ही गोष्ट आहे कोकणच्या एकाकीपणाची! आपली लेकरं परत येतील या आशेवर त्याच्या वाटेकडे डोळे लावून, वार्धक्याकडे झुकलेल्या आजीची ! मायेनं आजीच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडणाऱ्या नातवंडाची! पोटासाठी जड अंत:करणानं परतणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याची! आणि गजबजून गेलेल्या पण अचानकपणे नीरव शांतता अनुभवल्यानंतर शुन्यात हरवलेल्या कोकणातील टुमदार घरांची! नातवंडांचे मुके घेत वयानं झुकलेल्या आजी, डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर असलेलं दु:ख सुरकुत्यांमधून देखील जाणवणारं आणि परत कधी याल? असा भाव डोळ्यात दाटून आल्यावर घळाघळा बाहेर पडणारे अश्रू! कोकणातील घराघरात, प्रत्येक थांब्यावर दिसणारं हे चित्र. चाकरमान्यांची मुंबईला परतण्याची घाई, प्रत्येकाला भेटण्याच्या गर्दीत हे चित्र अगदी स्पष्ट दिसतं. मनाला भावतं आणि एखादा हुंदका पाहणाऱ्याच्या देखील गळ्याशी दाटून येतो. कोकणात गौरी - गणपतीसाठी लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी दाखल होतात. कोकणातील गावं, वाड्या अगदी गजबजून जातात. गावाचं हरवलेलं गावपण पुन्हा दिसू लागत. गौरी - गणपतीचा सण हा प्रत्येक कोकणी माणसाचा हक्काचा सण! 


वडिलोपार्जित चालत आलेल्या प्रथा - परंपरा जपत मोठ्या जल्लोषात कोकणातील प्रत्येक घरात बाप्पा विराजमान होता. आरती, भजनं, फुगड्या, विविध पारंपरिक कला यांनी सारा परिसर दणाणून जातो. धूप - अगबरत्तीच्या दरवळणाऱ्या सुगंधासह भजन, आरती यामुळे वातवरण आणखी उल्हासित होतं. जगाच्या पाठीवर कुठंही असला तरी कोकणी माणूस आपल्या कुटुंबासह त्याचा मुळगावी येतो. प्रवासासाठी करावी लागणारी कसरत, होणारे हाल तो अगदी सहजपणे सहन करतो. पण, बाप्पाच्या भेटीची ओढ मात्र काही कमी होत नाही. लक्षणीय बाब म्हणजे जमाना बदलला. सण - उत्सव साजरा करताना, जल्लोष करताना त्याचं स्वरूप बदललं. पण, कोकणी माणसानं त्याचं मूळ मात्र सोडलं नाही. वाडवडिलांकडून चालत चालत आलेले संस्कार त्यानं आपल्या पुढच्या पिढीला देखील देऊ केलेत. नव्या पिढीनं देखील ते त्याच आत्ममियतेनं स्वीकारलेत. त्यामुळे गाभा कायम ठेवत कोकणातील गौरी - गणपतीचा सण साजरा करतात. खरं तर कोकणात गणेशोत्सव नसतो तर गौरी - गणपतीचा सण असतो. हे वाक्य वरिष्ठ पत्रकार सतीश कामत यांच्या एका पुस्तकात वाचलं. विचार केल्यानंतर ती बाब सत्य आहे. कारण, गणेशोत्सवापेक्षा त्याला गौरी - गणपती का बोलतात? हे कोकणी माणूस सहज सांगेल. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमधील सणाला आलेलं उत्सवी रूप पाहिल्यानंतर कोकणातील सण साजरा करण्याची प्रथा पाहिल्यानंतर त्याचं उत्तर मिळेल. 


तसं पाहिलं तर कोकणातील बंद असलेल्या घरांची संख्या मोठी. काही घरांमध्ये सध्या म्हातारी माणसं वास्तव्याला असतात. शहरांमधील हवामान मानवत नाही. तिथं करमत नाही म्हणून आपल्या लेकराबाळांसह जाण्यास काही जण तयार होत नाहीत. तर, छोटा रूम, कमवणारे दोन हात आणि खाणारे दहा हात अशा स्थितीत उगाच घरच्या कर्त्यावर ताण नको म्हणून देखील काही जण गावी राहणं पसंत करतात. त्यामुळे कोकणातील बंद घरांची संख्या मोठी. दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होतेय. कोकणात रोजगार नाहीत म्हणत पोटासाठी गाव सोडणाऱ्यांची संख्या मोठी. गावात राहिल्यानंतर अगदी लग्नासाठी येणारी समस्या हे देखील त्यामागील एक मोठं कारण. त्यामुळे देखीर तरूण शहरांची वाट धरतात. पण, गौरी - गणपती आणि शिमग्याला हा तरूण गावाकडं येतो. तन्मयतेनं सणाचा भाग होतो. गावी आल्यानंतर होणाऱ्या गाठीभेटी, मित्र - मंडळींचा सहवास, जुन्या आठवणींना मिळणारा उजाळा यात तो रममाण होतो. सण संपताच किंवा सुट्टीचे दिवस संपताच नाईलाज म्हणून देखील मागे फिरताना पावलं गावात अडखळतात. दिवस संपू नये अशी प्रत्येकाची धारणा असते. पण, पुढं काय? हा प्रश्न मात्र शहरांची वाट पुन्हा चालण्यासाठी भाग पाडतो.


 कित्येक वेळा तर सुट्टी नाही म्हणून खोटी कारणं देऊन, प्रसंगी नोकरी सोडून गावी येणारे देखील तरूण, तरूणी दिसतात. पण, आता पुढे काय? हा यक्ष प्रश्न त्यांना देखील पडतोच. लग्न झाल्यानंतर, जबाबदाऱ्या वाढल्यानंतर आलेल्या पोक्तपणा देखील त्यांच्यात जाणवू लागतो. प्रत्येकाची आपल्या गावाशी जोडलेली नाळ अधिक भावनिक असते. मी तर म्हणतो कोकणी माणसाची ती कदाचित इतरांहून जास्त असावी. त्याला कारणं देखील तशीच आहेत. निसर्गाच्या कुशीत आणि दुर्गम भागात असलेली वस्ती, झालेला जन्म, पालन - पोषण होत असताना निसर्गानं दिलेली ताकद आणि उपजत असलेली संपन्नता ही यामागे असलेली कारणं बहुधा असावीत. काही वेळा मी अगदी सहजपणे म्हणतो की,"आम्हा कोकणी माणसाला निसर्गाची देणगी ही जन्मताच मिळालेली आहे. खाण्यापिण्यासाठी आमची कधी वाणवा झाली नाही. भात, मासे, नारळ, पिठलं, राणभाज्या, फणस, आंबे, करवंद यामुळे आम्ही कधी उपाशी पोटी राहू असं होत नाही. मेहनत करायची ज्याची तयारी आहे त्याला निसर्ग उपाशी मारत नाही.. इतकं निसर्गानं आम्हाला दिलं आहे." यामुळेच कदाचित कोकणी माणूस काहीसा खंबीर असतो. निसर्गाचे सारे रंग त्याच्या स्वभावात आपणाला सहज दिसता. पण, ते हेरता आणि टिपका आले पाहिजेत. त्यामुळे गावच्या ओढीनं त्याची पावलं ही आपसूक उचलली जातात. गावात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीशी तो जोडलेला असतो. त्याला त्याच्याबद्दल आत्मियता असते. त्याच ओढीनं तो मिळेल ती संधी साधून गावी येतो. गावच्या मातीशी एकरूप होतो.


मला जुन्या माणसांनी सांगितलेल्या आठवणी आजही आठवतात. कधी - कधी संधी साधून मी अजून देखील या सर्वांशी बोलतो. त्यांचं ऐकतो. प्रत्येक गावच्या, वाडीच्या, कोकणच्या जुन्या आठवणी तुम्हाला अधिक समृद्ध करतात. नात्यांमधील गोडवा कळतो. दुर्गम भाग आणि वाडवडिलांनी केलेला संघर्ष यातून कोकणचं एक वेगळंच चित्र तुमच्या डोळ्यासमोर तरळतं. या साऱ्या गोष्टी ऐकायला अजून मजा येते. या साऱ्या गोष्टी अधिक भावतात. कोकणी माणसाच्या जीवनमानात. त्याच्या जीवनशैलीत झालेले बदल आणि त्याच्या स्वाभावाचे सारे पैलू यातून कळतात. कोकणी माणसाला समजून घेताना या साऱ्याचा अधिक फायदा होतो. गजबजलेली गावं आज ओस पडत आहेत. आज देखील कोकणातील काही गावांमध्ये प्राथमिक सोयी - सुविधा नाहीत. गावांमधून झालेलं स्थलांतर ही त्यात आणखी चिंतेची बाब. पण, गौरी - गणपती येताच हा सारा माहोल बदलून जातो. पोटापाण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठंही असला तरी कोकणी माणसानं त्याचा गाव सोडलेला नाही. गावच्या घरासाठी तो आजही झटतो. त्याची बांधणी, त्याची डागडुजी, घराभोवती झाडं लावणे, काही सोयीसुविधा करणे आणि घरचं घरपण राखण्याचा तो कसोशीनं प्रयत्न करतो. नात्यांमधील गोडवा जपण्यासाठी त्याला आवडते. या साऱ्या गोष्टी असल्या तरी कोकण सध्या एकाकी पडतंय ही गोष्ट नाकारता येत नाही. 


सणावारांसाठी गजबजलेल्या कोकणातील प्रत्येक गावात, वाडीत सध्या शांतता आहे. काही ठराविक माणसं सोडल्यास घरात कुणी नाही. गौरी - गणपती दरम्यान असलेला सारा किलबिलाट शांत झालाय. गडबड - गोंधळाची जागा नीरव शांततेतं घेतलीय. घरांना टाळी लागली आहेत. आपल्या माणसांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून उद्या पुन्हा उघडण्यासाठी दारं पुन्हा अधिर आहेत. आपल्या माणसांच्या येण्यानं शेत देखील तरारली होती. परसवातील झाडांना देखील दिमाखात सळसळत होती. पण, घरं रितं झाली आणि वातावरणातील प्रसन्नता गायब झाली. त्याची जागी कुंदपणानं घेतली. पुन्हा गावात जाताना गावचं हरवलेलं गावपण, एकाकीपण सहज जाणवतं. गजबजलेल्या गावांमध्ये अससेली शांतता अंगावर येते. कधी काळी राबता असलेली ठिकाणी आपल्या माणसांच्या शोधात दिसून येतात. गावात पाऊल ठेवताच अरेच्चा, इथं तर कधी काळी मज्जा असायची! पण, सध्या कुणीच नाही. या जाणीवेनं मन खिन्न होतं. स्थानिक मित्रमंडळींना भेटल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. पण, सध्या कुणीच नाही रे हा सुर मन उदास होऊन सोडतो. त्यामुळे कोकणातील गावांची एकाकीपणाची गोष्ट सारखीच असावी. कदाचित त्यात कमी - अधिक फरक असावा !