5 फेब्रुवारी 2023. रविवारची संध्याकाळ. खरं तर रविवारची संध्याकाळ तमाम मंडळींसाठी खास करुन नोकरी करणाऱ्यांसाठी हक्काचा आरामाचा, कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याचा काळ. कालचा रविवार, आम्हा गिरगावकरांसाठी खास करुन श्याम सदनच्या चाळवासियांसाठी असाच होता. जिथे आपापल्या कुटुंबासह मंडळी 'श्याम सदन' नावाच्या कुटुंबात पोहोचली. सायंकाळी सातच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाला आम्ही नाव दिलं होतं, 'आठवणींची दाटी, श्याम सदनसाठी'. आमची चाळ आता पुनर्विकासाकडे वाटचाल करतेय. त्यामुळे तिला आपल्या कुटुंबाच्या साक्षीने, जड मनाने आम्ही निरोप देत होतो. त्याचवेळी आठवणींचे अनेक मजले बांधले गेले. टॉवरपेक्षाही उंच जाणारे. सध्या चाळीत राहणाऱ्यांसोबत इमारत सोडून गेलेले अनेक माजी रहिवासी या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. अगदी ठाणे, डोंबिवलीहून. सत्तरी, पंचाहात्तरी पार केलेली अनेक मंडळी होती. उदय सोहोनी, काशिनाथ मांजरेकर, अरुण हजारेंसारखी ज्येष्ठ मंडळी सहा वाजल्यापासूनच आपल्या या घरात उपस्थित होती, ती कार्यक्रम संपेपर्यंत. माझे 86 वर्षांचे मनोहरकाका आणि पंचाहात्तरी पार मनीषा काकूही खास या कार्यक्रमाला उपस्थित होते. अंगात ताप आणि घसा बसलेला असूनही केवळ आपल्या चाळीसह आम्हा सर्वांच्या प्रेमापोटी प्रदीप जालगावकर खास मिरारोडहून आले होते, अशी किती नावं घेऊ. अनेकजण होते, काही माहेरवाशिणी आल्या होत्या. आईवडिलांकडून संस्कृतीचं आणि संस्कारांचं लेणं घेऊन आज सासरच्यांची वाहवा मिळवणाऱ्या अनेक लेकी आपल्या या माहेरी आवर्जून उपस्थित होत्या. माहेरहून सासरी जाताना जसे त्यांचे डोळे पाणावलेले, तशाच आपलं काहीतरी सोडून जातानाच्या विरह वेदना त्यांच्या डोळ्यात या कार्यक्रमादरम्यान अधूनमधून जाणवत होत्या. आमच्या इमारतीचे मालक श्याम सदनचे कुटुंबप्रमुख योगेशभाई सपत्निक उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते आम्ही आमच्या गणपती बाप्पांच्या फोटोचं पूजन केलं. म्हणजे आम्ही गणेशोत्सव साजरा करतो, त्याच मूर्तीचा फोटो समोर ठेवून पूजा केली. देवधर गुरुजींनी पूजेसोबत सर्वांसाठी प्रार्थनाही केली. चांगल्या कामाचा म्हणजेच, पुनर्विकासाचा श्रीगणेशा करताना बाप्पांचा आशीर्वाद हवाच.  बिल्डरचे प्रतिनिधी जे आमची ही चाळ रिडेव्हलप करतायत त्यांनाही आम्ही निमंत्रित केलं होतं. गणेश पूजन झाल्यानंतर पुढे कार्यक्रम सुरू झाला. आम्ही चाळीसाठी खास मानपत्र लिहिलं होतं. ते वाचताना माझा आणि ऐकताना उपस्थितांचाही उर दाटून आला. मी वाचत होतो, ते शब्द नव्हते. भावना शब्दरुपाने आणि आठवणी अश्रूरुपाने वाहत होत्या. मानपत्र वाचताना शांतता होती, कारण मनात हे सगळे क्षण एकमेकांशी बोलत होते. त्यामुळे प्रत्येक जण मनातलं ऐकत होता. मानपत्रासोबत आम्ही खास कस्टमाईज घड्याळ प्रत्येकाला भेट म्हणून दिलं. ज्याच्या डायलमध्ये आमच्या चाळीचा फोटो आणि आमच्या गणपती बाप्पांचा फोटो, इमारतीचं नाव, तारीख असं सगळं लिहिलेलं आहे.


हेतू इतकाच की, जेव्हा जेव्हा या घड्याळाकडे कुणी पाहील तेव्हा फक्त त्याक्षणीचीच वेळ कळेल असं नाही तर या चाळीसोबत, इथल्या शेजाऱ्यांसोबत घालवलेली असंख्य सेकंद, मिनिटे आणि तास त्या घड्याळात दिसू लागतील. ते सारे क्षण, आहेत तिथे ही मंडळी पुन्हा जगतील.


मानपत्र वाचनानंतर उपस्थितांपैकी काही जणांना मनोगत व्यक्त करायला सांगितलं. उदय सोहोनी यांनी मनोगत व्यक्त करताना आठवणी तर सांगितल्याच, शिवाय इथली काही मंडळी जी आज आपल्यात नाहीत, ज्यांचं निधन झालंय. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मौन पाळण्याचं आवाहन केलं. तेव्हाही पटांगणात पिन ड्रॉप सायलेन्स झाला. अनेकांच्या आठवणींनी मन व्याकुळलं.


आमच्या इमारतीतील माजी रहिवासी बुजुर्ग अभिनेते जितेंद्र वयोमानानुसार, कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही तरी त्यांनी आम्हाला व्हिडीओ मेसेज पाठवला. स्थानिक खासदार अरविंद सावंत, राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा या दोघांचेही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येता आलं नाही.  त्यांनीही आम्हाला ऑनलाईन शुभेच्छा संदेश दिले. या तिघांच्याही संदेशाने कार्यक्रमाला एक वेगळं महत्त्व आलं.


आणखीही काहींनी आपल्या भावनांना वाट करुन दिली. कार्यक्रमाची सांगता झाली आणि उपस्थितांना आम्ही स्नेहभोजनासाठी चला, असं आग्रहपूर्वक सांगितलं. पुढचा एक-दीड तास स्नेहभोजनासोबत अनेक जुन्या खुसखुशीत आठवणींचा मेन्यूही डिशमध्ये आला होता.


सातच्या सुमारास सुरू झालेली ही अविस्मरणीय सायंकाळ दहाच्या सुमारास संपली. पटांगण रिकामं झालं, रिकाम्या खुर्च्या दिसल्या, तेव्हा मन खायला उठलं.  त्याच वेळी वातावरणात आमच्या माणसांच्या उपस्थितांच्या एखाद्या अत्तरापेक्षाही सुगंधित आठवणी दरवळत होत्या. त्याचीही जाणीव झाली. जेवणाच्या व्यवस्थेचा आढावा घेतला, तेव्हा आमचा मित्र अमित म्हणाला, अश्विन जेवण उरलंय रे. मी म्हटलं, उरणारच. आज पोटापेक्षा मन भरलंय सर्वांचं.


कापरासारखे हे क्षण आता उडून गेले असले तरी त्या कापराचा गंध जसा आरती झाल्यानंतरच्या वातावरणात व्यापून असतो, तसा या क्षणांचा गंध आम्हा सर्वांच्या आयुष्यात व्यापून राहील. पुनर्विकास होऊन त्याच ठिकाणच्या नव्या वास्तूमध्ये आठवणींचा जागर करण्यासाठी पुन्हा जमेपर्यंत वाटचाल करण्यासाठी हे क्षण ऑक्सिजन ठरतील, ऊर्जा देतील.