सध्या उन्हाळा सुरू आहे आणि कोरोना साथीने थैमान घातल्याने सारा समाज जमावबंदी आदेशाचे पालन करत घरातच बसून कोरोनाविरुद्धचा लढा लढत आहे. अशावेळी शरीराला सुसह्य असणारी अनेक पेये आपण घरी बनवत असाल जसे सरबत, ताक, लस्सी. यातच मी आज आपल्याला एक असे पेय शिकवणार आहे. ज्याला पैलवानांचे पारंपरीक एनर्जी ड्रिंक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तालमीत कठोर परिश्रम घेतलेले मल्ल आपल्या शरीरात व्यायामाने होणार दाह शांत करुन ऊर्जा मिळवतात ते थंडाई पिऊन. थंडाई नावातच थंड शब्द आहे. शारीरिक दाह नमवत अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, प्रोटीन यासह शरीराला लागणारे अनेक मूलद्रव्ये या ड्रिंक मधून मिळतात. कुस्तीसाठी तर 100% थंडाई पिणे आवश्यक आहेच, मात्र आजच्या घडीला कोरोनाशी लढायला आपल्या सर्वांनाच प्रतिकारशक्तीची गरज आहे जी आपल्याला थंडाई मधून मिळू शकेल.

इतिहास :


आजच्या थंडाई लेखानिमित्त मी थंडाईचा इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला. वाईट या गोष्टीचे वाटते की, कुस्तीसारख्या शास्त्रावर मध्ययुगीन कालखंडात कोणतेही लिखाण झाले नाही. पुराणकाळात "मल्लपुराण"चा उल्लेख अनेक उपनिषधात सापडतो. मल्लपुरणात मल्लांची आचारसंहिता सांगितली आहे. ती आचारसंहिता पुढीलप्रमाणे...


”मल्लयुद्ध हे येड्या गबाळ्याचे काम नाही,वाटेल त्यान उठावे आणि खेळावे असा लेचापेच खेळ नव्हे हा.तेथे पाहिजे जातीचे.


१) मल्लाने नेहमी थंड पाण्याने अंघोळ करावे.
२) खडीसाखर मिसळून दुध प्यावे
३) बदाम मिश्रण प्राशन करावे
४) रसाळ द्राक्षे सेवन करावी.
५) श्वेत वस्त्र परिधान करावी.
६) चंदन आणि कपूर याची उटी अंगास लावावी.
७) तिखट,कडू,अतीआंबट पदार्थ वर्ज्य करावेत.


BLOG | तांबडी माती : पैलवानांनी आर्थिक नियोजनाची घडी कशी बसवावी?


मल्लांची दिनचर्या


मल्लांनी सूर्योदयापूर्वी उठावे. आपले अंथरून आपणच काढून ठेवावे. जिथे झोपलो ती जागा स्वताच्या लाटणे झाडून साफ करावी. जमिनीचे दर्शन घ्यावे. त्यानंतर मुखमार्जन आणि प्रथार्विधी उरकावेत.


थंड पाण्याने स्नान करावे नंतर तालमीत जावे. नित्याचा व्यायाम करावा. आजारी , तापट ,माथेफिरू व मद्यपि लोकांच्या देखत मुळीच व्यायाम करू नये. तसेच अष्टमी,पितृपंधरावढा,शुक्लप्रतिपदा,अश्विन शुध्द अष्टमी ,अक्षयनवमी ,सूर्य आणि चंद्र ग्रहण ,अमावास्य आणि पौर्णिमा या दिवशी मल्लाने व्यायाम करू नये असा प्राचीन संकेत आपण पाळला पाहिजे.


स्त्रियांच्या देखत व्यायाम करणे हा निषिध्द असतो.


मल्लांनी घ्यावाव्याच्या व्यायामाला श्रम किंवा मेहनत असे म्हटले जाते. ती तीन प्रकारची असते.
१) पुर्नाश्रम २) अर्धश्रम ३) अल्पश्रम


मार्गशीर्ष आणि चैत्र हा काळ पूर्ण श्रमासाठी


वैशाख ते आषाढ हा काळ अर्ध श्रमासाठी


आणि श्रावण ते कार्तिक हा काळ अल्प श्रमासाठी योग्य गणला जातो.


श्रमास सुरवात करताना लंगोट कसावा. माल्लाविद्येच्या आदिदेवतेची अर्थात महाबली हनुमंताची प्रार्थना करावी.


नंतर आखाड्यातील माती अंगावर घ्यावी. तद्नंतर श्रमास प्रारंभ करावा.


तांबडी माती : शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी पै.पंढरीनाथ पठारे (अण्णा)


अंगमर्दन -


मल्लांना अंगमर्दन करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अंग्मार्दनाला संस्कृतमध्ये उद्वर्तन आणि फारशी मध्ये मालिश म्हणतात. अंगमर्दनाचे बारा प्रकार आहेत.


अंग्मर्दनामुळे अंगातील वात,कफ,चरबी इत्यादींचा नाश होतो.


त्याचप्रमाणे अंगाला उठणारी खाज नाहीशी होते. घामाचा निचरा होऊन दमदारपणा वाढतो.


थंड पाण्याने स्नान


मल्लाने थंड पाण्याने स्नान केल्याने शरीरातील लहान रंध्रे मोकळी होवून शरीरात उत्साह जाणवतो. रक्ताचे रक्ताभिसरण सुधारते.


Blog | कुस्तीलाही कोरोनाची धास्ती! यात्रांमधल्या कुस्तीच्या दंगली रद्द


मल्लांचा आहार


ऋतुमानाप्रमाणे बदलता आहार घेणे मल्लांच्या फायद्याचे असते. भाजीपाला,फळे,दही ,तूप इत्यादी शक्तिवर्धक पदार्थ आहारात ठेवावेत.
मांस हे प्राचीन मल्लविद्येत वर्ज्य आहे. शाकाहारी मल्लांची एक अनोखी मांदियाळी तत्कालीन हिंदुस्थानात अस्तित्वात होती.


गुरु


मल्लाना गुरु करावा लागत असे. त्याला मातीकार म्हणतात किंवा आजच्या परिभाषेत वस्ताद.
गुरु हा वेगवेगळ्या बत्तीस कलात निष्णात हवा. आजच्या सारखे ”अचानक वस्ताद” काय कामाचे ?
मल्लाना मल्लविद्येचे शिक्षण अतिशय समर्थपणे देता आले पाहिजे.
एक जुनी हिंदी म्हण आहे
”पाणी पिजीये छानकर ,और गुरु किजिये जानकर”


मल्लपुरणात सांगितलेल्या या आचारसंहिता म्हणजे तत्कालीन मल्लांचे नवनीत गाईडच होते.आपल्या बापजाद्यानी कुस्तीमध्ये त्यावेळी पीएचडी केली होती.यातील बदाम मिश्रण उल्लेख त्याकाळी सापडतो याअर्थी पुराणकाळात थंडाई प्रचिलीत होती.


शाहूमहाराजांच्या कोल्हापूर संस्थानात तर आश्रयीत मल्लाना बदामाचे गोणी बैलगाडीवर लादून दिले जायचे.


सध्या मात्र थंडाई अतिशय वेगळ्या पद्धतीने केली जाते.थंडाई चा वास जरी घेतला तरी मूड फ्रेश होतो.


घरच्या घरी थंडाई करून आपली प्रतिकारशक्ती वाढवावी यासाठी याची कृती देत आहे.


तांबडी माती | इतिहासाच्या पानात लुप्त झालेली पावणेतीन तासांची अजरामर कुस्ती!


पैलवानांचे अमृत -थंडाई ..


कृती


मंडळी,पैलवानांना खूप मेहनत केल्यावर शरीराची झीज भरून काढण्यासाठी खूप प्रकारचे खुराक खायला लागते.त्यात तूप ,दुध ,केळी, हंगामी फळे इत्यादीबरोबर रोज घेतला जाणारा असा एक म्हणजे थंडाई.


थंडाई हे एक असे मिश्रण असते जे प्यायल्यानंतर शरीराची झीज ९५ % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते .


साधारण माणसाने सुध्दा आठवड्यातून २-४ वेळा घरीच थंडाई करून प्यावी.शरीरातील उष्णता लगेच कमी होते,ताकत प्रचंड प्रमाणात वाढते, हाडे मजबूत होतात,रोग प्रतिकारकशक्ती वाढते.त्यासाठी कृती खाली देत आहे .जरूर करा आपापल्या घरी.


साधारण ; १ लिटर थंडाईची कृती देतोय


साहित्य -


१)बदाम ३० नग (ज्यांना रोज करायची असेल त्यानी एकदम ५ किलो आणून ठेवावे महिनाभर जाईल )
२) खसखस ३ चमचे .( थंडीच्या दिवसात हिंग घालावी )
३) बडीशेप -५ चमचे
४ ) वेलदोडे ४ नग.
५ ) १/२ लिटर दुध ( थंड असेल तर उत्तम ) नसेल तर पाणीही चालेल .
६ ) साखर १ कप.
७) काळी मिरी १-२ नग


कृती -


मिक्सर किंवा दगडी कुंडी मध्ये मध्ये २५ बदाम टाकून बारीक पूड करून घेणे .कुंडी वापरत असला तर लिंबाच्या काठीने बारीक कुटावे .(इतरांनी मिक्सर वापरला चालेल)


त्याचप्रमाणे खसखस ,बडीशेप ,वेलदोडे एकत्रपणे मिक्सर मध्ये टाकून त्याचीही पूड करून घेणे.


पुन्हा त्या बदामाची पूड मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकणे आणि ३-४ कप दुध टाकून पेस्ट करून घेणे .त्यामध्ये खसखस ,बडीशेप ,वेलदोडे,मिरी यांची पूड टाकणे .


आता २-३ /२-३ कप असे दुध वाढवत जावा आणि मिक्सर ने ते मिक्स करत जा .शेवटी संपूर्ण दुध ज्यावेळी संपेल त्यावेळी २ मिनिटे मिक्सर चालू ठेवा .


तयार मिश्रणावर फेस आल्यासारखा दिसेल .आता ते मिश्रण एका सुताच्या वाळलेल्या फडक्यातून गाळून दुसर्या तांब्यात घ्या ..यामुळे संपूर्ण चोथा बाजूला होईल.


त्यानंतर १/२ कप साखर घालून सरबत जसा खालीवर करतो त्याप्रमाणे करून घेणे .
नंतर ते पिण्यास योग्य असेल .


पूर्वी थंडाई दगडी कुंडी व लिंबाच्या लाकडी दांड्याने करत असे,पण हल्ली सर्वत्र मिक्सर वापरला जातो.


अशाप्रमाणे तुम्ही घराच्या घरी थंडाई करू शकता.कृती अवघड नाही पण १० मिनिटे वेळ लागतो .लग्न झाले असेल तर बायकोला एकदा कृती शिकवा म्हणजे घरी आल्यावर आयती थंडाई तयार मिळेल.कारण हा त्रास मला माहिती आहे .
पण जो खूप कुस्ती मेहनत करतो अथवा बॉडी- बिल्डींग करतो किंवा कोणताही मैदानी खेळ खेळतो त्याने थंडाई अवश्य घ्यावी ..खूप ताकत मिळते त्यातून.


थंडाई वस्त्रगाळ करून गाळूनच प्यावी,चोथा फेकून द्यावा,तसेच प्यायला तर मुतखडा सारखे विकार होण्याची शक्यता असते.


लहान मुले जी 2 वर्ष पुढील आहेत अश्याना सुद्धा वाटीभर थंडाई जरूर पाजावी.शांत झोपतात.इथे साखर ऐवजी खडीसाखर वापरा.