कोरोना जगावर ओढावलेलं भयंकर संकट. त्यामुळे निर्णय झाला तो लॉकडाऊनचा! सारे व्यवहार ठप्प, ना कुणाची गाठ- भेट, ना कुठं फिरायला जाणं. तंस पाहता आठ महिन्यांचा हा काळ कठिणच. 'न भूतो' असे हे दिवस होते. हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली गेली आणि त्यानंतर अनेकांना हायसं वाटलं. लॉकडाऊनच्या काळात नकारात्मक घडामोडी अनेक घडल्या. त्याच्या शारिरीक आणि मानसिक मनस्ताप देखील झाला. त्यावर चर्चा देखील झडल्या. पण, असं असलं तरी यातून घडलेल्या नकारात्मक बाबींपेक्षा काही सकारात्मक बाबींचा विचार, आपल्यामध्ये झालेल्या बदलांचा विचार करता येऊ शकतो का? आता तुम्ही म्हणाल यात सकारात्मकता काय शोधणार? तुमचं म्हणणं अगदी बरोबर असलं तरी नाण्याच्या दुसऱ्या बाजुचा विचार करायला काय हरकत? कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही म्हणतात त्याच उक्तीप्रमाणे 'गुजरे हुए उन बुरे लमहोंको क्या याद करना?' असं म्हणत आपण आपला प्रवास नक्कीच सुरू ठेवू शकतो.


मानवी मनावर झालेल्या सकारात्मक बदलांच्या किंवा आरोग्य विषयक जागृकतेविषयी आम्ही डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिलेली माहिती ही नक्कीच महत्त्वाची होती. त्यात अनेक मागे सरलेल्या, विसरलेल्या बाबीं पुन्हा नव्यानं आपल्या जीवनात रूजल्या होत्या.आपलं बालपण, बालपणीच्या आठवणी, बालपणी शाळांमध्ये म्हटले जाणारे श्लोक, खेळ आणि त्यानंतर घरी पावलं पडताच 'अरे पहिले हात- पाय स्वच्छ धुवून ये!' म्हणत आईनं घातलेली दराऱ्याची पण प्रेमळ आणि मायेची हाक सर्वांनाच आठवत असेल. अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर शाळेत गेल्यानंतर स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारे धडे एव्हाना अनेकांच्या डोळ्यासमोरून झरझर पुढे देखील सरले असतील.


अशा काही मुद्यांचा विचार करत आम्ही रत्नागिरीतील डॉक्टर रश्मी आठल्ये यांच्याशी संवाद साधला. तशा या गोष्टी नवीन नाहीत. पण, याचा व्यक्ती म्हणून किंवा समाज म्हणून किती फरक पडतो हाच उद्देश त्यामागे होता. यावर बोलताना, 'नक्कीच! कोरोनाच्या काळात झालेल्या चांगल्या सकारात्मक बदलांच्या विचार करायला काय हरकत? किंबहूना आपण, जर स्वत:कडे पाहिलं किंवा समाजात वावरताना काही गोष्टी लक्षपूर्वक पाहिल्या तर ते बदल आपलेल्या जाणवतात नव्हे ते दिसतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यानंतर त्या पुढे आणखी काही सांगू लागल्या. 'स्वच्छता आणि त्याचं महत्त्व माणसाला अगोदरपासूनच माहित आहे. आपल्या लहानपणी किंवा आपल्या मुलांना देखील आपण त्याबाबत वारंवार बजावत किंवा सांगत आलोय. अगदी बाहेरून आल्यानंतर हात-पाय धुणे, अंघोळ करणे या गोष्टी काही नव्यानं आल्या नाहीत. त्या पूर्वीपासून होत्या. तसं पाहिलं तर जुन्या काळात किंवा अगदी काही वर्षे मागे गेलो तर घरांच्या बाहेरच पाण्याची व्यवस्था केलेली असायची. त्याचा उद्देश एकच, घरात येण्यापूर्वी स्वच्छ होऊन आत येणे. अगदी बाहेरून आल्यानंतर कपडे देखील काढून ते धुण्याकरता दिले जात असतं. याचं महत्त्व आपल्याला पुन्हा दिसून आलं. काही वेळा अनेक जण घाईमध्ये याकडे दुर्लक्ष करत असतं. पण, आता मात्र त्यामध्ये मोठा बदल झालाय. एवढंच नाही तर प्रत्येकाला स्वच्छतेचं काहीसं दुर्लक्षित असलेलं महत्त्व पु्न्हा कळून आलं. 'सोवळं' हा शब्द आपल्याला काही नवीन नाही त्याच सोवळ्याचं महत्त्व किंवा त्या सोवळ्याला आपण पु्न्हा स्वीकारलं. तसं पाहिलं तर, आपणं सॅनिटायझर वापरतो म्हणजे 'सोवळं' करतो असं सध्याच्या परिभाषेत म्हटलं तर काय हरकत आहे?' असा साधा पण विचार करायला लावणारा सवाल देखील यावेळी डॉक्टर आठल्ये यांनी केला.


'ही झाली वैयक्तिक स्वच्छता. पण, सामाजिक स्वच्छतेचं भान देखील यानिमित्तानं वाढलं. कोरोनापूर्वी कुठंही कचरा टाकणं, थुंकणं, या गोष्टी सर्रासपणे दिसून येत. पण, लॉकडाऊननंतर मात्र त्यामध्ये मोठा बदल झाला. प्रत्येक जण वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सामाजिक आणि परिसराच्या स्वच्छतेबाबत देखील जागृक झाला. शिवाय, मास्क आणि मास्कच्या वापरामुळे होणाऱ्या फायद्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. मास्कच्या वापरामुळे धुळ आणि त्यापासून होणाऱ्या आजारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फरक पडला असल्याची माहिती देखील यावेळी डॉक्टर रश्मी आठल्ये यांनी दिली.



केवळ आरोग्यच नाही तर लोकांच्या मानसिकतेत देखील मोठा बदल झाला. याबाबत आम्ही मुंबईतील मानसशास्त्रज्ञ डॉ. हेमांगी म्हाप्रळकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिलेली माहिती ऐकल्यानंतर अरेच्चा, हो की! अशीच प्रतिक्रिया कुणाच्याही तोंडून बाहेर पडेल. लॉकडाऊन किंवा कोरोनामुळे लोकांमध्ये, त्यांच्या मानसिकतेत काय बदल झाले? यावर डॉ. हेमांगी म्हाप्रळकर यांनी 'लॉकडाऊनमुळे सर्वांनाच घरी थांबावं लागलं. यामुळे त्यांचा अधिक वेळ आपल्या कुटुंबाला देता आला. अनेकांनी आपल्या आवडी - निवडी, छंद जोपासले, असं असलं तरी त्यांच्यामध्ये मी काही तरी समाजाचं देणं लागतो ही भावना अधिक बळकट झाली. कारण, पाऊस, पूर किंवा इतर कोणतंही संकट आलं तरी आपण असा विचार करतो. पण काही काळानंतर ते मागे राहतं. पण, कोरोना किंवा लॉकडाऊनमध्ये तसं काही झालं नाही. तसं पाहिलं तर हे सर्वांत जास्त काळ राहिलेलं संकट. त्यामुळे सर्वजण सामाजिक भान जपून वावरताना दिसले. आम्ही समाजाचं काही तरी देणं लागतो ही भावना या काळात अधिक बळकट झाली किंवा ती वारंवार दिसून देखील आली. याशिवाय, अनेक जण आपली नोकरी आणि पैशांबाबत काळजी घेताना दिसून आले. अनेक वेळा बॉसशी पटत नाही म्हणून तडकाफडकी राजीनामा देणे किंवा नोकरी सोडणे या गोष्टी सर्रासपणे दिसून येत. विशेषता तरूणांमध्ये हे प्रमाण जास्त होतं. नवीन कुठं तरी नोकरी मिळतेय म्हणून जम्प करणं हे सर्रासपणे दिसून येत होतं. यापू्र्वी जो बिनधास्तपणा दिसून येत तो आता कमी झाला आहे. पण, त्यामध्ये देखील आता बदल झाला आहे. सध्या लोक आजशिवाय उद्याचा देखील गांभार्यानं विचार करताना दिसून येतात. यापूर्वी पैसे खर्च करताना बिनधास्तपणे केले जात होते. पण, आता मात्र जपून, काटकसरीनं किंवा आवश्यक त्याच ठिकाणी ते खर्च केले जात असल्याचं आपल्याला दिसून येते. इतकंच नाही तर आता प्रत्येक जण आपल्या प्रकृतीची अधिकपणे काळजी घेताना दिसून येत आहेत. मेडिक्लेमला तसं गांभीर्यानं घेतलं जात नव्हतं. पण. आता मात्र त्याबाबत जागृकता दिसून येते आपली, आपल्या कुटूंबाची आरोग्यविषयक काळजी सध्या घेताना लोक दिसून येत आहेत.यापूर्वी एखादी सर्जरी करताना नंतर करू अशारितीनं पाहिलं जात होतं. पण, आता त्यामध्ये बदल झाला आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबर प्रत्येक गोष्ट वेळीच करण्यावर सध्या भर दिला जात आहे. यामध्ये आणखी एका गोष्टीचा समावेश होऊ शकतो. ती म्हणजे काळजी घेणे. या काळात अनेकजण आपल्या शेजाऱ्यांची, लहान मुलांची, घरातील - आजुबाजुच्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेताना दिसून येत आहेत. त्यांना काय हवं? काय नको याबाबत देखील जागृकता झालेल दिसून येते. या साऱ्यातून एक गोष्ट आपण नक्की म्हणू शकतो की, माणूस आणि माणूसकी याची गरज प्रत्येकाला दिसून आली. यापूर्वी देखील ती होती. पण, कोरोना किंवा लॉकडाऊनमुळे ती अधिक स्पष्टपणे दिसून आली किंवा त्याचं महत्व देखील कळलं'.अशी माहिती दिली.


या साऱ्या गोष्टींचा विचार करता एक गोष्ट आपण नक्की म्हणू शकतो की, आपण सर्वांच्या आयुष्यातील हे मोठं संकट असलं तरी त्याच्या नकारात्मकतेपेक्षा त्यातून मिळालेल्या किंवा झालेल्या सकारात्मक बदलांचा विचार करायला काय हरकत आहे? कारण, काल काय झालं? यापेक्षा आज आणि उद्यावर लक्ष केंद्रीत केल्यास होणारा उद्धार हा आपलाच नाही का?