इतकी कसली घाई आहे?
कसली भीती आहे?
एकसारखा मनात कोणता विचार येतो आहे?
का येतो आहे?


आपण सगळेच एका खूप अकल्पित परिस्थितीतून जात आहोत. याला तूही अपवाद नाहीस आणि मीही. माझ्यासमोरच्या अडचणी तुला माहीत नाहीत. आणि तुझ्यासमोरच्या आव्हानांचा मला अंदाज नाही. पण आपण दोघे एकाच नावेत आहोत हे कळतंय ना तुला? आपण दोघेच कशाला.. अरे आपला परिसर.. आपलं गाव.. आपलं शहर.. आपलं राज्य आपला देश.. आपण सगळे अत्यंत अकल्पित परिस्थितीतून जातो आहोत. पण म्हणून असा नैराश्यात जाऊ नकोस. बघता बघता चार महिने संपले. कळ काढलीच ना आपण? मग अशा अचानक का विचार येतोय मनात? एका क्षणात होत्याचं नव्हतं होतंय. पुढे कुटुंबाचं काय.. तुझ्यावर अवलंबून इतरांचं काय. हा एकदा विचार कर. ही परिस्थिती बदलणार आहेच. आज नाही.. निदान आणखी तीन महिन्यांनी तरी बदलेलच. पण तोवर कळ काढ. आज तू नको ते पाऊल उचललंस तर तुझ्या भवतालच्या सर्व तुझ्या माणसांसाठी इथून पुढची सगळी वर्षं ही अशाच दुष्काळात काढावी लागणार आहेत.. तेव्हा तू काय करशील?


आपल्याला जगायचं आहे. आपलं आयुष्य निदान 50 वर्षांचं आहे असं पकडलं तरी हा कोरोनाचा काळ त्यापैकी केवळ वर्षभराचा असेल. या एका छोट्या पॅचने आपली पुढची इनिंग का गढूळ करावी? कशाचीही कल्पना न देता.. कुणाला काही न सांगता.. अघटित निर्णयापर्यंत का यायला होतं? अशी कुठली गोष्ट आहे ज्याची भीती वाटतेय? अशी कोणती गोष्ट आहे का की जी समाजाला कळली तर निंदा होईल.. नालस्ती होईल.. नाती तुटतील? जे आपलं असतं ते इतकं सहज तुटत नसतं. थोडं बोलून बघ.. थोडं सांगून बघ.. प्रत्येकवेळी समोर दिसणारा अंधार हा जोवर तू त्यात पाऊल ठेवत नाहीस तोवर तितकाच काळामिट्ट असतो. काय माहीत, तू त्या अंधारात धीरानं पाऊल ठेवलंस, तर कदाचित उजळूनही जाईल तुझ्ं अवकाश... पण असं समोरच्याला अंधारात ठेवून नको तो निर्णय घेऊ नको.


काळ कठीण आहे. कुणी भुकेलं आहे.. कुणी कोरोनामुळे जवळचं माणूस हिराव्या्यानं दु:खी आहे. पैकी अनेक लोक आर्थिक विवंचनेत आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कित्येकांचे पगार अचानक कमी झाले आहेत. अनेकांना आपल्याला नोकरीवर पुन्हा कधी बोलवतील याचीच शंका आहे. पण इथला प्रत्येकजण नेटानं लढतोय, कारण त्याला माहीतीये की आत्ता क्रिझवर टिकून राहणं गरजेचं आहे. आयुष्याच्या या क्रीझवर तू टाकायला हवंस. अर्थात प्रत्येकाला आऊट व्हायचं आहेच, पण तू नको ना आपणहून आऊट होऊ. तू खेळ. जमेल तसं खेळ. तू किती रन्स काढल्यास हे महत्वाचं नाही. तू त्या रन्स कशा काढल्यास हे इथला प्रत्येकजण पाहातो आहे. म्हणूनच आऊट झालोच तर हे ध्यानात ठेव की पॅव्हेलिअनमध्ये परतत असताना पाहणाऱ्या प्रत्येकानं आदरानं उभं राहिलं पाहिजे. या खेळात एखादी ओव्हर गेली मेडन तर अडचण काय आहे? नशीब मान की चार लोक भवताली आहेत. काही कमी पडलं तर आपल्या तोंडचा घास काढून देणारं कुणी आहे तुझ्याजवळ. इतकंच कशाला, तू हेही लक्षात ठेव की गरज पडली तर तुझ्यासमोरच्या कुणा आपल्यासाठी तुला तुझ्या तोंडचा घास काढून द्यावा लागणार आहे. यातही मजा असते रे. यातही समाधान असतं. यात दोघांनाही एकमेकांचा आधार असतो. तुझ्या एका क्षणीक निर्णयामुळे ही साखळी तू तोडू नको.


इतकी कसलीच घाई नाहीय. आपण सगळे इथेच आहोत. आपण सगळे आपली सुरुवात इथूनच करणार आहोत. या कोरोनानं प्रत्येकाला शहाणं केलं आहे. मुंबईतल्या ट्रेनसारखं आहे हे. म्हणजे, ट्रेन खच्चून भरली असली तरी ट्रेनमध्ये चढणाऱ्याला आत ओढलं जातं. दरवाज्यात लटकलेल्याला आतून पकडलं जातं. कारण इथे प्रत्येकाला जगायचं आहे. आज तो दारात आहे उद्या आणि कुणीतरी अशाच दारात उभं असणार आहे, हे प्रत्येकाला माहीत आहे.


इतकं नैराश्य का? लक्षात घे आपण सगळेच अडचणीत आहोत. आजुबाजूच्या लोकांचे चेहरे काळजीने लांबोडके झाले नसले तरी चिंता त्यांनाही उद्याची आहेच हे मनाशी पक्क बांध. साधं उदाहरण घे.. तुझ्या कुठल्याही परिचिताशी तू कसा अडचणीत आहेस हे सांग. आणि विचार, तुझं झालंय का रे असं.. बघ.. तोही सांगू लागेल पटापट. असं खरंच करून बघ. तुला वाटेल की अरे, आपण तर फार सुखी समोरच्याच्या मानाने. हा काळ आहे.. हा निघून जाणारा आहे. त्याला आपल्याला हरवायचं आहेच. आता त्याच्यासमोर विकेट फेकायची की नव्या ओव्हरची वाट बघायची हे शेवटी आपल्या हातात आहे. इथे प्रत्येकजण नव्या ओव्हरसाठी थांबून राहिलाय.. तुला इतकी कसली घाई आहे? एक लक्षात घे.. आपण फार भाग्यवान म्हणून जगण्याच्या या पीचवर आपल्याला खेळायला चान्स मिळालाय. हे जगणं एकदाच नशिबी येतं प्रत्येकाच्या. आता ही विकेट फेकू नको.आपल्याला आरामाची सवय नाहीय हे खरंय. पण वेतागू नको. भवताली बघ.


खरंच सांगतो, या लॉकडाऊनने माझा प्राधान्यक्रम बदलला आहे. प्रायॉरिटी बदलतायत. लॉकडाऊनआधी पर्यंत पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या माझ्या गोष्टी आता पार आठव्या नवव्या स्थानावर गेल्या आहेत. आपली माणसं.. आपलं कुटुंब.. आपलं मैत्रं.. आपलं जगणं.. या यादीत खूप वर आलं आहे. कारण मी थोडं थांबून पाहातोय भवताली. जमलं तर तूही करून बघ तसं. तुझे जेवायचे.. खायचे.. राहायचे वांधे आहेत का? असतील हाक मार.. मदत येईल तुझ्याकडे. तसे वांधे नसतील तर तू सुखी आहेस.. मग थोडी कळ काढ. हा लॉकडाऊन संपल्यानंतर काळाच्या पेकाटात लाथ हाणायची आहेच आपण.


आपल्याला पुन्हा नव्यानं उभं राहायचं आहे... लक्षात घे आपल्याला.. फक्त तुला..फक्त मला नव्हे. तुझा माझा मिळून आपण होतो. यातला तू उद्या नसलास तर ही हिंमत गळून पडेल. गळून जाण्याची ही वेळ नाही.


थोडं थांब. अजून थोडं थांब आहेस तिथं.. आहेस तसा थांब.
त्यानंतर झेप घ्यायची आहेच.
इतकी आपल्याला काय घाई आहे?


सौमित्र पोटे यांचे अन्य ब्लॉग :