मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, कल्याण, वसई, नागपूर, अमरावती.. या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटना समोर आल्या म्हणून कळतंय. नाही तर राज्यात, देशात दिवसागणित असे किती बलात्कार होत असतील जे समोरच येत नसतील. एक घटना घडते, रात्रीच्या अंधारात, तिचे लचके तोडले जातात. कुठे एक जण तुटून पडतो तर कुठे माणसाच्या रुपातलं जनावरांचं कळप मुलीच्या शरिराचा चेंदामेंदा करुन टाकतात. कुठे कट रचून तर कुठे सावजाच्या शोधात असलेले नराधम बाईचं, उमलत्या कळीचं आयुष्य उद्धवस्त करतात. 


कधी थांबणार हे सर्व? प्रश्न सतत भेडसावतो.दिल्लीतली निर्भया, कोपर्डीची निर्भया, यूपीची निर्भया, पुण्याची निर्भया, मुंबईची निर्भया.. आपण नाव देऊन मोकळे होतो. निर्भया म्हणजे निर्भयपणे लढणारी. पण, मला आता हा शब्दच जणू हादरवून सोडतोय. निर्भयाला समानार्थी शब्द म्हणजे बलात्कार पीडिता. माफ करा, पण, जबाबदारीने बोलतेय.. हा शब्दच आता तळपायाची आग मस्तकात नेत आहे. तिचे लचके तोडले जातात, संवेदनशील भागाला रक्तबंबाळ केलं जातं, तिच्या उघड्या डोळ्यांनी तिला ओरबाडलं जातं हे तिथे पाहते, विरोध केल्यावर तिला तुडवलं जातं, नराधमाची वासना शांत होईपर्यंत तो फक्त त्याची भूक भागवतो. तिचा जीव घेतो. हे किती वेळा आपण ऐकणार? किती वेळा डोळ्यातून पाणी काढणार? किती वेळा संताप उसळणार?


20  मार्च 2020 हा दिवस निर्भया न्याय दिवस म्हणून ओळखला जातो. कारण या दिवशी 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशी दिली गेली.  8 वर्ष लागली.. एका पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी.. या बलात्काराने संपूर्ण देश हादरला. नराधमांना शिक्षा व्हावी म्हणून दबावही वाढत होता. तरीही 8 वर्ष..


2016 मध्ये कोपर्डीमधल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. आरोपींना नगर न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यांनी अपील केलं आहे, ते ही रेंगाळलंय. न्याय व्यवस्थेचा आदरच. मात्र तारीख पे तारीखमुळे अनेक पीडिता न्यायाच्या प्रतिक्षेत देवाघरी गेल्यात, हेही वास्तव नाकारुन चालणार नाही.


हाथरसमधला बलात्कारही अंगावर काटा आणणाराच. एक नव्हे, दोन नव्हे तर वर्षभरात देशात जवळपास 14 हजार 420 बलात्काराच्या घटना घडल्यात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचीच ही आकडेवारी आहे. हा आकडा समोर आला म्हणजे या घटनांची नोंद झाली आहे. बलात्काराच्या अनेक घटना गल्लीबोळात घडल्या असतील, ज्याचीही नोंदही नसेल.


https://ncrb.gov.in/sites/default/files/crime_in_india_table_additional_table_chapter_reports/28A.pdf 


महिला, मुलींना शिक्षणाच्या दृष्टीने सक्षम बनवण्यासाठी आता कुठे हालचाली सुरु झाल्यात. पहिली बेटी धनाची बेटी इथपासून ते माझी मुलगी माझा अभिमान इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आणि लागतो आहे. सोपं नाही बाई होणं. आम्ही शारीरिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा कमकुवत असलो तरी मानसिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा कैक पटीने सक्षम आहोत. याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे. पण, फक्त सहन करायला शिक, या एका शिवकवणीपोटी सहनशीलता इतकी वाढली की वखवखणाऱ्या नजरेकडेही दुर्लक्ष करुन पुढे चालत राहणं हे आता महागात पडतंय.


शिका, पुढे जा आणि वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला धडा शिकवा..हे आपल्या मुलींना शिकवणं ही काळाची गरज बनली आहे. ही शिकवण घरातूनच, शाळेपासूनच दिली गेली पाहिजे.  सरकारनेही चर्चेच्या फैरी झाडत न बसता शक्ती कायदा आणून नराधमांना अद्दल घडवली पाहिजे, जेणेकरुन नराधमांवर वचक बसेल. सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवत, आम्ही सर्वप्रथम पीडितेची, कुटुंबियांची भेट घेतली हा दावा न ठोकता, पीडितेला न्याय कसा मिळेल, यादृष्टीने एकजूट दाखवत नराधमांना कठोर शासन कसं होईल, यासाठी ‘शक्ती’ एकवटवली पाहिजे.


कधी थांबेल हे सर्व? या प्रश्नाचं उत्तर एकच, जेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या आई बहिणींभोवती सुरक्षा कवच उभं करु. बलात्कार म्हणजे फक्त एका स्त्रीमानवी जीवावरचा अत्याचार नाही तर डोळे मिटून वावरणाऱ्या समाजावरच नराधम बलात्कार करतायत, हे बोचणारं वास्तव आहे. आज शेजारची निर्भया होते, उद्या आपल्या घरातली कुणी निर्भया झाली तर? विचार करा, जागे व्हा...