राज ठाकरे शिवसेना-भाजप युतीच्या विजयातला मोठा अडसर ठरतील?


मनसेमुळे युतीचं किती नुकसान होईल?

मनसेची स्वत:ची हक्काची किती मतं आहेत?

कट्टर मनसैनिकांची मतं काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वळतील?

असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. त्यांचं उत्तर 23 मे रोजी म्हणजे निकालाच्या दिवशी मिळतीलच.

पण खरंच मनसेचं उपद्रवमूल्य नेमकं किती आहे, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो, त्यासाठी गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतल्या मनसेच्या कामगिरीवर नजर टाकायला हवी.

2009 साली राज ठाकरे अगदी फॉर्मात होते, पक्ष नवा होता, मराठीच्या मुद्द्यावर सामान्य जनतेचा पाठिंबाही मिळत होता. शिवसेना आणि भाजप विरोधी पक्ष म्हणून अपयशी ठरले होते. सामान्य जनता त्यांच्यावर नाराज होती. विरोधी पक्षाची पोकळी मनसे भरुन काढेल, अशी आशा निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत राज ठाकरेंच्या सभा गाजल्या, लोकांना मुद्दे भावले. लोकसभेसाठी 11 उमेदवार त्यांनी उभे केले होते. मनसेचा उमेदवार निवडून येणार नाही हे सर्वांना माहिती होतं, तरीही लोकांनी लाखाच्या घरात मनसे उमेदवाराला मतं दिली. मनसेची ताकद दिसली. पक्षाचा, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाली. मनसेच्या उमेदवारांनी एक-एक लाख मतं मिळवली, अनेक जागांवर त्याचा थेट फटका भाजपसेना युतीच्या उमेदवारांना बसला.

- ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या फक्त दोन अडीच हजार मतांनी हरले तिथे मनसेच्या शिशिर शिंदेनी जवळपास दोन लाख मतं मिळवली होती.

- तर उत्तर मुंबईत राम नाईक यांच्यासारखा अभ्यासू खासदार फक्त पाच हजार मतांनी हरला तिथे मनसेच्या शिरीष पारकर यांनी दीड लाख मतं खाल्ली होती.

- उत्तर पश्चिम मुंबईत गुरुदास कामतांनी शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांना 38 हजार मतांनी हरवलं, तिथे मनसेच्या शालिनी ठाकरेंनी तब्बल सव्वा लाख मतं घेतली होती.

- नाशिकमध्ये तर मनसेचे हेमंत गोडसे याांनी दोन लाखांवर मतं मिळवली. ते फक्त 22 हजार मतांच्या फरकाने हरले. तर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.

हीच गत कमी अधिक प्रमाणात सर्व 11 मतदारसंघात दिसली. मनसेने शिवसेनेची मतं खेचून घेतली, असं जाणकार सांगतात. या मतविभाजनाचा थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. आघाडीचे 25 तर युतीचे 20 खासदार निवडून आले. मनसेचा पाया थोडा मजबूत झाला आणि 2009 च्या विधानसभेसाठीची रंगीत तालिमही झाली. सहा महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 5.71 टक्के मतं मिळवली. पहिल्याच फटक्यात लोकांनी मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून दिले. मात्र त्यानंतरच्या पाच वर्षात मनसेच्या इंजिनचा वेग कमी कमी होत राहिला.

2014 साली राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मोदी लाट होती, राज ठाकरेंनीही मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. राज यांनी फक्त दहा ठिकाणी त्यातही शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. या दहा ठिकाणी मनसेला कुठे 26 हजार तर कुठे सव्वा लाख अशी एकूण सात लाख 8 हजार मतं पडली होती. म्हणजे मोदी लाटेत सुद्धा पडलेली ही मतं मनसेची हक्काची मतं असं आपण म्हणू शकतो. त्यातच 2014 साली मनसेने विधानसभेच्या 219 जागा लढवल्या होत्या त्यात 3.15 टक्के म्हणजे जवळपास 16 लाख 65 हजार मतं मिळवली होती. मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला होता तो सुद्धा आता पक्ष सोडून गेला आहे. खरंतर मोदीलाटेत मिळालेली ही साडे सोळा लाख मतं मनसेची हक्काची म्हणता आली असती, पण त्यानंतरही पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. ज्यांच्या जीवावर मनसे मोठी झाली अशी अनेक नेतेमंडळी आज मनसे सोडून शिवसेना किंवा भाजपमध्ये सामील झाली आहेत. त्याचाच फटका मुंबई पालिकेतही बसला. 2012 साली मुंबई पालिकेत 27 नगरसेवक होते, ते 2017 साली 7 वर आले ते सुद्धा पक्ष सोडून गेले आहेत.

2014 पर्यंत शिवसेनेकडून मनसेकडे वळलेला दादर, माहिम, लालबाग, परळसारख्या मराठीबहूल भागातील मराठी मतदार पुन्हा शिवसेनेकडे वळला असल्याचं चित्र 2017 च्या महापालिका निवडणुकीत दिसलं.

मुंबईतल्या 50 लाख मतांपैकी साडे चौदा लाख मतं मिळवण्यात शिवसेना यशस्वी झाली होती. त्याखालोखाल जवळपास 13 लाख 93 हजार मतं भाजपनं मिळवली होती.

2012 साली साडे नऊ लाख मतं मिळवणाऱ्या मनसेला 2017 साली फक्त 3 लाख 94 हजार मतं मिळवता आली. म्हणजे पाचच वर्षात तिपटीने मतं घटली. हीच स्थिती पुणे आणि नाशिक महापालिकेत पाहायला मिळाली.

त्यामुळे एकतर मनसेची हक्काची मतं कमी झाली आहेत, त्यातली जी काही उरली असतील ती सगळी मतं काँग्रेस राष्ट्रवादीकडे वळणं कठीण. या मतांमध्ये काही टक्क्यांचा स्विंग मोदींचं महाराष्ट्रातलं गणित बिघडवू शकेल या आशेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचं नेतृत्व अवलंबून आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून पाहायला आवडतील असं सांगणारा पहिला राजकारणी ते मोदी-शाहमुक्त भारताचा नारा बुलंद करणारा पहिला राजकारणी असा राज ठाकरेंच्या मनसेचा इंजिनचा प्रवास आहे. राज ठाकरेंनी भाजपची साथ का सोडली, ते अचानक इतके कडवट मोदीविरोधी का बोलू लागले याची खरी कारणं आपल्याला कदाचित कधीच कळणार नाहीत.

एक गोष्ट मात्र खरी मनसेला आणि राज ठाकरेंना रिडीकूल करुन चालणार नाही. त्यांनी थेट मोदींना अंगावर घेतलं आहे. मरगळलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही त्यांनी जोश भरलाय. त्यांच्या या बदलेल्या भूमिकेला मनसैनिक किती साथ देतो यावर सगळी गणितं अवलंबून आहेत. सभांमधली गर्दी मतांमध्ये बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे, मात्र त्यांच्या धरसोडपणाला कंटाळलेले अनेक मतदार आहेत. राज ठाकरे सांगतात तेवढा मोदींचा कारभार वाईट नाही, असं मानणारेही अनेक आहेत. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कट्टर विरोध करत ते लहानाचे मोठे झाले, त्यांच्यासाठीच आज ते प्रचार सभा घेत फिरत आहेत. हा वैचारिक गोंधळ न आवडणारे अनेक आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे सध्या नॉन प्लेईंग टीमचे नॉन प्लेईंग कॅप्टन आहेत, त्यामुळे फक्त राज म्हणतात म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीला मत का द्यायचं असा प्रश्न विचारणारे सुद्धा अनेक आहेत.

एखाद्याबद्दल वाटणारा सामूहिक द्वेष किंवा राग वेगवेगळ्या लोकांना लगेच एकत्र आणतो असं म्हणतात, सध्या देशातलं वातावरण काहीसं तसंच आहे. राज ठाकरेंनी सुद्धा या लोकसभेला एक मोठी राजकीय जोखीम स्वीकारली आहे, याचं त्यांना काय फळ मिळतं यावर त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं विधानसभेतलं भवितव्य अवलंबून असेल.