पंडित ह्रदयनाथ मंगेशकर...मराठी संगीतसृष्टीला पडलेलं एक सुरेल स्वप्न नव्हे तर स्वप्नील संगीतसृष्टीला प्रयोगशीलतेची जोड देत वास्तवाचं भान आणणारा एक क्रांतीकारी संगीतकार. कवितेचं शरीर, हे शब्द असतात आणि त्यातला भाव हा त्या कवितेचा आत्मा. शब्दांना चालबद्ध करणं सोपं असतं पण कवितेला संगीतबद्ध करणं हे महत् कठीण काम. कारण ते करत असताना कवितेच्या आत्म्याला धक्का लावायचा नसतो, आणि त्यासाठी संगीतकाराला स्वतःचा प्राण त्यात ओतावा लागतो.


ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव एकदा म्हणाले होते की, संगीतकाराचं काम हे अंतरपाटासारखं असावं. एकदा का कवितेचं गाणं झालं की मग संगीतकाराने ते गाणं आणि प्रेक्षक यांमधून अंतरपाटासारखं दूर व्हावं. पण जेव्हा आपण ह्रदयनाथांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकतो तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्या गाण्यापासून ह्रदयनाथांना वेगळं करुच शकत नाही. एक अवीट आणि अमीट ठसा त्यांच्या प्रत्येक चालीवर उमटलेला आहे.


शब्दांना सप्तसुरांमध्ये बांधणं सोपं असतं पण त्या शब्दात दडलेल्या भावर्थाला सुरात पकडता येत नाही, त्या भावांना, भावनांना मात्र ते सुर बहाल करावे लागतात. ज्याप्रमाणे एखादा कवी आपल्या कवितेचं स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे लाड करतो, त्याचप्रमाणे त्या कवितेचं संगोपन करणं, तिला सुरांच्या माध्यमातून योग्य वळण लावण्याचं काम हे संगीतकाराचं असतं. थोडक्यात काय जर कवी हा देवकीच्या भूमिकेत असेल तर संगीतकाराला मात्र यशोदा व्हावं लागतं. आणि यशोदेची ही भूमिका ह्रदयनाथांनी प्रत्येकवेळी अगदी चोख बजावलेली दिसते.


समोर शब्द आले, मीटर बसवलं, चार दोन वाद्यांचा ताल पकडला की लागली चाल, संगीत देणं ही एवढी सोपी प्रक्रिया ह्रदयनाथांसाठी कधीच नव्हती. मुळात समोर आलेल्या कवितेचं गाणं होऊ शकतं का? हा विचार ह्रदयनाथांच्या ठायी प्रत्येक ठिकाणी दिसून येतो. प्रत्येक कवितेला वेगळा असा स्वतःचा एक सुगंध असतो. आणि कवितेचा सुगंध रसिकांसमोर कसा मांडायचा याचं गुपीत ह्रदयनाथांनी अचूक कळलं होतं. आणि म्हणूनच ‘नभ उतरु आलं’ म्हणताना पाऊस बरसत नसतानाही आपलं मन झिम्माड होऊन जातं, तर ‘केव्हा तरी पहाटे’ सारखं गाणं ऐकतं अपूर्णत्वाची जाणीव होत आपणं शांत, मुग्ध होतो. ‘जीवलगा राहिले दूर घर माझे’ या गाण्यातली सुरवातीलाच जीवलगालाला घातलेली आर्त साद आपल्या जीवाला चटका लाऊन जाते. आणि ‘गगन सदन’ मधली प्रासादिकता तर इतकी त्यातले काही स्वर जरी घरात तरळले तरी संपूर्ण घराचं मंदीर होऊन जातं. तर द्वैत अद्वैत भावाच्या चौकटी ओलांडत ‘जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का, कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?’ या गाण्यातल्या साक्षीभाव त्यांनी अशा रितीने स्वरबद्ध केलाय की चराचरात वसलेल्या विधात्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधायला आपलं मन धावत सुटतं. ‘तूज मागतो मी आता’ मधली याचना असेल किंवा मग ‘दयाघना, का तुटले चिमणे घरटे?’ मधला देवाला विचारणा करत केलेला आर्त विलाप असेल. ह्रदयनाथांनी कायमच श्रोत्यांना त्या गाण्याशी, त्याच्या भावार्थाशी, शब्दांशी, आत्म्याशी तादात्म्य पावण्यास भाग पाडलं.


असं असलं तरी ह्रदयनाथांमधल्या संगीतकाराच्या परिपक्वपणाचा परिपाक हा त्याच्या संतसाहित्याच्या अभ्यासात दडलेला आहे. त्यांचा भावगंधर्व हा कार्यक्रम पाहिला तेव्हा याची प्रचीती आली. स्वतः मंगेशकरांनी हे सांगितलं आहे की ‘चाली या संतसाहित्यामुळे सुचतात’. कारणही स्पष्ट आहे. संतसाहित्यामध्ये परमेश्वराप्रती असलेल्या अनन्यशरण भावाला महत्त्व आहे, शब्द काय निवडतो याला नाही. आणि म्हणूनच भावार्थाला अधोरेखित करत, भावमाधूर्य खुलवत, अवघ्या रसिकजनांचं भावविश्व भारावून टाकणं ही किमया ह्रदयनाथांसारख्या भावगंधर्वासा साध्य झाली. पण म्हणून एक संगीतकार म्हणून फक्त भावचं ठळकपणे मांडायचा नाही याचं भानही ह्रदयनाथांना होतं. आणि म्हणूनच रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा या गाण्यात भ्रमर अर्थात भुंगा या मनाला दिलेल्या उपमेची दखल घेत त्यांनी बासरीच्या साहय्याने अशी काही निर्मिती केलीये की आपलं मन त्या सुरांमध्ये, त्या भ्रमराप्रमाणेच गुंग होऊन जातं. याचचं दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर मी मज हरपून बसले गं हे गाणं, सुरेश भटांनी रचलेलं एरॉटीक नाही पण रोमॅन्टीक गाणं. या गाण्याला चाल देताना जर पूर्णतः भावनेच्या आहारी जाऊन दिली गेली असती तर त्या गाण्यातल्या नाजूक अलवार भावनेची जागा कदाचित कामुकतेने घेतली असती, पण हा समतोल राखण्याचं शिवधनुष्य ह्रदयनाथांनी लीलया पेललंय.


त्यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक गाणं जे आपल्याला कदाचित प्रणयगीत वाटेल ते म्हणजे ‘तरुण आहे रात्र अजूनी…’ हे गाणं ऐकताना वरकरणी कोणालाही वाटेल की अत्यंत व्याकूळ होऊन एक प्रेयसी आपल्या प्रियकराला किंवा एक पत्नी आपल्या पतीला आर्जव करतेय. त्यात विशेष म्हणजे प्रणयगीतात अशी आर्जवं साधारणतः पुरूषांकडून होत असतात, पण या गीतात एक स्त्री आर्जव करतेय, त्यामुळे हे गाणं आणखी आव्हानात्मक होतं. पण या गाण्याबद्दल सांगताना गीतकार सुरेश भटांनी त्या गाण्याचा वेगळाच अर्थ सांगितला की ‘विचार करा, सीमेवर एक जवान लढता लढता शहीद झाला, अगदी काही दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालंय आणि त्याचं कलेवर आता त्याच्या घरी आणण्यात आलंय, त्या कलेवरा समोर बसून त्याची नवपरिणीत वधू नेमका काय विचार करत असेल, काय भावना असतील तिच्या? त्या मांडायचा हा प्रयत्न आहे.... अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे?’ ही जाणीव होऊन जेव्हा आपण ते गाणं पुन्हा ऐकतो तेव्हा त्या गाण्यातल्या व्याकुळतेची जागा आर्ततेने घेतलेली असते. शब्दात आर्तता आहे की व्याकुळता हे जसं स्पष्ट होत नाही, तेच गुढ सुरांमध्येही कायम ठेवणं यालाच म्हणतात कवितेच्या आत्म्याला समर्पित होऊन संगीताची गुंफण करणं.


सुरेश भट ही ह्रदयनाथांनी मराठी रसिक विश्वाला बहाल केलेली एक अभिजात देणगी. रस्त्याने पायी जात असताना एका रद्दीच्या दुकानात कवितांची एक वही उघडी पडली होती. ती वही ह्रदयनाथांनी हातात घेतली आणि सहज चाळली असता एकाहून एक सरस अशा कविता त्यांच्या नजरेस पडल्या, त्यांच्यातल्या संगीतकाराने रद्दीत गेलेल्या त्या बावनकशी सोन्याची किंमत ओळखली आणि त्या कवितेच्या जन्मदात्याला हुडकून काढल. ते कवी दुसरे तिसरे कोणी नव्हते ते होते मराठीला गजल सारखा अलंकार बहाल करणारे कवीवर्य सुरेश भट...


संगीतकार म्हणून ह्रदयनाथांची प्रतिभा सर्वस्पर्शी आहे. आणि म्हणूनच ग्रेसांच्या काव्यातली जटीलता ते सोपी करतात, ज्ञानेश्वरांच्या ओजस्वी वाणीतलं पावित्र्य जपतात, सावरकरांच्या लेखणीतलं तेजही सोसवतात, सुरेश भट नावाचं वादळ अंगावर घेतात, आणि आरती प्रभूंच्या स्वप्नील कल्पनांनाही गोंजारतात.


गेल्या कित्येक पिढ्यांना ह्रदयनाथांनी आपल्या स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलवलंय. सुरवातीला ग्रामोफोन होते, मग कॅसेट आल्या, डिव्हीडी आल्या, सीडी आल्या, मोबाईलमध्ये प्लेलिस्ट तयार झाल्या, पेनड्राईव्ह आले पण या सगळ्यात कोणत्या कोणत्या गाण्यातून मराठी रसिकांच्या मनात आणि आयुष्यात ह्रदयनाथांचा मुक्त वावर कायम आहे...आणि तो राहिल.


शेवटी इतकचं वाटतं चंदन कितीही उगाळलं तरी त्याचा सुगंध लोप पावत नाही. आपलं अवघं भावविश्व गंधाळून टाकणारा सुरेल चंदनाचा हा अक्षय्य टिळा ह्रदयनाथांनी आपल्या भाळी लावला तो कधीही न पुसण्यासाठी आणि म्हणूनच कोणत्या ना कोणत्या गाण्याच्या माध्यमातून ह्रदयनाथ हे सातत्याने ह्रदयस्थ आहेत.


प्रज्ञा पोवळे यांचे अन्य ब्लॉग :