परवाची गोष्ट. सकाळी सकाळी 'मॉर्निंग वॉक'घेत होतो. नवनवीन एका बंगलीवजा सोसायटीच्या रस्त्याने रमत गमत फिरत होतो. छान टुमदार बंगले,त्या भोवती थोड्याशा जागेचा कल्पकतेना केलेला वापर, झाडी,फुलझाडे,बंगल्यांची काव्यात्म नावे सारे सारे पाहत मी चाललो होतो आणि मी स्वतःलाच प्रश्न केला," या सा-या बंगल्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे,ती कोणती?" आणि माझ्या लक्षात आले की जवळपास प्रत्येक बंगल्याच्या फाटकावर एक छोटासा बोर्ड,त्यावर गळ्यात पट्टा बांधलेल्या मोत्याचे,टॉमीचे पाहणा-याने पाहता क्षणीच भयकंपित व्हावे असे चित्र आणि पुढे दोन धमकावणीचे शब्द,"कुत्र्यापासून सावधान " किंवा "सावधान-कुत्रा आहे."हे निरिक्षण आठवत असतानाच एका दांडग्या श्वानमित्राने फाटकाच्या आतून जोरदार 'भो भो' अशी गर्जना केली आणि माझ्या 'मॉर्निंग वॉक' चा ताल बिघडवला. हे सारे आठवले ते जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने ! 


२८ सप्टेंबर हा लुई पाश्चरचा मृत्यूदिन.  त्याची आठवण म्हणून जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा केला जातो. रेबीज हा खरे तर प्राचीन काळापासून मानवाला माहित असणारा आजार. 'सुश्रुत संहिते'त सुश्रुताने याचे वर्णन 'जलतृषा'या नावाने केले आहे. "रुग्ण पाण्याच्या नुसत्या नावाने ही भयकंपित होत असेल तर तो 'जलतृषा' आजाराने पिडित आहे आणि त्याचा मृत्यू जवळ आला आहे,हे निश्चित !' असे सुश्रुत लिहतो. पिसाळलेले कुत्रा किंवा इतर कोणता प्राणी चावल्यामुळे होणारा हा आजार. रेबीज हा शब्द मुळात 'वेडसरपणा' या अर्थाने लॅटीन मधून आलेला. 'हायड्रोफोबिया' हा याच आजारासाठी वापरण्यात येणारा दुसरा शब्द,या आजाराचे लक्षण स्पष्ट करणारा – पाण्याची अनाठायी भिती!


रेबीज – एक दुर्लक्षित आजार 


जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सतरा दुर्लक्षित आजारांकडे जगाचे लक्ष वेधले आहे. रेबीज या पैकी एक आजार आहे. ह्र्दयविकार,मधुमेह,वाढते अपघात अशा स्टार आजारांपुढे या 'निगलेक्टेड' रेबीज कडे पाहण्याला कोणाला वेळ आहे ? अशा वेळी एकादया फाटक्या वाटणा-या माणसाने आपल्या अविश्वसनीय संपत्तीचे पुरावे सादर करावेत तशी रेबीज समस्येची आकडेवारी पाहिली की आपल्याला या समस्येची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्या लक्षात येते. 


दरवर्षी भारतात सुमारे ७२ लाख लोकांना कुत्रा किंवा इतर प्राणी चावतात. या आजारावर अत्यंत प्रभावी लस उपलब्ध असूनही दरवर्षी सुमारे वीस हजार भारतीय रेबीज (जलतृषा) या आजाराला बळी पडतात. कारण रेबीज हा अत्यंत घातक आजार आहे. कुत्र्याशिवाय लांडगा,कोल्हा,मुंगुस,वटवाघूळ किंवा इतर पाळीव प्राण्यांमुळे देखील हा आजार होऊ शकतो,हे खरे असले तरी भारतातील जवळपास ९६% रेबीज केसेस या श्वानदंशामुळे होतात,ही वस्तुस्थिती आहे. जगाच्या एक तृतियांश हून अधिक रेबीज रुग्ण भारतात आढळतात. या सगळ्या 'निगलेक्टेड' समस्येबद्दल बोलताना जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवाल एक गोष्ट स्पष्टपणे नोंदवितो आणि ती म्हणजे,"The people most affected by rabid dog bites, usually live in poor rural communities where medical resources are often sparse. Because they lack a strong political voice, their problems tend to be overlooked by politicians and health authorities who are based in capital cities and are poorly informed about major public health issues affecting rural areas."  


वन हेल्थ – आपणां सर्वांचे आरोग्य म्हणजे समष्टीचे आरोग्य


२०३० पर्यंत भारत रेबीज मुक्त करणे ,हे आपले उद्दिष्टय आहे. २०-२० चा वर्ल्ड कप जिंकण्याइतके सोपे नाही पण ते अशक्य आहे,असेही नाही. मुळात या समस्येची नेमकी मांडणी केली की तिची उकलही समोर येते. वन हेल्थ म्हणजे मनुष्य , प्राणी आणि पर्यावरण यांच्या आरोग्याचा सहसंबंध समजून घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. 


 पहिली गोष्ट म्हणजे भारतातील कुत्र्यांची संख्या. आजमितीला भारतात जवळपास आठ कोटी कुत्री असावीत,असा एक अंदाज आहे. यातील बहुसंख्य कुत्री ही भटकी म्हणजे पाळीव नसलेली आहेत. एकट्या मुंबईतच अशा भटक्या कुत्र्यांची संख्या सहा लाखांच्या पुढे असावी. दरवर्षी मुंबईत जवळपास लाखभर लोकांना श्वानदंश होतो, त्याचे कारण मुख्यत्वे ही भटकी कुत्री. भिकारी,फेरीवाले,कामकरी मंडळी ही अनेकदा या कुत्र्याच्या अनाठायी आक्रमकतेला बळी पडताना दिसतात. अशी भटकी कुत्री सरळ मारावीत, असे अनेकांना वाटते. या संदर्भात अनेक न्यायालयीन लढायाही लढल्या गेल्या आहेत. पण असे करणे म्हणजे डास झाले म्हणून घर जाळण्यासारखे मूर्खपणाचे आणि तितकेच अमानवी आहे. २००९ मध्ये या संदर्भात झालेल्या एका न्यायालयीन लढाईत एका सामान्य नागरिकाने नोंदविलेले मत खूप महत्वाचे आहे,'भटकी कुत्री नाहक भुंकतात आणि प्रसंगी चावतात म्हणून त्यांना ठार मारावे असे कोणी म्हणत असेल तर जी माणसे गॅंग रेप,मर्डर आणि इतर अभद्र गोष्टी करतात,त्यांचे काय करावे?आता कुत्र्यांनीही 'माणसापासून सावध' असा बोर्ड लावावा काय?' अर्थातच हा उपाय वेडेपणाचा आहे. कुत्र्यांची संख्या प्रमाणात ठेवण्याचा एकमात्र शास्त्रीय उपाय आहे, जनन दर नियंत्रण म्हणजेच कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया. ही गोष्ट आपण अधिक गांभिर्याने घ्यायला हवी कारण आज कुत्र्यांच्या संख्येच्या तुलनेत आपल्याकडे या शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रणा अगदी तोकडी आहे. सर्व पाळीव असेच भटक्या कुत्र्यांचे नियमित रेबीज विरोधी लसीकरण हा आणखी एक महत्वाचा उपाय आहे. 


श्वानदंशावरील लसीकरण – रेबीज प्रतिबंधाचा खात्रीशीर उपाय


दुसरे अत्यंत महत्वाचे म्हणजे,श्वान दंशावरील लशीची मोफत आणि सर्वदूर उपलब्धता. महाराष्ट्रात ही लस सर्वात जास्त वापरण्यात येते, ही गोष्ट राज्यातील या लसीची सहज उपलब्धता स्पष्ट करते. १८८५ साली लुई पाश्चरने श्वान दंशावरील पहिली लस शोधली त्यानंतर या लसीत अनेक सुधारणा करण्यात आल्या. आज अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित अशी श्वानदंश लस उपलब्ध आहे. मात्र ती तुलनेने महागडी आहे. ही लस स्नायूमध्ये आणि त्वचेखाली अशी दोन प्रकारे दिली जाऊ शकते. दोन्हीही पध्दती सारख्याच प्रभावी आहेत,हे आता सप्रमाण सिध्द झाले आहे. ही लस त्वचेखाली देण्याच्या पध्दतीत डोस कमी लागतो,त्या मुळे खर्चात साठ ते सत्तर टक्के बचत होऊ शकते. यामुळे कमी खर्चात अधिकाधिक लोकांपर्यंत आपल्याला ही लस पोहचविणे,शक्य होईल. गंभीर स्वरुपाच्या चाव्यासाठी ॲन्टी रेबीज सिरमची देखील आवश्यकता असते. 


कुत्रा चावल्याची जखम धुणे रेबीज टाळण्यासाठी महत्वाचे : 



सर्वात महत्वाचे आहे, आरोग्य शिक्षण. आजही निम्म्याहून अधिक लोकांना कुत्रे चावल्यानंतर नेमके काय करावे,हे माहित नाही. जखमेची काळजी कशी घ्यावी,या बद्दल अज्ञान आहे. अर्थातच हे अज्ञान जीवावर बेतणारे आहे. कुत्रा चावल्यामुळे झालेली जखम स्वच्छ वाहत्या पाण्याने आणि साबणाने धुणे आवश्यक आहे. कारण रेबीज आजाराचे विषाणू हे कुत्र्याचे लाळेत असतात. किमान दहा मिनिटे वाहत्या पाण्याने जखम धुतल्यामुळे हे विषाणू जखमेतून धुऊन काढण्यास मदत होते. जखम धुतल्यावर तिच्यावर कोणतेही ऍण्टीसेप्टीक क्रीम लावावे. मिरची पूड,चुना,मीठ,हळद,वनस्पतीचा रस असे काहीही लावू नये. जखम फार घट्ट बांधू नये. या साध्या साध्या वाटणा-या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मुळात श्वानदंशानंतर वैदयकीय सल्ल्यानुसार लस घेणे आवश्यक आहे, याची जाणीव सर्वांना हवी. अन्यथा आजही कुत्तरवाडीच्या विहिरीचे पाणी अथवा कुणीतरी दिलेला औषधी पान विडा श्वानदंशावर उपाय म्हणून घेणा-यांची संख्या कमी नाही. आजही आपल्या अंधश्रध्देच्या विहिरीचा झरा आटत नाही,त्याला काय करावे? कुत्र्याच्या चाव्यानंतर झालेली जखम व्यवस्थित धुतल्यामुळे आपण रेबीज होण्याची शक्यता मोठया प्रमाणावर कमी करु शकतो.


रेबीज मुक्त भारताचे स्वप्न  साध्य करण्यासाठी एका निश्चित 'रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रण' धोरणाची आवश्यकता आहे. लुई पाश्चर म्हणाला होता,'In the realm of science, luck is only granted to those who are prepared.' विज्ञानाच्या प्रांगणात ज्यांचे नियोजन पक्के आहे,ज्यांची तयारी परिपूर्ण आहे त्यांनाच नशीब साथ देते. बाकीचे केवळ नशीबाला दोष देत बसतात.
आपल्याला कोणत्या वाटेने जायचे आहे,निर्णय आपणच घ्यायचा आहे.


(लेखक हे  महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत)