परिस्थिती कशा काय कोलांटउड्या मारते पहा. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हिंदी इंडस्ट्रीवर किती काय ताशेरे ओढले गेले. ही मजल पार गटार म्हणण्यापर्यंत गेली. या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांवर आरोप केले गेले. सिनेमे करतात म्हणजे काय उपकार करतात काय अशीही भाषा झाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून राज्यात सर्वात आधी चित्रिकरणं सुरू केली, तेव्हाही मनोरंजनसृष्टीच्या नावानं बोटं मोडली गेली. याला अगदी काही महिने उलटतात न उलटतात तोच अचानक बॉलिवूडबद्दल अपार श्रद्धा दाटून आली आहे. जणू मुंबईतलं बॉलिवूड हे आपल्या मुकुटातला कोहिनूर हिरा असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. हा इतका हवाबदल कशामुळे? तर केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाल्यामुळे.


बॉलिवूडबद्दलच्या या दोन भिन्न मतांमधलं कोणंतं मत खरं?


मुंबईत पसरलेल्या, विसावलेल्या आणि रुजलेल्या सिनेसृष्टीने या दोन्ही मतांना फारशी किंमत दिली नाही. कारण ही इंडस्ट्री आपलंच काम करत होती. कारण, तुमच्याआमच्या विचारांची, स्वप्नांची मर्यादा जिथे संपते. तिथून मुंबईतल्या सिनेसृष्टीचं रोजचं जगणं सुरू होतं.


असो तो आजचा मुद्दा नाही.....


मंगेश पाडगांवकरांची एक गाजलेली कविता आहे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आणि माझं सेम असतं. या कवितेच्या ओळींची आठवण आज सातत्याने येते आहे. कारण, गेल्या दोन दिवसांपासून उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्यावरून चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. त्यांनी कलाकारांशी बैठकाही चालवल्या आहेत. बैठकांचा त्यांचा हा सेकंड राऊंड आहे. यापूर्वीच्या बैठकीला कैलाश खेर, उदित नारायण आदी मंडळी हजर होती. आता यावेळी योगी स्वत: मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या धर्तीवर आपल्याकडे फिल्मसिटी उभारण्यावर योगींचा भर आहे. त्यावरून बरीच चर्चा रंगते आहे. मुंबईत वसलेली सिनेसृष्टी तिकडे घेऊन जाण्याच्या शक्यता दाट होऊ लागल्या आहेत. आता इकडची इंडस्ट्री तिकडे कशी हालवली जाणार आहे.. आणि ती कशी हालवू दिली जाणार नाही अशी नेत्यांची स्टेटमेंट्स येऊ लागली आहेत.


खरं काय आहे?


उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना नेमकं काय हवं आहे..? का हवं आहे? आणि त्यांनी उद्या खूप महत्वाचे निर्णय घेऊन तिकडे फिल्मसिटी जरी उभी केली.. तर काय होणार आहे..? खरंच मुंबईतली इंडस्ट्री तिकडे जाईल? हिंदी इंडस्ट्री ज्या 'बॉलिवूड' या टर्मशी जमली आहे ते संबंध बॉलिवूड उद्या तिकडे वसवलं जाईल? नाही!


भारतातल्या एका राज्याचा मुख्यमंत्री आपल्याही राज्यात सिनेउद्योगाला पोषक वातावरण तयार करू पाहातो आहे. त्यासाठी रेकी करायला तो मुंबईत दाखल झाला आहे. आणि त्यावरून लगेच आता आमची इंडस्ट्री आम्ही नेऊ दिली जाणार नसल्याचे सूर उमटतायत. हे इतकं सोपं आहे? मघाशी जशा त्या मंगेश पाडगांवकरांच्या कवितेच्या ओळी आठवल्या याचं कारण हेच. फक्त सिनेमा, सिनेउद्योग.. याबाबत या ओळी थोड्या तोडाव्या मोडाव्या लागतील. त्या अशा,


सिनेमा, सिनेमा म्हणजे सिनेमा असतो, तुमचा आमचा कधीच सेम नसतो


मुंबईतून सिनेमासृष्टी हालवणं हे इतकं सोपं नाही. किंबहुना ते अशक्य आहे. याला कारणं अनेक आहेत. सगळ्यात साधं आणि समजण्यासारखं कारण असं, की मुंबईत सिनेसृष्टी विकसित व्हायला जवळपास 100 वर्षं लागली आहेत. दादासाहेब फाळके, दादासाहेब तोरणे आदींनी मेहनत घेऊन सिनेमाची भारतातली पहिली ज्योत महाराष्ट्रात लावली आणि त्यानंतर त्या ज्योतीचं मशालीत रुपांतर झालं. त्यालाही तब्बल 100 वर्षं जावी लागली. केवळ मोठे स्टुडिओ उभारले.. सेट लावायला शेकडो एकर जागा उपलब्ध करु दिली.. सिनेमाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित केलं म्हणजे इंडस्ट्री तिकडे गेली असं नाही. कारण अशाने तिथे एखादा सिनेमा बनू शकतो. पण इंडस्ट्रीसाठी लागणारं पोषक वातावरण तयार होईलच असं नाही. आपण एक लक्षात घ्यायला हवं, प्रत्येक शहराचं आपलं असं म्हणणं असतं. मागणं असतं आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्या शहराला आपला असा एक राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक वारसा असतो. कोणताही उद्योग संबंधित गावात स्थिरस्थावर व्हायला येतो तेव्हा त्या शहराची ठेवण लक्षात घेऊन तिथे तो व्यवसाय सुरू होतो. मुंबई विकसित व्हायला शहराचा हा वारसाच महत्वाचा ठरला. उपयोगी पडला. सिनेसृष्टी मुंबईत स्थिरस्थावर होण्यासाठी या सगळ्या वारश्यांसोबत इथे असलेला मराठी माणूसही महत्वाचा होता. कारण मराठी माणसाने नेहमीच सांस्कृतिक सादरीकरणावर प्रेम केलं. आता असं प्रेम उत्तर प्रदेशचा नागरिक करणार नाही का? असं अजिबात नाही. जसा मुंबईला आपला वारसा आहे. तसा उत्तर प्रदेशला आणि त्यातला प्रत्येक शहराला आपआपला इतिहास आहे. संस्कृती आहे. आता ज्या भागात योगी आदित्यनाथ यांना फिल्मसिटी उभारायची आहे त्या शहराची गरज, भौगोलिक, समाजिक, सांस्कृतिक गरज आणि मर्यादा लक्षात घेऊन तिथे तिचा पाढा ठरेल.


मुंबई स्वप्ननगरी म्हणून विकसित व्हायला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. तिनं देशाची आर्थिक राजधानी असणं हे एक आहे. शिवाय, इथे रुजलेली सिनेसंस्कृती तितकीच महत्वाची. भारतातलं सिनेमाचं ओरिजिन आपल्या महाराष्ट्रात, मुंबईत उगमाला आलं. त्यामुळे इथल्या लोकांना या सिनेसंस्कृतीची सवय लवकर झाली आहे. शिवाय अस्सल मराठी माणूस नाट्यवेडा तर आहेच. सिनेमा हे नाटकाचंच तर पडद्यावरचं रूप होतं. नाटकाच्या मुशीतूनच सिनेमा तयार झाल्यामुळे मराठी माणसाने सिनेमावर अपार प्रेम केलं. दादासाहेब फाळके, दादासाहेब तोरणे, गोविंदराव टेंबे, व्ही. शांताराम, बालगंधर्व, भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर, दुर्गा खोटे आदी अनेकांनी आपल्या कामाने ही इंडस्ट्री कोल्हापूर-पुणे-मुंबई अशा भागात वसवली. इथे ती वसली ती शून्यातून. गरजेनुसार गोष्टी इथे बनवल्या गेल्या. तयार झाल्या.. आणि मग एकेक करत हा वटवृक्ष विस्तारत गेला. आता त्यालाही 85 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. ही अशी गरजेतून एकमेकांना घेऊन उभी राहिलेली इंडस्ट्री गोवर्धन पर्वतासारखी इकडून उचलून तिकडं नेणं हे निव्वळ अशक्य आहे.


एखादी सृष्टी जिथेकुठे वसते तिथे ती वसण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता कारणीभूत असते. ती मानसिकता केवळ एका उच्चपदस्थ मनुष्याची नसते. खरंतर इथे राजकीय उच्चपदस्थ व्यक्ती खूप नंतर येतो. मुंबईने गरजेतून इंडस्ट्री उभी केली. वाढवली. उद्या मुंबईत असलेल्या सगळ्या गोष्टी उत्तर प्रदेशात पैशाच्या जोरावर जरी नेल्या.. अगदी सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध करुन जरी दिल्या तरी मुंबईची मानसिकता तिथे नेणं निव्वळ अशक्य आहे. हाच नियम आपल्यालाही लागू आहे. तिकडे दक्षिणेत हिंदीच्या तोंडात मारतील असे सिनेमे बनवले जातात. तिथे तिकडचे प्रेक्षक तितक्याच आवडीने सिनेमे पाहतात. तिथे सिनेमाचं कल्चर जास्त गहिरं आणि गांभीर्याने भारलेलं आहे. विमानाने तीन तासांच्या अंतरावर असूनही मुंबईला दक्षिणी चित्रपटसृष्टीत असलेला आपलेपणा.. तिथे रुजलेला सिनेसंस्कृतीचा ओलावा घेता आलेला नाही. आता तो इथे नाहीच का? तर तसं नाही. अगदी सोपं सांगायचं तर मराठी माणूस मराठी नाटकांवर ज्या पद्धतीने प्रेम करतो तसा दक्षिणेतला माणूस सिनेमावर प्रेम करतो. मुंबईत इंडस्ट्री रुजू लागली तेव्हा तिने तितका ओलावा घेतला नाही. पण व्यावसायिकता पूर्णपणे अंगी भिनवली. ही व्यावसायिकता अंगी भिनवताना ती दक्षिणी सिनेसृष्टीपेक्षा जास्त उजळून गेली. मुंबईची ती गरज होती म्हणा.. किंवा जे आहे त्यापेक्षा जास्त दाखवायचा स्वभाव म्हणा.. असं काहीही.. मुंबईत असलेला स्मार्टनेस या इंडस्ट्रीतही आला. उत्तर प्रदेशात सिनेसृष्टी विकसित होणार असेल तर त्या शहराच्या, प्रदेशाच्या गरजा ओळखून ती विकसित व्हायला हवी. ही प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमधून आजच्या पिढीला जावं लागेल. हा झाला एक भाग.


दुसरा भाग काळाचा आहे. काळानुरूप सिनेमासृष्टीने आपली कुस बदलली आहे. मुंबईमध्ये एकेकाळी दणक्यात चित्रिकरणं चालत असत. पण अलिकडे पाहिलं तर त्या चित्रिकरणात घट झाली आहे. कारण, सिनेमाचा बाज बदलला आहे. एरवी लार्जर दॅन लाईफ दिसणारे चित्रपट आता वास्तवदर्शी बनू लागले आहेत. त्यामुळे अशा चित्रपटांना हवी असतात रिअल लोकेशन्स. म्हणून अत्यंत मोजक्या चित्रपटांची चित्रकरणं सध्या मुंबईत सुरू आहेत. ज्या चित्रपटांच्या कथानकात मुंबई आहे किंवा ज्यांना स्टुडिओज हवे आहेत अशांना मुंबईत थांबावं लागतं. अन्यथा बनणाऱ्या अनेक चित्रपटांची चित्रिकरणं ही आवश्यक त्या रिअल लोकेशन्सवर होऊ लागली आहेत. हिंदीच कशाला, मराठीतही एरवी मुंबईत चालणारी चित्रिकरणं थोडी पुढे सरकून मीरा-भाईंदर, ठाण्यात सरकलीत. तर काही चित्रिकरणं भोर, वाई, सातारा, सोलापूर, कोल्हापूर-सांगली, नाशिक या भागांत सरकली आहेत. अर्थात रिअल लोकेसन्ससोबत त्याला इतरही कारणं आहेत. मुंबईत येणारा खर्च.. मुंबईवर आलेला गर्दीचा अतिरिक्त ताणही याला कारणीभूत आहे. कारण, कितीही इच्छा असली तरी कोणत्याही शहराला भौगोलिक मर्यादा असतेच.


आता काळाचा महिमा आहे. उद्या कदाचित पुन्हा सगळी चित्रिकरणं मुंबईत होतील.. किंवा होणारही नाहीत. एकिकडे फिल्मसिटी बनली म्हणून दुसरीकडे असलेली फिल्मसिटी ओसाड पडली असं कधी होत नसतं. मुंबईत दादासाहेब फाळके चित्रनगरीत ढिगभर चित्रिकरणं चालू असताना हैदराबादची रामोजी फिल्मसिटीही ओसंडून वाहात आहेच.. . कारण, रामोजी फिल्म सिटीने सातत्याने आपल्या दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये आवश्यक तिथे वाढ केली. अद्ययावत सुविधा देण्याकडे कल ठेवला. मुंबईलाही ते करावं लागेल. स्पर्धा वाढली की सुविधांचा कस लागतो. त्यातून भलं होतं ते प्रॉडक्टचं. म्हणजे इथे अर्थात सिनेमाचं आणि पर्यायाने ते पाहणाऱ्या प्रेक्षकाचं.


सिनेमा हा कारखाना नाहीय हे आपण लक्षात घ्यायला हवं. हे अशासाठी की आपल्याकडे पेपरात बातम्या येतात ना, उदाहरणार्थ, 'उद्योगपतीने आपला अमुक गाड्यांचा प्रकल्प गुजरातेत हालवला.' आणि मग त्यातून उद्योग, रोजगार तिकडे नेल्याची चर्चा होते. मुळात सिनेसृष्टी हा प्रकल्प नाहीय. इथे एक अधिक एक बरोबर दोन असं नसतं. ही एक निर्मिती प्रक्रिया आहे. इट्स अ क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी ही माणसाच्या मानसिकतेवर अवलंबून असते. आणि माणसाची मानसिकता तो कुठे काम करतोय.. तिथे त्याला कसं कितपत पोषक वातावरण मिळतं आहे यावर अवलंबून असते.....


असा सगळा मामला असताना, एखादा परराज्यातला मुख्यमंत्री आपल्या राज्यात चौकशीला आला म्हणून आपली इंडस्ट्री जणू तो आपल्यापासून तोडून नेत असल्याचा भास निर्माण करणं हे निव्वळ बालीशपणाचं आहे. त्यातून तो मुख्यमंत्री काही करू पाहात असेल करु दे. उत्तम सुविधा देऊन मुंबईवरचा ताण कमी होणार असेल होऊ दे. गेला तर थोडाफार रोजगारच तिकडे जाईल ना? जाऊ दे. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या फिल्मसिटीमुळे रोजगार मिळाला आणि मुंबईतून काही मंडळी तिकडे परत गेली तर समुद्रातून दोन बादल्या पाणी काढण्यासारखं होणार आहे. एखादा सिनेमा बनवणं.. एकाचे चार होणं.. चाराचे दहा सिनेमे जरी झाले.. तरी तिथे लगेच सिनेसृष्टी अवतरत नाही. तिथे फक्त सिनेमे बनू लागतात. सिनेसृष्टी तयार व्हायला कैक वर्ष खर्ची घालावी लागतात. एक आख्खी हयात निघून जाते आणि मग पुढच्या पिढीला त्याचं फळं मिळण्याची शक्यता निर्माण होते. देवा, मुंबई हे सगळं करून बसली आहे. आता आपण थोडा विश्वास मुंबईवर ठेवूया.