दहा डिसेंबर  हा आंतराष्ट्रीय मानवाधिकार दिन ! मानवाधिकार हा तसा काही लोकांसाठी जिव्हाळ्याचा तर काहींसाठी तिरस्कार आणि टीकेचा विषय ! मानवाधिकार कार्यकर्ते म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतात ते NGO किंवा तत्सम सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे बुद्धीजीवी लोक.  पण आपल्याही नकळत आपल्या मानवाधिकारांसाठी प्राण पणाला लावणारा समाजाचा असा एक घटक आहे ज्यांचं ह्या दिवशी स्मरण होणं गरजेचं आहे.


ह्या दिवशी  मला आठवतात  दहशतवाद्यांच्यासुद्धा मानवी हक्कांचा  विचार करून त्या हक्कांचं संरक्षण करत आपले प्राण गमावणारे  2/9 गोरखा बटालियनचे   कर्नल एम.एन. राय. जानेवारी 2015 ची गोष्ट आहे.  तत्कालीन  जम्मू काश्मीरमधल्या  त्राल  ह्या ठिकाणची . एका घरात दहशतवादी लपले आहेत अशी पक्की बातमी मिळाल्यावर भारतीय सैन्याच्या एका  तुकडीने त्या घराला घेराव घातला . कर्नल राय ह्या तुकडीचे नेतृत्व करत होते . दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला आणि सैन्याने त्याला प्रत्युत्तर दिले.


अचानक त्या घरात लपलेल्या दहशतवाद्याचा भाऊ आणि वडिल बाहेर आले आणि त्यांचा दहशतवादी  मुलगा शरणागती पत्करायला तयार आहे असं सांगू लागले .' शरण आलेल्याला जीवदान द्यायचे'  ह्या भारतीय सैन्याच्या तत्वानुसार कर्नल राय ह्यांनी त्या दहशतवाद्याला शरणागती पत्करण्याची संधी देण्याचं ठरवलं . ह्या संधीचा गैरफायदा घेऊन दहशतवाद्यांनी कर्नल राय ह्यांच्यावर गोळीबार केला ज्यामध्ये कर्नल राय मृत्युमुखी पडले.   एका दहशतवाद्याचा शरणागतीचा हक्क (Right to surrender )  अबाधित राखण्यासाठी आमच्या एका सैनिकानी हौतात्म्य पत्करलं.


या दिवशी आठवण होते  छत्तीसगढ पोलिसांची  ज्यांनी एका चकमकीत जखमी झालेल्या माओवादी नेता हेमचंद मडावी ह्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याला हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल केले, अशा असंख्य घटना  ज्यामध्ये जखमी माओवाद्यांना रक्तदान करून पोलिसांनी त्यांचे प्राण वाचवले . ह्या दिवशी आठवण होते शरणागत माओवादी सुखमतीची जिने पोलिसांना विनंती केली ती शरणागत झाली हे जाहीर करू नका म्हणून . त्याचे कारण तिला भीति होती की माओवादी गावात राहणाऱ्या  तिच्या आईला मारून टाकतील . चार वर्ष पोलिसांनी ती शरणागत झाल्याचे जाहीर केले नाही आणि नंतर तिच्या परवानगीने जाहीर केले . माओवाद्यांसारख्या अमानुष शत्रूचा सुद्धा जगण्याचा (Right to life ) आणि वैद्यकीय उपचार मिळण्याचा  अधिकार (Right to medical treatment)  अबाधित रहावा म्हणून  पोलिसांचे हे प्रयत्न !


ह्या दिवशी आठवतात ते  26/11 च्या हल्ल्यातल्या दहशतवादी अजमल कसाबच्या कायदेशीर  हक्कांसाठी  भारतानं  उपलब्ध करून दिलेली संसाधनं आणि केलेला खर्च ... याकूब मेमन सारख्या दहशतवाद्यासाठीसुद्धा मध्यरात्री उघडलेलं  न्यायालय .. हे सगळं  न्यायालयीन अधिकारांच्या (Right to fair hearing  and Right to judicial process )  रक्षणासाठी !!



ह्या दिवशी आठवतात त्या घटना ज्यामध्ये पोलिस शरण आलेल्या माओवादी जोडप्यांना त्यांचं लग्न लावून देण्यासाठी मदत तर  करतातच  आणि त्याच बरोबर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करून त्यांना माओवाद्यांपासून संरक्षण सुद्धा देतात . माओवादी त्यांच्या दलम मधल्या जोडप्यांना एकत्र राहू देत नाहीत आणि पुरुषांना जबरदस्तीने नसबंदी करायला लावतात .  शरण आल्यावर पोलिस अशा जोडप्यांची जबाबदारी घेवून त्यांच्या 'लग्नाच्या  हक्काचे  (Right to marry) आणि 'कुटुंब नियोजनाच्या ' (Right to plan a family )  हक्काचे संरक्षण करतात .



ह्या दिवशी आठवतात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अनोळखी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची तमा न बाळगता मदतीसाठी धावून जाणारे गणवेशातील असंख्य स्त्री आणि पुरुष! जम्मू काश्मिर , चेन्नई , केरळ , महाराष्ट्र ह्या ठिकाणचे पूर आठवतात ? गुजरात किंवा महाराष्ट्रातील भूकंप ? त्सुनामी सारख्या आपत्ती ? सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचे (Right to life ) संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या  जिवावर उदार होणारे हे गणवेशातील लोक कायम तत्पर असतात .


ह्या दिवशी आठवतात भारताने लढलेल्या लढाया !  करोडो भारतीयांचा आणि पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचासुद्धा  राष्ट्रीयत्वाचा  (Right to Nationality),  संरक्षणाचा (Right to security ) आणि जगण्याचा (Right to life )  अधिकार अबाधित रहावा म्हणून हौतात्म्य पत्करणारे हजारो सैनिक !



गणेशोत्सव, ईद , नाताळ , नवीन वर्षाचं स्वागत किंवा  इतर  कोणताही सण उत्सव आठवा . प्रत्येक भारतीयाच्या   'सांस्कृतिक आणि धार्मिक हक्काचे ' ( Right to religion and cultural rights )   संरक्षण  करताना बंदोबस्तासाठी रात्रंदिवस उभे असलेले  पोलिस गणवेशातील पुरुष आणि स्त्रिया  डोळ्यासमोर येतात.



ह्या  आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी ह्या सगळ्यांचं स्मरण होतं  जे कोणताही गाजावाजा न करता आपल्या  सगळ्यांच्या मानवाधिकाराचं रक्षण करत असतात . आणि त्यांच्या ह्या कामाची मानवाधिकराच्या दृष्टिकोनातून कधी    दखलही घेतली जात नाही . मानवाधिकार हा टीकेचा किंवा तिरस्काराचा विषय नाही .  मानवाधिकाराचा गैरवापर करणारे ढोंगी लोक असतात परंतु त्याचबरोबर वरती उल्लेख केल्याप्रमाणे खरे मानवाधिकार रक्षक पण असतात . ते समाजाच्या  मानवाधिकारांसाठी उभे राहतात . समाजानी त्यांच्या मानवाधिकारांसाठी   सुद्धा उभं राहण्याची गरज आहे.