कातळशिल्प, कोकणातील सड्यांवर अर्थात माळरानावरची दगडावर कोरलेली प्रतिकृती. विविध आकारच्या प्रतिकृती विचार करायला भाग पाडतात. काही ठिकाणी तर होकायंत्र देखील आपली दिशा बदलतं अशी प्रतिकृती. हत्ती, रावण, एकशिंगी गेंडा यासारख्या प्रतिकृती आपल्या सारख्या सर्वसामान्यांना आवाक करून तोंडात बोटं घालायला लावतात. शिवाय तुमची उत्सुकता देखील ताणतात. लक्षणीय बाब म्हणजे, या कातळशिल्पांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली गेलीय. विविध देशातील अभ्यासक या ठिकाणी येतात. केंद्र सरकारनं देखील याची दखल घेत त्यांच्या अभ्यासासाठी, संवर्धन आणि संरक्षणासाठी पुढाकार घेत काही निधी उपलब्ध करून दिलाय. सध्या कोकणातील 260 हून अधिक ठिकाणी तब्बल 2600 पेक्षा जास्त कातळशिल्प आढळून आली आहेत. त्यावर अभ्यास सुरू आहे. गावकऱ्यांना, जमिन मालकांना विश्वासात घेऊन त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी पुढाकार घेतला जात आहे. पण, ही कातळशिल्प काही एका दिवसात दिसली किंवा उजेडात आली असं नाही. त्यासाठी कित्येक वर्षांची मेहनत आहे. सध्या या कातळशिल्पांना जागतिक दर्जा आणि वलय प्राप्त झालंय. केवळ सरकारचं नाही तर कोकणातील काही मंडळी आणि निसर्गयात्री सारख्या संस्था देखील यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पण, केवळ प्रशासन, शासन आणि संस्था किंवा व्यक्ति यांच्यापुरता मेहनत मर्यादित न राहता त्याला व्यापक स्वरूप प्राप्त होणं गरजेचं आहे. कोकणातील प्रत्येक व्यक्तिनं त्यासाठी जमेल तेवढं आपलं योगदान विविध पातळींवर देणं गरजेचं आहे. कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठल्या ना कुठल्या ठिकाणी आपला ठसा उमटवत आहे. विविध क्षेत्रात त्याचा वावर आणि नावलैकिक आहे. त्यामुळे कोकणातील या समृद्ध अशा वारसाला खऱ्या अर्थात लैकिक प्राप्त करून देण्यासाठी त्यानं खारीचा वाटा उचलला पाहिजे. कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी निसर्गयात्री संस्था आणि त्यांचे सदस्य अहोरात्र झटतात. धनंजय मराठे, सुधीर उर्फ भाऊ रिसबुड, ऋत्विज आपटे यांना मी भेटून कायम चर्चा करतो. त्यांच्याकडून नवी माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. या आडवाटेवरच्या समृद्ध वारसाबद्दल असलेली आपुलकी, त्याबाबतीत असलेली तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवते. साधारणपणे 15 वर्षापूर्वी (अंदाजे) त्यांचा सुरू झालेला प्रवास एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय. हा सारा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. पुढे देखील यात अनेक चढउतार, खाचखळगे असणार आहेत. पण, 'दगडधोंड्यांचा' हा 'प्रवास' त्यांना आवडतो. न थकता सुरू असलेल्या प्रवासात 'थांबा' मात्र नाहीय. पण, त्यानंतर देखील नव्या उमेदीनं हे काम सुरू असतं. यासारखी अनेक अशी माणसं आहेत जी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे त्यांना मदत करतात. पण, हे सारं पाहत असताना एक गोष्ट मात्र मनात नक्की येते, की कोकणी माणसाला याबद्दल काय वाटतं? आडवाटेवरच्या समृद्ध वारसाबद्दल त्याला काय वाटतं? तो देखील या प्रवासाचा भाग झाल्यास कदाचित तो पुढच्या थांब्याला तो उतरेल. पण, खडतर प्रवासात मिळालेली साथ प्रफुल्लित करणारी असेल. यासाऱ्याबाबत आलेले विविध अनुभव देखील पत्रकार म्हणून तुमच्या माहितीत अधिक भर घालणारे असतात.  


''अरे, आहेस कुठं''! रत्नागिरीमधील निसर्गयात्री संस्थेचे सदस्या असलेले भाई अर्थात सुधीर रिसबुड यांनी विचारलेला प्रश्न. ''बरेच दिवस झाले दिसला नाहीस. फोन नाही. परवाच तुझी आठवण आलेली.'' रत्नागिरीमधील देऊड येथील कातळशिल्पाला राज्य सरकारनं राज्य संरक्षित स्मारकाचा दिलेला दर्जा आणि त्यासाठी रिसबुड यांची झालेली भेट, असं ते निमित्त. पण, भाईंना किंबहुना कातळशिल्पांचं काय सुरूय? हे विचारण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा महिन्यांनी त्यांची भेट झाली होती. एरव्ही आमचं खूप काही बोलणं अधुनमधुन असायचं. पण, मागच्या अनेक दिवसांमध्ये ते झालंच नव्हतं. त्यात रत्नागिरीमध्ये कातळशिल्प संशोधन केंद्र सुरू झाल्यानंतर त्याठिकाणी देखील बरेच दिवस जाणं झालं नव्हतं. पण, पुन्हा एकदा उत्सुकता ताणली आणि भाईंनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरं किंवा माहिती यातून एक चांगली बातमी देखील हाती लागली. पुन्हा एकदा रत्नागिरीमधील कातशिल्प संशोधन केंद्रात गेलो. तोच एक तरूण मातीच्या मदतीनं कातळशिल्पांची प्रतिकृती तयार करत होता. मनात विचार आला ''याचं खुळेपणा चालुच आहे''. अर्थात हा खुळेपणा हा चुकीचा पद्धतीनं घेऊ नका. कारण, सध्या कोकणातील कातळशिल्प जगासमोर आली. पर्यटनासाठी नवी दालनं काही ठिकाणांची भर पडली यामागे हाच 'खुळेपणा' कारणीभूत आहे. अर्थात आमच्या कोकणात आम्ही याला खुळेपपणा म्हणतो पण, प्रमाण मराठी शब्द म्हणून 'वेडेपणा' बोलू. अगदी काही वर्षे म्हणजे 12 - 15 वर्षे मागे गेल्यानंतर याची उत्तरं मिळतात. निसर्गयात्री संस्था, त्यांचे सदस्य यांची ओळख तशी रत्नागिरीमध्ये आल्यानंतरची. म्हणजे साधारण चार - साडेचार वर्षापूर्वीची. पण, पत्रकार मित्र आणि लोकांकडून कातळशिल्पांचा शोध कसा लागला याची माहिती मिळाली होती. आमचा सुरूवातीपासूनचा कॅमेरामन उमेश सावंतनं तर यापूर्वीचे एबीपी माझाचे प्रतिनिधी सचिन देसाई यांच्यासोबत कशारितीनं कातळशिल्पांच्या बातम्या केल्या होत्या, त्याला कशी प्रसिद्धी मिळाली, त्यावेळी झालेला प्रवास, गेलेला वेळ आणि सारा अनुभव अगदी माझ्या डोळ्यासमोर उभा केला होता. त्यात तथ्य देखील होतं. कारण, मुंबईत ऑफिसमध्ये असताना याबाबतच्या बातम्या पाहिल्या होत्या. विविध लेख, माहिती देखील वाचली होती. त्यामुळे कातळशिल्पांबाबत उत्सुकता होती. आता ती आणखी चाळवली. शिवाय, मनातील अनेक शंकांची उत्तरं देखील मिळत होती. असो. पण, निसर्गयात्री संस्थेत भेटलेले सर्वच जण वेडेच! अर्थात 'वेडेपणा' असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत.  या संस्थेतील सर्वच सदस्यांनी झपाटून आणि समर्पण भावनेनं काम केलं आणि करत आहेत. त्याला रत्नागिरीतील अनेकांची साथ देखील लाभली. कदाचित यामुळेच कोकणातील कातळशिल्प जगाच्या नकाशावर आली. सध्या जवळपास नऊ कातशिल्प युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत आहेत. तर, राज्य सरकारनं सहा कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. याचा मोठा परिणाम कोकणच्या पर्यटनावर होणार आहे. शिवाय, वेगळी दारं, आयाम देखील खुले होणार आहेत.  


कोकणच्या सड्यावर असलेली कातळशिल्प ही हजारो वर्षापूर्वीची आहेत. साधारणपणे 10 हजार वर्षे किंवा त्याहून देखील आधीच्या काळातील असावीत असा अंदाज आहे. त्याच्या आयुष्यमानावर देखील अभ्यास सुरू आहे. कोकणातील सड्यावर अर्थात माळरानावर असलेली हि कातळशिल्प जगातील इतर कातळशिल्पांहून वेगळी असल्याचं अभ्यासक सांगतात. अर्थात साधारणपणे वर्षभरापूर्वी केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विभागाचे काही तज्ञ्ज मंडळी कोकणात आली होती. त्यावेळी त्यांना भेटण्यासाचा योग आला. उक्शी गावातील कातळशिल्पांना या मंडळींनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांचं संभाषण ऐकलं. अर्थात प्रामाणिकपणे सांगायचं तर तांत्रिक दृष्ट्या काही कळलं नसेल कदाचित पण, त्यांचं सुरू असलेलं संभाषण कोकणातील कातळशिल्प जगाच्या पाठिवर असलेल्या कातळशिल्पांहून कशी वेगळी आहेत हे कळत होतं. कोकणातील कातळशिल्पांवर अभ्यास करण्यासाठी रत्नागिरीमध्ये कातळशिल्प संशोधन केंद्र सुरू करण्यात आलंय. त्या ठिकाणी वेगवेगळी माहिती देणारी पुस्तकं आहेत. कातळशिल्पांवर अभ्यास करणारी काही मंडळी आहेत. अर्थात आत शिरताच माहिती देणारे बॅनर्स लावलेले आहे. अशा विविधांगी गोष्टी इथं पाहायाला, ऐकायला मिळतात. कातळशिल्पांबाबत संशोधन इथं जोरात सुरू असून काही दगड, विविध आकारातील वस्तु इथं पाहायाला मिळतात. अभ्यास करून त्याचे पेपर्स प्रसिद्ध करणे, त्याचं डॉक्युमेंटेंशन करणे या साऱ्या बाबी इथं सुरू असतात. अर्थात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत यांचा समावेश होण्यासाठी या साऱ्याचा उपयोग होणार आहे. राज्य सरकार सध्या राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषणा करत आहे त्यामागे देखील या सर्व लोकांचा, संस्थांचा हात आहे.


कोकणातील कातळशिल्पांना पाहण्यासाठी लाखो पर्यटक येऊन गेले. माळरानावर असलेली ही कातळशिल्प तसं म्हटलं तर कुतुहलाचा विषय. वेगळ्या आकृती. त्या ठिकाणी मिळणारे रिझल्ट वेगळे. मला यामध्ये कुतुहलाचा भाग एकच वाटतो तो म्हणजे इतक्या हजारो वर्षानंतर ऊन, वारा सहन करत, निसर्गात झालेले बदल सोसत हि कातळशिल्प आजही शाबूत आहेत. मी कायम म्हणतो कि मानवी उत्क्रांतीशी अभ्यास करताना तो उलगडताना यांचा मोठा फायदा होणार आहे. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील याची दखल घेतली आहे. त्या ठिकाणचे अभ्यासक देखील कोकणात येतात. 


मी कायम एक गोष्ट सहजपणे कुणालाही सांगतो. आम्हा कोकणी माणसांना निसर्गानं भरभरून दिलं आहे. आम्हाला कशाची कमी नाही. पण, निसर्गानं दिलेल्या गोष्टींची जाणीव, महत्व किती आहे? हा देखील कळीचा मुद्दा आहे. कोकणातील पर्यटन, ठिकाणं याबद्दल सातत्यानं बोललं जातं. अगदी गोव्याप्रमाणे कोकणातील पर्यटन कसं जागतिक पातळीवर आहे याचे दाखले दिले जातात. पण, कोकणी माणूस म्हणून त्यासाठी घ्यावा लागणारा पुढाकार, शिस्त प्रत्येकजण घेतो का? ती शिस्त पाळतो का? याचं उत्तर मिळणं गरजेचं आहे. सध्या लाखो पर्यटक कोकणात दरवर्षी येतात. पण, पायाभूत सोयी - सुविधांचा अभाव. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या बीचला महिला - भगिणींसाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधा सहजपणे उपलब्ध आहेत का? यातून मिळेल. कोकणातील पर्यटनासाठी विविध घोषणा केल्या जातात. पण, पायाभूत सोयी - सुविधांचं काय? आत उपलब्ध असलेले ह़ॉटेल्स, रिसॉर्ट यांचे दाखले दिले जातील. पण ते सर्वसामान्यांना परवडणारे आहेत का? किंवा सामान्य घरातील दहा व्यक्ति आल्यास त्यांनी करायचं काय? हा प्रश्न आहेच कि. मुख्यबाब म्हणजे समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबायचं आणि कपडे बदलण्यासाठी काही मीटर अंतरावर असलेल्या रूमवर जायचं हे करण्याशिवाय पर्याय नाही. अशाच काही गोष्टी या कातळशिल्पांच्या बाबतीत आहेत. 


मुळात कातळशिल्पांची हि ठिकाणी थोडी लांब आणि आडवाटेवर आहेत. इथं येणाऱ्या पर्यटकाला लागणाऱ्या सोयी - सुविधांचं काय? सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी स्थिती असताना स्थानिकांनी पुढाकार घेणे गरजेचं आहे. सरकारनं देखील त्यासाठी नियमांची आडकाठी थोडी बाजुला सारणं गरजेचं आहे. कातळशिल्पांच्या या पर्यटनातून कशारितीनं रोजगार निर्मीती होऊ शकते याबाबत इथं काम करणाऱ्यांच्या अनेक संकल्पना आहेत. त्यातून स्थानिकांना मिळणारा फायदा याचा देखील प्लॅन या लोकांकडं आहे. अर्थात इतकी वर्षे काया झिजलव्यानंतर कदाचित त्याचं महत्त्व त्यांना अधिक ठावूक असावं. विशेष बाब म्हणजे कातळशिल्प पाहण्यासाठी विदेशातून देखील लोक येतात. यावरून त्याचं महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. पण, यापुरता गोष्टी मर्यादित न राहता एका चाकोरीबाहेरून येऊन प्रत्येकानं विचार करणं गरजेचा आहे. त्याचवेळी पर्यटनावर आधारित अशी कोकणची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल...!