"जब कूछ ऐसा कमाऊंगा के गांव के लिये कुछ बडा कर सकू, तभि गांव में वापस पैर रखुंगा. आपकी बहोत याद आयेगी अम्मी, अब्बा!!."


---

वयाच्या 20 व्या वर्षी घर, गाव, तालुका, अन देश सुद्धा सोडलेला हा माणूस. जगातले अनेक देश भटकला. पडेल तिथं झोपला, मिळेल ते जेवला, अन जमेल तसं तुटकं-फुटकं हातभर जागेवर तग धरून राहिला. अनेक वर्षे फक्त अन फक्त कष्ट करत राहिला, परिस्थिती अन आयुष्याशी झगडत झगडत शेवटी काही वर्षाखाली थोडासा स्थिरस्थावर झाला. पण अजून समाधान मिळावं असं काही आयुष्यात घडलं नव्हतं...

दरम्यानच्या काळात 2012 च्या आसपास वडील वारले. ते दुःख त्यानं तिथं परदेशात एकट्याने कुणीही सोबत नसताना कसं झेललं, हे तो "फक्त खूप अन सारखं फुटून रडायचो" एवढंच अजूनही डोळे पाणावत सांगतो. घेतलेली 'खरी' शपथ त्याला मोडायची नव्हती, वडील वारले तरी देशात वापस मात्र आला नाही.

काही वर्षे गेली. अन आता उद्योगात चांगला जम बसायला लागला होता. गावाकडं फोन वगैरे सगळं व्हायचं पण गावासाठी काही ठोस करता येईल असं अजूनही काही नव्हतं. श्रीमंत व्हायचं होतं पण श्रीमंती फक्त इथल्या स्व-मातीतल्या लोकांच्या चांगल्या कामासाठी, त्यांच्या उद्धारासाठी वापरायची होती. जम बसता बसता अजून एका वाईट बातमीने त्याचं परत एकदा कंबरडंच मोडून टाकलं. वडलापाठोपाठ आई सुद्धा जग सोडून गेली होती. पुन्हा तो तेच सांगतो, 'फक्त खूप रडलो एवढंच आठवतं'. एकदा वाटलंही त्याला की काय ही शपथ, थकलो,  जाऊ आता गावाकडं परत. आपण आई बापही गमावले. पण गावाच्या बदलासाठी घेतलेली शपथ सोडायची अजूनही त्याची मानसिक तयारी होत नव्हती. आई बापाला शेवटचं जिवंत (अन मृत) बघायचंही त्याच्या नशिबात नव्हतं. दुःख मात्र तसंच झेलत राहिला.

शेवटी उद्योगात चांगला जम बसला. आज तो भारतातल्या अनेक राज्यातून चांगल्या गुणवत्तेचा माल (शेंगदाणे, मिरची, हळदी वगैरे) "चांगल्या" किमतीत खरेदी करतो अन तो परदेशात विकतो. मिळालेल्या पैशातून त्याने आता भावाच्या मदतीने इथल्या लोकांसाठी स्वतःच्या दोन कंपन्या सुरू केल्यात, गावाच्या जवळ एका ठिकाणी प्रोसेसिंग युनिट ही उभारलंय. विशेष म्हणजे पुणे मुंबई वगैरे न करता , त्यानं कंपिनीचं सुसज्ज असं हेडऑफिस आपल्या गावात म्हणजे रातंजन या खेडेगावातच उभारलंय.. गावात स्वतःच्या खर्चातुन सिमेंटचे रस्ते बांधलेत. अनेक ठिकाणी लाईट्स लावलेत,  गावातल्या जिल्हा परिषद शाळेला 44 ईंची टीव्ही दिला आहे, अंगणवाडीला ISO मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, गावात अनेक ठिकाणी टॉयलेट्स बांधायचं काम सुरू आहे, गावातल्या दलित राहतात त्या भागाला साठे सिटी म्हणून develope करण्याचं कामही सुरू आहे. आणि हे सगळं बघायला एकदा फक्त गेल्या काही वर्षापूर्वी तो येउन गेला.

आता यावर्षी त्याला समजलं की गावात कुठल्यातरी पाणी फौंडेशनची काहीतरी स्पर्धा सुरुय. पण दुर्दैव असं की गावात उत्साह काहीच नाहीये, शेवटी पाणी फौंडेशन टीमने थोड्या ओळखीवर अन यांचा एक मेसेज बघून यांनाही कॉल केला की गाव प्रतिसादा अभावी स्पर्धेतून बाद होत आहे. हा त्यांना धक्का होता, "एवढी सोन्यासारखी संधी गाव का गमावत आहे, त्यांना समजत नव्हतं??" त्यांनी मग ही पूर्ण प्रोसेस समजून घेतली. त्यांना कळून चुकलं की थोडं श्रमदान झालं तर नंतर मशिनने गावात भरपूर काम करून घेता येईल. मग यांनी आपला पुतण्या (एका कंपनीचा डायरेक्टर) अन पुतणी (BSc Agree, UPSC apperaing) यांना गावात त्यांचं स्वतःचं सगळं सोडून, एकाला गुजरात तर दुसऱ्याला मुंबईहून बोलवून घेतलं. त्या दोघांना अन स्वतःच्या भावाला समजावून सांगून, गावातली जेवढी लोकं येतील त्यांची मोट बांधायला लावली. काम समजावून सांगितलं.

आपण गावात चांगलं काही करू शकतो याचा विश्वासही दिला अन उत्साह ही वाढवला. त्यांची प्रत्येक शब्दातली अन डोळ्यातली तळमळ बघण्यासारखी होती. हे सगळं त्यांचं तिकडं बसून सुरू होतं. इथल्या ऑफिसमध्ये विडिओ कॉनफरन्सिंग द्वारे रोज आढावा सुरूच होता. संपूर्ण लक्ष एकडंच. तगमग वाढत होती. जेवढं शक्य तेवढं श्रमदान आता गावात रोज सुरू झालं. CCT , LBS, मातीपरीक्षण, रोपवाटिका, बघता बघता काम आकार घेऊ लागलं..

अन तो दिवस उघडला जेव्हा, गावांना मशीन द्यायला सुरू झाल. जिथं मशीनच्या डिझेल साठी अनेक गावं अजून धडपडत होती. तिथं या माणसाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता एकरकमी 2 लाख रुपये फक्त डिझेल साठी गावाकडं पाठवले. तो दिवस तो, आजचा दिवस गावात एक पोकलेन मशीन अविरत , रात्रं दिवस अन रोजच गावच्या माथ्यावर सुरू आहे. काम सपासप उरकलं जातंय. त्यांना स्पर्धेत नंबर येण्याविषयी काहीच अपेक्षा नाही, फक्त "गाव प्रचंड पाणीदार व्हावं, इथल्या आई बापड्यांना, शाळा शिकणाऱ्या माझ्या जिजाऊच्या लेकींना अभ्यास सोडून पाणी आणण्यात वेळ जाऊ नये, हे मात्र नक्की अन मनातनं वाटतंय." कारण "पाणी आलं की गावाची आर्थिक स्थिती बदलते" हे सूत्र जगभर आहे हे त्यांनाही माहितय.. शेवटी शेवटी तर ही त्यांची तगमग एवढी टोकाला पोचली की पाणी फौंडेशनचं संपूर्ण काम समजून घेतल्यावर त्यांना या कामावर एवढा विश्वास बसला की "31 वर्षात फक्त एकदा गावात आणि देशात परतलेला हा माणूस, न राहवून शेवटी आज इंडोनेशिया वरून डायरेकट या आपल्या गावात , आपल्या माणसांत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज स्वतः हातात कुदळ घेऊन श्रमदानासाठी उतरलाय." हे जितकं अविश्वसनिय तितकंच खरंय. खरंतर तो तिथून नाहीतरी सगळं manage करतच होता, त्याला इथं यायची काहीच गरज नव्हती. पण तो पुरा एका आठवड्यासाठी आपली सगळी ऑफिसेस बंद ठेवून हा पूर्ण आठवडा गावात "महाश्रमदान आठवडा" म्हणून घेण्यासाठी आलाय. कारण त्याला वाटतंय की मशीनने 'जलसंधारण' होईल पण लोकांचं 'मन संधारणही' कुणीतरी करावंच लागेल. अन पाणी फौंडेशन सारख्या जादूमयी संस्थेचे कामही त्यांना पाहायचच होतं. त्यांचं इकडं येणं ही gesture म्हणून प्रचंड मोठी ताकदीची गोष्ट आहेच आहे. पण त्यांचं खरं काम आता सुरू झालंय. कारण आजवर कमावलेलं सगळंच्या सगळं या कामात टाकायला ते तयार आहेत. म्हणतात की "मी 22 मे ची वाट आता वेगळ्याच गोष्टीसाठी बघतोय. कारण एकदा स्पर्धा संपली की "या सगळ्या मशिन्स मोकळ्या होतील. मग मला 10 पोकलेन मशीन या माथ्यावर लावून सगळं गाव पाणीदार करता येईल. सध्या मशीनची कमतरता आहे अन इतर गावांना आमच्या गावामुळे त्रास द्यायची आमची इच्छा नाहीये. पण एकदा का 22 मे ला ही स्पर्धा संपली की एक डिझेलचा संपूर्ण टँकर गावात उभा करून अन 10 पोकलेन आम्ही रात्रंदिवस गावाच्या शिवारात या सगळ्या डोंगरावर चालवणार आहोत......"

एकुणात, गावात काहीही काम सुरू नसतानाही अन फोनवर बोलताना केवळ या माणसाची गावा विषयी असणारी तळमळ बघून , "मी फक्त शरीराने देशाबाहेर आहे, माझं मन अजूनही गावातल्या मातीत, शाळेच्या बेंचवर, ओढ्यातल्या मव्हळावर, बांधावरच्या चिंचावर रमतय" असं म्हणणणारया अन सध्या परदेशात ऐशो आरामात राहत असूनही गावाविषयी कण कण मन जळणाऱ्या या एकट्या माणसाकडे बघून 'बार्शी तालुका पाणी फौंडेशन टीमनंही' या गावाकडे सुरुवातीपासून विशेष लक्ष पुरवत, कितीही busy असले तरी दोन दिवसाआड या गावाला भेट देत, आखणी वगैरेंच्या कामात मदत करत आज गाव कामात पूर्ण उभं केलय... "जिथं एक टक्का काम होणं शक्य नव्हतं तिथं आज फक्त एका , या एका माणसाच्या तळमळीमुळं आणि पाणी फाऊंडेशनने 'आऊट ऑफ द वे' जाऊन  केलेल्या सहकार्यामुळ , थोडं थोडकं नाही तर तब्बल "10 कोटी" लिटरच्या वर पाणी मुरवण अन साठवण क्षमता गावात निर्माण झालीय...

---

"गाव परदेशात नेणं तर मला शक्य नाही, पण एक दिवस या गावात इतके उद्योग उभारेन की परदेशच गावात आल्यासारखा वाटला पाहिजे".......

असं म्हणत आपलं तन मन अन धन, "खरया अर्थाने" पाणी फौंडेशनच्या या कामात झोकुन देणाऱ्या या "सादिक काझीना" तमाम गाव, तालुका, राज्य अन देशाकडून मानाचा मुजरा...

तो यासाठी की "देश दिल्लीतून कमी अन गल्लीतून बदलायला जास्त सुरुवात होत असते"...

अशा लोकांमुळे फक्त, राष्ट्र उभा राहत असतं...

तुमचा त्याग अन तळमळ एकमेका द्वितीय आहे सादिक भाई, परदेशातून मदत करणारे, प्रोत्साहन देणारे, शहरातून एक दिवस गावात येणारे असे अनेकजण पाहिलेत, त्यांचे आभारच........पण 31 वर्षात फक्त एकदा गावी आलेला माणूस आज परदेशातून फक्त पाणी फौंडेशनच्या श्रामदानासाठी गावात आलेला पठ्ठयाही या डोळ्यांनी बघितला....

मुजरा...!!!