>> सौमित्र पोटे


ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांच्या निधनाचा धक्का सगळ्यांनाच आहे. कोरोनामुळे आलेली हतबलता यानं अधोरेखित झाली. आशालता यांच्या जाण्यानं अनेक प्रश्न निर्माण केले.


ज्येष्ठ कलाकारांनी चित्रिकरणात भाग घ्यावा का?
ज्येष्ठ कलाकारांची काळजी सेटवर घेतली जाते का?
मुळात 65 वर्षावरच्या लोकांना सेटवर परमिशन दिलीच का गेली?
मनोरंजनसृष्टी ही आजची प्राथमिकता नसूनही त्यांना चित्रिकरणाची परमिशनच का दिली गेली?
आशालता यांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची? निर्मात्याची की चॅनलची?


असे अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवीयेत. सोशल मीडियावरही या प्रश्नांना ऊत आलाय. अनेकांनी चॅनलवर टीका करायलाही सुरूवात केली आहे. पण काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. आपण कोणीही जेव्हा केव्हा घराबाहेर पडतो तेव्हा काळजी घ्यायची जबाबदारी ही आपलीच असते. कोरोनाचा प्रादुर्भाव कुठूनही कुठे होऊच शकतो. वयाच्या 60 आतल्या लोकांची इम्युनिटी सर्वसाधारणपणे बरी असते त्यामुळे त्यांनी गरजेपुरतं बाहेर पडलं तर चालतं. पण ६०-६५ पुढच्या लोकांना मात्र त्याचा धोका जास्त असतो आशालता यांच्याबाबत हेच झालं. आपण एक लक्षात घ्यायला हवं की 65 वरच्या कलाकारांनी सेटवर येऊ नये ही अट केंद्र सरकारने घातली होती. जी राज्य सरकारने पाळली. मनोरंजनसृष्टीला सशर्त परवानगी देताना राज्य सरकारनेही 65 वरच्या कलाकारांना तंत्रज्ञांना सेटवर यायला मज्जाव केला होता. त्याचा सिंटाने निषेध केला होता. त्यात विक्रम गोखले, रोहिणी हट्टंगडी, मनोज जोशी ही मंडळी होती. ती चूक नव्हतीच. आपल्याकडे असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह केवळ अभिनयामुळेच चालतो. अशांची चालू कामं बंद झाली. मालिकांमधले ट्रॅक थांबले. अशा ज्येष्ठ कलाकारांची गोची होऊ लागली. कुवत असूनही, मालिकेत ट्रॅक असूनही केवळ नियमामुळे काम करता येत नाहीय, पैसे मिळत नाहीयेत ही असहायता त्यामगे होती. त्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व सिंटाने केलं. कोर्टाने ही अट मागे घेतली. त्यावेळी कोर्ट काय म्हणालं? प्रत्येकाला उपजिविकेचा अधिकार आहे. इथे प्रत्येकाला जगायचं आहे. नियम मागे आला. ज्येष्ठ कलावंतांना मार्ग मोकळा झाला. हा नियम मागे घेताना काळजी ध्या असं कोर्टाने सांगितलं होतंच.


कलाकाराला उद्या कोणतीही इजा झाली की त्याचा पहिला फटका मालिकेता आणि पर्यायाने निर्मात्याला बसतो. आधीच सहा महिने काम बंद असल्यामुळे निर्माता घायकुतीला आला होताच. पण अशाने मालिकांचं चित्रिकरण नव्यानं सुरू करताना निर्मात्यांनीही काळजी घ्यायची ठरवलीच. छोट्या पडद्यामध्ये कार्यरत असलेल्या जुन्या जाणत्या आणि कार्यरत मंडळींकडून जी माहीती मिळाली ती सांगतोय. माझी आई काळूबाई ही मालिका आहे सोनी मराठीवरची. सोनी मराठी ही आपल्या चॅनलवर चालणाऱ्या सर्व मालिकांची काळजी घेते आहे. या चॅनलकडून एक सुपरवायझर सेटवर बसवण्यात आला आहे. सेटवर कुणीही साधा मास्क लावण्याचा नियम पाळत नसेल तर तो थेट फोटो काढतो आणि चॅनलला पाठवतो. जसे नियम राज्य सरकारने चॅनलला घालून दिले आहेत, तसेच नियम चॅनलने निर्मात्या संस्थांना घालून दिले आहेत. अनेक निर्मात्या संस्थांनी आपल्या कलाकारांचा, तंत्रज्ञांचा कोविड विमा काढला आहे. इतर स्टार प्रवाह, कलर्ससारख्या चॅनल्सनी भरारी पथकं नेमली आहेत. ही मंडळी अचानक सेटवर येऊन पाहणी करतात. कारण, आत्ता कुठे हे अर्थचक्र सुरू होऊ लागलंय. ते पुन्हा थांबावं असं कुणालाच वाटत नाहीय. कारण, कोरोनाचा संसर्ग झाला की थोडीथोडकी नव्हे तर थेट 14 दिवस क्वॉरंटाईनचे वाया जातात. इतका खर्च आता निर्मात्याला परवडणारा नाही. स्वराज्य जननी जिजामाता मालिकेतल्या अमृता पवार या अभिनेत्रीला कोरोना झाल्यानंतर मालिकेनं लीप घ्यायचं ठरवून भार्गवी चिरमुले ही नवी नायिका तिथे आणली.


कोरोनामुळे होणाऱ्या संसर्गाची भयावहता इथे प्रत्येकाला आहे. पण तो कुठून कसा होतो हे कुठं कुणाच्या लक्षात आलं आहे? उपजिविकेच्या ज्या मुद्द्यावरून कोर्टाने ज्येष्ठ कलावंतांना हा पर्याय खुला करून दिला त्यात आशालता येतात हे किती लोकांना माहितीये? आशालता जवळपास महिनाभर सातऱ्यात आई माझी काळूबाईचं चित्रिकरण करत होत्या. त्यांना कोरोनाची बाधा झाली ती साधारण सहा दिवसांपूर्वी. आता ज्येष्ठ कलावंतांना परवानगी द्यावी की नाही.. हा मुद्दा आता उरत नाही कारण, ही परवानगी केंद्र वा राज्य सरकारने नाही तर कोर्टाने दिली आहे. सर्वच ज्येष्ठ कलावंतांच्या जगण्याचा प्रश्न आहे असं नाही. पण ज्यांचा आहे त्याची कल्पना इथे काम करणाऱ्या कलाकाराला असतेच. आशालता यांना कामाची असलेली गरज ही त्यांनी सेटवरच्या अत्यंत जवळच्या मोजक्या लोकांकडे बोलून दाखवल्याचं कळतं. त्यांना या मालिकेत काम करण्यापूर्वी तीनतीनदा खात्री करण्यासाठी विचारण्यातही आलं होतं. त्यानंतर त्यांनी आपण काम करत असल्याचं लिहून दिल्याचं कळतं. आता लिहून देण्यातही काही गैर आहे असं नाहीय. सेटवरचा माणूनस सेटवरून गेल्यानंतर कुणाच्या संपर्कात कसा येतो हे निर्मात्याला वा सेटवरच्या लोकांना माहीत नसतं.


हा ब्लॉग लिहिणं म्हणजे, चॅनलची वा निर्मात्याची बाजू घेणं हा मुद्दा नाहीय. मुद्दा हा आहे की इथे प्रत्येकाची गोची झाली आहे. घरी बसलं तर इन्कम नाही आणि बाहेर पडलो तर मरणाची भीती अशा कात्रीत गेल्या सहा महिन्यापासून अडकलेला कोणीही ज्येष्ठ कलाकार आता कोरोनाचा आकडा वाढल्यानंतर सेटवर लोकांच्या संपर्कात येऊन पैसे मिळवण्याची रिस्क का घेईल? कोणताही कलाकार ती रिस्क घेतो त्याला कारणही तसंच असतं.


आशालता यांचं जाणं भयंकर धक्कादायक आहे. सेटवर गेल्या महिन्याभरापासून काम करणारी ही ज्येष्ठ अभिनेत्री अशी अचानक संसर्गानं जाणं ही दुर्दैवी आहे. इंडस्ट्रीने सेटवरून गमावलेला हा दुसरा कलाकार. यापूर्वी बाकरवाडी या हिंदी मालिकेचया सेटवरचा ड्रेसमन अशाच कोरोनानं गेला. त्या निर्मात्याने आपल्या संपूर्ण युनिटचा कोविड विमा काढला होता म्हणून मृत्यू पश्चात त्याला 25 लाख मिळाले. निर्मात्याने त्याच्या पत्नीच्या अकाऊंटवर ते टाकलेही. मराठीतही असे अनेक निर्माते आहेत ज्यांनी कोविड विमा काढला आहे. कारण, त्याला लोकांची काळजी आहेच आणि त्याहीपेक्षा जास्त त्याला कोरोना काळात येणाऱ्या खर्चाची काळजी आहे. कोरोनाचं संक्रमण अलपोस्ट सगळ्या सेक्टर्समध्ये आहे. बाकीच्यांच सोडा पण मराठी हिंदी अशा अनेक सेटवर कोरोना अवतरला. त्या त्या वेळी निर्मात्यांनी, चॅनलने काळजी घेऊन तो निस्तरला. काळूबाईच्या सेटवरही 27 जाणांना हा कोरोना झाला. त्यातून सगळी मंडळी बरी होतायत. अपवाद फक्त ज्येष्ठ कलाकार आशालता यांचा. त्यांच्या जाण्याचा सगळ्यात मोठा धक्का खरंतर काळूबाईच्या सेटवरच्या प्रत्येकााला बसला असेल.


या सेटवर मुंबईहून आलेल्या डान्स ट्रुपमुळे हा कोरोना साताऱ्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय. त्याचा तपास व्हायला हवाच. पण सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार हा डान्सचा गट 6 सप्टेंबरला साताऱ्यात आला आणि 7 तारखेला परत मुंबईत दाखल झाला होता. तिथे गेलेल्या सर्व डान्सर्सची तपासणी मुंबईत करण्यात आली होती असंही कळतं.आता हा सगळा साताऱ्यातून कळत जाणारा प्रकार आहे. त्यातली सत्यता समोर येईलच. पण सरसकट इंडस्ट्रीमध्ये काळजी घेतली जात नाहीय अशी विधानं होणं हे फारच सरधोपट वाटतं. उरला मुद्दा मनोरंजनवाल्यांना परमिशन द्यायचीच गरज काय होती असं विचारणं म्हणजे, आपला तो लाडका आणि दुसऱ्याचा तो दोडका म्हटल्यासरखं ठरेल. काम करणारी मंडळी सगळीकडे आहेत. कोणीही कुठेही काम करत असला तरी प्रत्येकाची भूक आणि प्रत्येकाचं कुटुंब आहे.


कोरोना काळात सेटवर अत्यंत काळजी घेणं आणि केवळ सेटवर नाही. तर सेटवरचा प्रत्येक जेव्हाकेव्हा इतरत्र जात असतो तेव्हा त्यानेही ते भान पाळणं हीच आणि हीच काळाची गरज आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानापरत्वे इम्युनिटी कमी होत जाते हेही असंच एक सत्य. पण त्या सगळ्या पलिकडे जीव आहे. रतन टाटा म्हणतात त्याप्रमाणे, 2020 हे वर्षं केवळ आपण जिवंत राहण्यासाठी आहे. पैसे, मान, मरातब बाकी सगळं पुढच्या वर्षानंतर बराच काळ मिळवता येणारं आहे. ही गोष्ट मानशी बांधली तरी खूप आहे. कामासाठी घराबाहेर पडणं जर गरज असेल तर संसर्गाबाबत काळजी घेणं ही त्यापलिकडची जबाबदारी आहे. एका कलावंताबाबत दुर्दैवी घटना घडली म्हणून मनोरंजन सृष्टीची परवानगी काढून घ्या म्हणून सांगणं.. असं होत नाही. हे म्हणजे, एका विशिष्ट कंपनीच्या गाडीचा अपघात होऊन कोणी मृत्यू पावलं तर थेट त्या गाड्यांचं उत्पादन बंद करा म्हणण्यासारखं आहे.


काळजी घ्यायला हवी. गरज असेल जगायचे वांधे झाले असतील तरच लोकांनी त्यातही ज्येष्ठांनी बाहेर पडायला हवं. रतन टाटा म्हणतात त्याप्रमाणे, हे वर्ष आपल्याला केवळ जिवंत रहायच आहे. बाकी सगळं नंतर मिळवता येणार आहे.