इन स्विंगिंग यॉर्करवर रोहित फसला. पूर्वी सचिन किंवा सेहवागची विकेट घेतल्यावर अपोझिशनच्या शरीरावर मूठभार मास चढत असे तसंच हल्ली रोहितची विकेट गेल्यावर प्रतिस्पर्धी संघाचं होतं. रोहित लवकर गळाला लागल्यावर पाकिस्तानी खेळाडूंची बॉडी लँग्वेज, त्यांचा अप्रोच पूर्णपणे बदललेला दिसला. तिथून या सामन्यावर त्यांनी जी ग्रिप मिळवली. ती अगदी विनिंग रन घेईपर्यंत. या साऱ्यामध्ये एक गोष्ट अधोरेखित झाली ती डावखुऱ्या गोलंदाजांची आपल्या आघाडीच्या फळीला ठरणारी डोकेदुखी. किमान तीन महत्त्वाच्या मॅचेसमध्ये हे अधोरेखित झालंय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलमध्ये मोहम्मद आमीरने रोहित, धवन आणि कोहलीला पहिल्या स्पेलमध्ये साफ केलं. मॅचचा निकाल फिरला. वनडे वर्ल्डकप 2015 च्या सेमी फायनलमध्ये मिचेल जॉन्सनने रोहित शर्मा, विराट कोहलीला तंबूची वाट दाखवली. तर वनडे वर्ल्डकप 2019 मध्ये ट्रेंट बोल्टने कोहलीला टिपलं. पुन्हा एकदा मैदान होतं, सेमी फायनलचंच. याही मॅचमध्ये तसंच झालं. पहिल्या दोन्ही विकेट्स डावखुऱ्या स्विंग बॉलरला.


या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांच्या डोकेदुखीवर वेळीच औषध शोधलं पाहिजे. नाहीतर दुखणं वाढेल आणि परफॉर्मन्स आणखी घसरेल.


असं असलं तरीही पाकिस्तानच्या गोलंदाजीचं आणि क्षेत्ररक्षणाचंही कौतुक करायला हवं. त्यांनी टिच्चून मारा करत एक मोठी ओव्हर ज्याची टीम इंडियाला प्रतीक्षा होती, ती मिळूच दिली नाही. मुख्य म्हणजे तीन बाद 31 नंतर त्यांनी अगदी अखेरच्या ओव्हरपर्यंत टीम इंडियाला टेक ऑफ पॉईंटच मिळू दिला नाही. त्यामुळे 151 पर्यंत आव्हान सीमित राहिलं. तरीही या खेळपट्टीवर आपल्या गोलंदाजीची ताकद आणि अनुभव पाहता हा स्कोर कमी नक्कीच नव्हता. अर्थात दव पडल्याने पाकिस्तानचं काम सोपं झालं. बॉल मस्त बॅटवर येत होता. स्विंग नव्हता, फारसा सीम, स्पिनही नव्हता. त्यात आपल्या काही गोलंदाजांनी आखूड चेंडू टाकत पाकच्या विजयात हातभार लावला.


शमी, भुवनेश्वर आणि बुमरा या वेगवान त्रयीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये 151 चा स्कोर हा रिस्पेक्टेड असला तरी फार मोठाही नसतो. यासाठी ‘अर्ली ब्रेक थ्रू’ ही काळाची गरज असते. इथे पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आणि रिझवान यांनी भारताला विजयाचं दार उघडूच दिलं नाही. किंबहुना अगदी की-होलमधूनही पल्याड बघायला दिलं नाही. इतकी कॉन्फिडन्ट आणि शिस्तबद्ध फलंदाजी त्यांनी केली. शिवाय एकेरी-दुहेरी धावांचा खुराक टी-ट्वेन्टीमध्येही किती महत्त्वाचा असतो, हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे 152 च्या स्कोरमध्ये दोघांनी मिळून 12 चौकार आणि 5 षटकार ठोकले. म्हणजे 78 धावा. 5 अवांतर धावांचा मेळ घातला तरीही 69 धावा या दोघांनीही पळून काढल्या. टी-ट्वेन्टीच्या मैदानात ही आकडेवारी बरंच काही बोलून जाते. नुसतं चौकार-षटकारांच्या पक्वानांवर पोट भरण्यापेक्षा एकेरी-दुहेरी धावांचं तोंडी लावणं किती महत्त्वाचं असतं हेच या दोघांनीही दाखवून दिलं. किंबहुना ज्या वेळी कधी खेळपट्टी, तर कधी गोलंदाजीमुळे तुम्हाला डावपेच आखावे लागतात तर कधी धावसंख्याच तितकी मोठी नसते, की जिथे मोठे फटके खेळावे लागतील. अर्थात हा क्रिकेटिंग इंटलिजन्स तुमच्याकडे असावा लागतो. जो पाकिस्तानने या सामन्यात दाखवला.


एक पराभव म्हणजे सारे काही संपले असे नसले तरीही या कामगिरीने अनेक प्रश्नांना तोंड फोडलंय. टीम सिलेक्शन हा त्यातला पहिला मुद्दा. हार्दिक पंड्या गोलंदाजी करु शकत नसल्याने टीमचं सगळं कॉम्बिनेशनच बदलतं. या परिस्थितीत बॅटिंग मजबूत करण्यासाठी शार्दूल ठाकूरला आपण प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा देणार की, भुवनेश्वर-शमीच्या अनुभवाला झुकतं माप देणार हा खूप ट्रिकी कॉल आहे. पण, येणाऱ्या किवींविरुद्धच्या मॅचमध्ये तो आपल्याला घ्यावा लागेल आणि तोही अचूक घ्यावा लागेल. कारण, आणखी एक पराभव आणि परतीच्या तिकिटाचं बुकिंग अशी काहीशी स्थिती होऊ शकते. फिरकी दुकलीचं सिलेक्शनही विचारात घ्यावं लागेल. जडेजाची फिल्डिंग, त्याचे मोठे फटके खेळण्याची क्षमता पाहता तो स्पिनर्समध्ये फर्स्ट चॉईस असणं हे लॉजिकल आहे. त्यामुळे मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती की अनुभवी अश्विन. हा पर्याय येणाऱ्या मॅचमध्ये निवडावा लागेल. अश्विनकडे असलेली न्यू बॉलवर गोलंदाजी करण्याची क्षमता हीदेखील लक्षात घ्यावी लागेल.


या मॅचमधला एक महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे कोहलीने त्याच्या जुन्या लौकिकाला जागत केलेली बॅटिंग. सहा बाद दोन आणि तीन बाद 31 अशा स्थितीत त्याने दाखवलेलं टेम्परामेंट आणि तरीही केलेली रन अ बॉल इनिंग त्याचा क्लास दाखवणारी होती. एका मोठ्या इनिंगच्या प्रतीक्षेत तो आणि आपल्यासारखे क्रिकेटरसिक दोघेही होते. ती झाली, अर्थात त्याला आता थांबायचं नाहीये. स्पर्धेत आगेकूच करायची असेल तर रोहित, राहुल आणि कोहलीपैकी एक जण प्रत्येक मॅचमध्ये मोठी किंवा अँकर इनिंग करत राहायला हवा.


पहिल्या मॅचमधील पराभव हा मनोधैर्य खचवणारा नव्हे तर काही गोष्टी सुधारण्यासाठी प्रेरित करणारा ठरावा. या पराभवानंतरही टीम इंडिया विजेतेपदाच्या रेसमध्ये आहे, यावर माझा विश्वास आहे. अर्थात न्यूझीलंडची मॅच म्हणजे ‘हुकाल तर चुकाल’ अशी आहे. आपल्याला एकाही चुकीला स्कोप नाही. अगदी संघनिवडीपासून फटक्यांची निवड यासारख्या बारीकसारीक गोष्टी आपलं स्पर्धेतलं भवितव्य ठरवतील.


क्रिकेटमध्ये म्हणतात, तसं ‘बॅक्स टू द वॉल’ सिच्युएशन असताना आपण उसळून उठू शकतो. तसे चॅम्पियन खेळाडू, तसा सक्षम सपोर्ट स्टाफ आपल्याकडे आहे. अजूनही मौका आहे, आता फक्त गरज आहे ती सर्व बाबींचा योग्य ताळमेळ राखत परफॉर्मन्सचा विजयी चौका मारण्याची.