कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती हिरवाई, निळाशार अथांग समुद्र, नागमोडी वळणाचे रस्ते, कौलारु घरं, नारळी-पोफळीच्या बागा आणि समुद्राचा मेवा म्हणजे हरतऱ्हेचे मासे.. मन तृप्त करणारं आणि काहींसाठी जिभेचे चोचले तर काहींसाठी दोन वेळच्या पोटाची खळगी भरणाऱ्या माश्यांचा मुबलक साठा असणारं असं माझं कोकण. कोकणी माणूस हा अल्पसंतुष्ट, मेहनती आणि फणसासारखा रसाळ.. त्याच्यात बडेजावगिरी नाही. जे आहे त्यात समाधान मानणारा, दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाणं त्याला माहित नाही. जी मीठ भाकर तो मिळवतो, त्यात बाप्पाचं नाव घेऊन सुखी समाधानी राहतो.


कोकणी माणसाने आजही आपल्या मातीशी असलेली नाळ जोडून ठेवलीय. चाकरमानी भलेही शहरात एसी ऑफीसमध्ये बसून काम करतो. मात्र गावी गेल्यावर शेतात, आपल्या वाडीत तो राबतो. पिढीजात जमिनीवर तितकंच प्रेम करतो. कोकणी माणसासाठी वर्षातले दोन सण म्हणजे दसरा, दिवाळीच.. ते म्हणजे शिमगा आणि गणेशोत्सव.. या दोन सणांसाठी चाकरमान्यांची पावलं आपसूकच आपल्या गावाकडे वळतात. या दोन सणांना सुट्टी मिळावी म्हणून तो वर्षभर सुट्ट्या जमवतो. आणि हे दोन सण आपल्या गावात, आपल्या मातीशी एकरुप होऊन साजरा करतो.


यंदाचा गणेशोत्सव हा मी आतापर्यंत पाहिलेल्या गणेशोत्सवापेक्षा खूप वेगळा ठरला. आजी, आजोबा, नातवंड, सुना, जावई, लेकरं, बाळांसहीत जाणारा चाकरमानी यंदा आपल्या घरातच थांबून बाप्पापुढे हात जोडतो. आणि भाऊबंधकीतल्या माणसांकडून खंड पडू नये म्हणून बाप्पाला गावच्या घरात आणतो. व्हॉटअॅप व्हिडिओ कॉलवरुन बाप्पाची आरती करतो. आणि बाप्पाला डोळे भरुन पाहतो. डोळ्यात टचकन पाणीही येतं. पण काय करणार? बाप्पाला सर्वकाही माहिती आहे. यावेळी कोरोना आहे ना.. यंदा तुझ्या सेवेत नाही, मात्र पुढच्या वर्षी धूमधडाक्यात याही वर्षाची कसर भरुन काढेन, असं बाप्पाशी हितगूज करतो. गणपती आणि कोकणी माणसाचं नातं शब्दात उतरवणं हे कठीणच..


कोकणी माणसाला आडमूठी भूमीका घेणं माहित नाही. जर तो हट्टी असता तर आपल्या घरातल्या पोरा-ढोरांसह, काहीही झालं तरी चालेल, असं म्हणत आपल्या गावी पोहोचलाच असता. मात्र परिस्थितीचं भान ठेवून वागलेल्या कोकणी माणसाचा मला अभिमान आहे. लॉकडाऊन काळात ईपास , क्वारंटाईन, टेस्टचे नियम सातत्याने बदलले. मात्र नियमांचं उल्लंघन होऊ न देता, जिल्ह्याच्या हद्दीजवळ सर्व नियमांचं पालन केलं गेलं. मुंबईपासून शेकडो किलोमिटरचा प्रवास, वाहनांच्या लांबच लांब रांगा, धो-धो कोसळणारा पाऊस, लहानग्यांना मांडीवर बसवून केलेला प्रवास हे कोकणी माणसाच्या सहनशीलतेचं एक मूर्तीमंत उदाहरण.


यंदा कोकणातल्या प्रत्येक गावाने कोरोनाला आपल्या हद्दीत शिरकाव करु द्यायचा नाहीच, असा चंग बांधून नियम तयार केले. शहरातून, गावाबाहेरुन येणाऱ्यांसाठी गावाच्या वेशीजवळ क्वारंटाईनची सोय, त्यांच्या खाण्या पिण्याची सोय गावकऱ्यांनी केली. लॉकडाऊन काळात गावात अडकलेल्या चाकरमान्यांनी वेळेचा सदुपयोग करत विहीर खोदत गावाचा पाणीप्रश्न मिटवल्याच्याही बातम्या पाहिल्या.


गावाचं नाव जरी काढलं तरी कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसतं. कदाचित हीच त्याची सकारात्मक ऊर्जा आहे. या ऊर्जेमुळेच कोकणी माणसाने लॉकडाऊन आणि सणवाराचे दिवस संयमाने काढले. बाप्पा आणि त्याच्यामध्ये डिस्टन्सिंग असलं तरी त्याच्या भक्तीत डिस्टन्सिंग कधीच येणार नाही. निसर्गाने कोकणाला भरभरुन दिलंय आणि कोकणी माणसाला संयमी आणि सृजनशील बनवलंय. यंदाचं वर्ष गणेशोत्साविना सरलं मात्र हे संकट लवकर टळो आणि पुढच्या वर्षी जल्लोषात बाप्पाचं स्वागत करायला मिळो.. हीच बाप्पा चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया!


वृषाली यादव यांचे अन्य ब्लॉग