कालपासून एक बारीक अस्वस्थता आली आहे. अनेक गोष्टींमुळे आलीय ती. म्हणजे, निशिकांतच्या बातमीनंतर मीडियाला अनेक टपल्या मारल्या गेल्या. त्यात घाई, हव्यास, ब्रेकिंगचा हट्ट असे शब्द सातत्याने येत होते. मीडियाचं चुकलं होतंच. पण नक्की कुठं काय चुकलं होतं? काल बातम्यांमध्ये जो गोंधळ उडाला तो का उडाला? काल नेमकं काय घडलं.. हे समजून घ्यायचं असेल, तर आणि तरंच, पुढे वाचायला घ्या. कारण या लिखाणात गरज वाटेल तिथे तुम्हालाही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तर तुमची तुम्ही तुमच्या पुरती द्या.


काल काय घडलं नेमकं?


मी माझ्यापुरता विचार करु लागतो, तेव्हा घडलेला सगळा घटनाक्रम मी पुन्हा एकदा ताडून बघायचं ठरवतो. तो असा,
काल सकाळी 10 च्या सुमारास मला निशी गेल्याचा पहिला फोन आला. महाराष्ट्रातल्या एका अत्यंत जबाबदार, विवेकी गृहस्थाच्या या फोनने मी हळहळलो. आलेली इन्फर्मेशन करेक्ट होती. ती अशी, 'सौमित्र, निशी गेला. अजून हॉस्पिटलने जाहीर केलेलं नाही. पण कधीही करतील आज. 'मी ठिक आहे, म्हणत ठेवला फोन. मी माझ्या घरीच होतो. एव्हाना आवराआवरीला वेग आला. कधीही हॉस्पिटल हे जाहीर करू शकतं, हे कळल्यावर तडक ऑफिसला पोहोचणं गरजेचं होतं. तोवर इंडस्ट्रीतल्याच लोकांचे काही मला, काही ग्रुपवर मेसेज यायला लागले. अंघोळ करून ऑफिससाठी बाहेर पडता पडता आणखी दोन दिग्दर्शकांचे फोन आले. त्या सांगण्यातही निशी गेल्याचं सांगणं होतं. पण अद्याप हॉस्पिटलने जाहीर केल्याची खात्री नव्हती. तडक ऑफिसात पोहोचलो. एव्हाना येणाऱ्या मेसेजमध्ये वाढ झाली होती. बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर जे होतं तेच इथेही झालं.


हळूहळू येणाऱ्या मेसेजमध्ये, फोनमध्ये वाढ होऊ लागली होती. काही ऑनलाईन पोर्टल्सनी बातम्या देऊन टाकल्या होत्या. तरीही मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी थांबायचा निर्णय घेतला. कारण जोवर हॉस्पिटल सांगत नाही, तोवर नाही द्यायची आपण बातमी असं आम्ही ठरवलं होतंच. तेव्हा वाजले होते साधारण साडेअकरा. त्यानंतर मराठी इंडस्ट्रीतल्या एका ज्येष्ठ कलाकारानेही आपण हैदराबादमध्ये निशीसोबत असलेल्या व्यक्तीशी स्वत: बोललो असून 'निशी गेलाय', हे कन्फर्म केलं. माध्यमांमध्ये त्याच कलाकाराचा संदर्भ देऊन बातम्या फिरू लागल्या. मी पुन्हा त्या कलाकाराशी फोनवर बोललो आणि हैदराबादमध्ये निशीजवळ कोण आहे, त्याचा नंबर मागितला. त्यानेही तो तडक दिला. निशीजवळ जवळपास आठवड्याभरापासून निर्माते अजय राय होते. अजय राय हे इंडस्ट्रीतलं मोठं नावही आहे. मी अजय रायना फोन लावला. त्यावेळी साधारण पावणेबारा वगैरे झाले असतील. अजय राय यांनी फोन घेतला. राय म्हणाले, 'निशी सकाळीच गेलाय. डॉक्टरांनी मला सकाळीच सांगितलं ही इज नो मोअर.' मी म्हणालो, ओह, मग तुम्ही त्याला इकडे आणणार आहात का? ते म्हणाले, 'नाही, इथेच आम्ही सर्व सोपस्कार करू'. मी म्हणालो, ठिक आहे. हॉस्पिटलने स्टेटमेंट दिलंय का? तर राय म्हणाले, 'मला सकाळीच डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता फक्त सिनिअर डॉक्टर येतील आणि मग होईल ते.' मी म्हणालो, तुमच्याकडे स्टेटमेंट आलं की कृपया मला पाठवा. ते बरं म्हणाले. फोन बंद झाला.


या काळात हळूहळू काही पोर्टल्सनी, ट्रेन एनालिस्टनी ट्विटरवर निशीला श्रद्धांजली वाहायला सुरूवात केली होती. तरीही आम्ही थांबायचा निर्णय घेतला. म्हटलं, हॉस्पिटलकडून येऊ दे. दुपारी एक वाजण्यापूर्वी माझा फोन जवळपास 30 वेळा वाजला. पैकी काहींनी निशी गेल्याचं कन्फर्म करायला फोन केला. काहींनी तुमच्या चॅनलवर कशी काय बातमी दिसत नाहीय, हे सांगायला फोन केला. मी सगळ्यांना हॉस्पिटलच्या कन्फर्मेशनची वाट पाहात असल्याचंच सांगितलं. दरम्यान अनेक मोठ्या वृत्तपत्रांनी, सिनेजगताला वाहून घेतलेल्या वृत्तपत्रांच्या पोर्टल्सनी श्रद्धांजली वाहायला सुरूवात केली. अनेक हिंदी चॅनल्सवर बातम्या येऊ लागल्या. तरीही मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी निर्णय घेतला, की नाहीच. आपण थांबूया. तोवर एकाही मराठी चॅनलने बातमी चालवली नव्हती हेही महत्वाचं.


दरम्यान एका ग्रुपवर निशिकांतचा व्हेटिलेटर काढल्याचाही मेसेज आला. मी पुन्हा अजय रायना फोन केला. अजय राय आपल्या मतांवर ठाम होते. निशी गेलाच आहे. व्हेंटिलेटर काढायचा आहे. पण निशीची एक टक्काही शक्यता नाहीय वाचायची असं त्यांनी अत्यंत शांतपणे सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार व्हेंटिलेटर काढला नव्हता अद्याप. मी पुन्हा बुचकळ्यात पडलो. अजय राय म्हणतायत, व्हेंटिलेटर काढला नाहीय. कधीही डॉक्टर येऊन 'तो' निर्णय घेतला जाईल. अच्छा. मग? एक लक्षात घेऊया, या दरम्यान निशीच्या जवळच्या वर्तुळातले,.. इंडस्ट्रीतले मातब्बर. मोठे अशा सगळ्यांचे फोन मला येऊन गेले होते.. काहींना मी केले होते. मराठी चॅनल्स वगळता इतर सर्वत्र मिशीच्या बातम्या दिसू लागल्या होत्या. पण आम्ही थांबायचा निर्णय घेतला होताच.
या सिनारियोमध्ये आलेलं प्रेशर शक्य असेल तर समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्या क्षणी फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, चॅनल, पोर्टल सर्वत्र निशी गेल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि सकाळी दहाच्या सुमारस बातमी कळून, निशीच्या जवळच्याकडून कन्फर्म होऊनही आम्ही थांबलो होतो.


त्यानंतर साडेबाराच्या सुमारास एका प्रतिष्ठित राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली. त्यानंतर मात्र, काय करावं कळेना. बातमी द्यावी की थांबावं.. तोवर काही मराठी चॅनलवरही बातमी दिसली. आम्ही वगळता सर्व चॅनलवर बातमी झळकली होती. मग मीही विचार करू लागलो द्यावी का बातमी? आपल्याकडे तर अजय रायचा कोट आहे. देऊया? की थांबूया?
निशीजवळ गेल्या आठ दिवसापासून असलेल्या राय यांनी निशीचं जाणं कन्फर्म केलं आहे. पण अद्याप हॉस्पिटलने अधिकृत जाहीर केलेलं नाहीय. काय करावं?.. द्यावी बातमी..? की थांबावं? निशी गेलाच नसेल तर? निशीच्या बाबतीत मिरॅकल झालं असेल तर? पण इतर सगळेच देतायत बातमी.. मग? आपण इतर मोठ्या वृत्तसमुहांचा हवाला द्यावा का? पण त्यांचा हवाला का द्यावा? राष्ट्रीय वृत्तपत्र जेव्हा बातमी देतं तेव्हा त्यांनी त्यांच्या हैदराबाद इथल्या ब्युरोतून कन्फर्म केलं असेल का? कन्फर्म केल्याशिवाय इतका मोठा समूह बातमी देईल का? त्यांनी कन्फर्म केलं असेल का? आपण केलंय ना कन्फर्म? हो.. आपण केलंय. निशीजवळच्या जबाबदार माणसाने तो गेल्याचं केलंय कन्फर्म. मग त्याच्या हवाल्याने द्यावी का बातमी? हे सगळे विचार सुरू असताना भवतालच्या सर्व म्हणजे सर्व चॅनल्स, पोर्टल्स, वेबसाईट्स सर्वत्र निशीची बातमी झळकत होती. फक्त आम्ही थांबलो होतो. माझ्याकडे तर थेट तिथल्या माणसाचं बोलणं होतं. मग मी ठरवलं की त्या हवाल्याने बातमी द्यायची.
ही घाई होती?
हव्यास होता?
ब्रेकिंगच्या स्पर्धेत खरंच उतरलो होतो का आम्ही?


सकाळी 10 वाजता बातमी कळल्यानंतर जवळपास तीन तास त्या बातमीवर बसून असणं.. वारंवार.. पुन्हा पुन्हा कन्फर्म करणं हेच चालू होतं. अखेर आम्ही बातमी घ्यायचा निर्णय घेतला, पण तो अजय रायच्याच हवाल्याने. मी लाईव्हला उभा राहिल्यानंतर त्या बातमीत हैदराबादमध्ये निशीसोबत असलेल्या अजय राय यांचाच हवाला देत मी बातमी सांगितली. शिवाय, त्याच बातमीत अद्याप हॉस्पिटलकडून अधिकृत जाहीर झालं नसल्याचंही मी मुद्दाम बोललो कारण ती माझी मी जबाबदारी मानतो. ही बातमी चालली न चालली, तोच साधारण 15 मिनिटांनी रितेशचं ट्वीट आलं आणि पुन्हा गोंधळ उडाला.
..
..
..
..
..
साधारण एक-सव्वाला आलेल्या ट्वीटनंतर आणखी एका इंडस्ट्रीतल्याच अभिनेता मित्राने तिथली स्थिती सांगितली. तातडीने आम्ही त्या हवाल्याने दुसरी बातमी केली आणि दिलगिरीही व्यक्त केली. जे चुकलं त्याची दिलगिरी व्यक्त करायला हवीच होती. त्यानंतर चारच्या सुमारास पुन्हा रितेशचं तो गेल्याचं ट्वीट आलं. पण आता शहाणपण आलं होतंच. विसाव्या मिनिटाला हॉस्पिटलचं अधिकृत पत्र मिळालं आणि पुन्हा एकदा बातमी फ्लॅश झाली.
..
..
एनी वे.. ही लेफ्ट अस.
त्यानंतर मीडियाला लोकांनी ज्या लाखोल्या वाहिल्या त्या मिळाल्याच मला. पण घिसाडघाई, ब्रेकिंगची घाई, हव्यास.. या टीकेनं मी जास्त अस्वस्थ झालो. कारण, निशीच्या बाबतीत घाई नव्हती. हव्यास तर त्याहून नव्हता. जर राय यांच्याशी माझं बोलणंच नसतं झालं तर कदाचित ब्रेकही नसती झाली बातमी. हॉस्पिटलचं म्हणणं आल्याशिवाय आपण मृत्यू जाहीर करायचा नाही हे ठरलं होतंच. यापूर्वी अनेक कलाकाराच्या मृत्यूच्या बातम्या कळूनही जोवर कुटुंबिय किंवा डॉक्टर सांगत नाहीत, तोवर त्या दिल्या गेलेल्याच नव्हत्या. निशीच्या बाबतीत तोच न्याय होता. फक्त त्याचे कुटुंबियांऐवजी त्याचे मित्र त्याच्याजवळ होते. त्यापैकीच एका जबाबदार मित्राने कन्फर्मेशन दिलं होतं. हे सुरू असतानाच, एका पॉइंटला सर्वच्या सर्व मिडियामध्ये बातमी झळकू लागलेली असते आणि केवळ आपण थांबलेलो असतो. भवतालचे अत्यंत मोठे, प्रतिष्ठित लोक फोन करून कन्फर्मेशन देऊन तुमच्याकडे बातमी का नाही, असं विचारू लागलेले लागतात.. तेव्हाचा ताण मी अनुभवला. त्याचवेळी मी हैद्राबादमध्ये निशीसोबत असलेल्याचा हवाला द्यायचं ठरवलं आणि बातमी ऑनएअर गेली. हॉस्पिटलचं म्हणणं येईपर्यंत थांबायला हवं होतं, हे आहेच आणि हेच आहे.
या सगळ्या प्रकारानंतर आलेल्या टिप्पण्यांनी अस्वस्थ व्हायला झालं. यात कोण चुकलं होतं? पहिली बातमी दिलेल्या व्यक्तीपासून पार अजय रायर्यंत प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर होता. कुणी मुद्दाम काही केलं नव्हतं. सगळेच निशीवर प्रेम करणारेच तर होते. पण तो दिवस वाईट होता. निशी गेल्याचा दिवस आणखी कसा असणार होता? असो.
..
..
आत्ता जरा हलकं वाटतंय. आता कालपासून आलेली अस्वस्थता कमी होईल आणि निशी गेल्याचं दु:ख थोडं जास्त गडद होईल. जे झालं ते असं झालं. तुम्ही हवं ते बोलायला मोकळे आहातच. पण म्हणून माझी जबाबदारी संपत नाही असा भाग आहे हा.