पाकिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात घडलेल्या एका घटनेनं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. आधुनिक सिंधू राष्ट्रवादाचे जनक असलेल्या जीएम सईद यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त सिंध प्रांतामधील सन या शहरात स्वतंत्र सिंधू देशाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. तसे दरवर्षी पाकिस्तानमधील वेगवेगळ्या शहरात हे आंदोलन करण्यात येतं, पण या वर्षी त्या आंदोलनातील एका घटनेनं सर्व जगाचं लक्ष वेधलं गेलं. या आंदोलकांनी आपल्या आंदोलनाच्या दरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील इतर महत्वाच्या नेत्यांची पोस्टर्स झळकावली. या नेत्यांनी स्वतंत्र सिंधू देशाच्या मागणीला पाठिंबा द्यावा आणि पाकिस्तानच्या जाचातून सिंध प्रांताची सुटका करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली. या आधी पाकिस्तामध्ये स्वतंत्र बलुचिस्तानाची मागणी होत असताना आता वेगळ्या सिंधू देशाच्या मागणीनेही उचल खाल्ली आहे. यावरुन पाकिस्तानमध्ये दिसतं तसं सर्वकाही आलबेल आहे असं नाही.


पाकिस्तानचे खैबर-पख्तुन, पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान असे महत्वाचे चार भाग पडतात. आता गिलगिट-बाल्टिस्तानलाही वेगळ्या राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. यापैकी पंजाब आणि सिंध हे प्रांत समृध्द समजले जातात. तर खैबर-पख्तुन आणि बलुचिस्तान हे प्रांत अत्यंत मागास समजले जातात. त्यातल्या त्यात पंजाबचा विकास तुलनेनं जास्त झाला आहे. पाकिस्तानच्या लष्करावर, आयएसआय या गुप्तचर संस्थेत आणि राजकारणात पंजाबच्या लोकांचं पूर्ण वर्चस्व आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत पंजाबला कायम झुकतं माप दिलं जातं. या कारणामुळे पाकिस्तानच्या इतर प्रांतामध्ये असंतोष निर्माण होतोय. नेमक्या याच कारणामुळे 1971 साली पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांग्लादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला होता.


सिंधूचा इतिहास
पाकिस्तानचा सिंध हा प्रांत जगप्रसिध्द सिंधू संस्कृतीचे आणि वैदिक धर्माचे उगमस्थान आहे. महाभारतात सिंध प्रांताचा उल्लेख हा सिंधू देश असा आहे. पूर्वी भारताचा भाग असलेला हा भाग फाळणीनंतर पाकिस्तानच्या वाट्याला गेला. या प्रदेशातून वाहणाऱ्या सिंधू नदीमुळे सिंध प्रदेश सुजलाम सुफलाम झाला आहे. हजारो वर्षापूर्वी याच भागात सिंधू संस्कृतीचा जन्म झाला.


काळाच्या ओघात सिधू संस्कृती लयाला गेली. प्राचीन भारताच्या या भागावर अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केलं. नंतर ब्रिटिशांच्या आगमणानंतर या भागातील राजकीय गणितं बदलली. भारत पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा ब्रिटिशांनी हा भाग पाकिस्तानच्या हवाली केला.


धर्माच्या आधारे निर्मिती झालेल्या पाकिस्तानच्या राजकारणावर सुरुवातीपासूनच लष्कराचे वर्चस्व राहिलंय. त्यातही पंजाब प्रांताच्या अधिकाऱ्यांचं वर्चस्व आहे. पंजाबच्या वळणाने पाकिस्तानची दिशा ठरु लागली आणि हळूहळू इतर भागात असंतोष निर्माण होऊ लागला.


सिंध प्रदेशात सिंधी भाषा बोलणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच हिंदूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून या भागातील नागरिकांना सातत्याने लक्ष केलं जातं. या भागातील हिंदू मुलींचं सक्तीने धर्मांतर केलं जातं. तसेच हिंदूंची मंदिरे उद्धस्त केली जातात.


सिंधू राष्ट्रवादाचे जनक- जीएम सईद
आधुनिक सिंधू राष्ट्रवादाचे जनक समजले जाणारे जीएम सईद यांचा जन्म 1904 साली सिंध प्रांतातल्या सन या शहरात झाला. ब्रिटिश भारतात महात्मा गांधींनी सुरु केलेल्या 1920 सालच्या खिलापत चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. जीएम सईद यांनी पाकिस्तानच्या निर्मीतीपासूनच वेगळ्या सिंधू राष्ट्राची मागणी केली. जीएम सईद आणि पीर अली मोहम्मद रशिद यांनी 1967 साली वेगळ्या सिंधू राष्ट्रासाठी मोठं आंदोलन केलं. पाकिस्तान सरकारने सिंध भागात उर्दूचे सक्तीकरण केलं होतं. तसेच मुहाजिर म्हणजे शरणार्थी मुस्लिमांच्या विरोधात सरकारकडून अनेक धोरणं राबवण्यात येत होती. पाकिस्तानच्या लष्कराने हे आंदोलन चिरडलं आणि जीएम सईद यांना तुरुंगात टाकलं


पुढे 1971 साली बंगाली भाषेच्या आधारे बांग्लादेशची निर्मिती झाल्यानंतर जीएम सईद यांनी वेगळ्या सिंधी भाषेच्या आधारे स्वतंत्र सिंधू देशाची मागणी केली. जीएम सईद हे नावाजलेले साहित्यिकही होते. त्यांनी 60 पेक्षा अधिक पुस्तके लिहली आहेत. उर्दूच्या सक्तीकरणाच्या विरोधातील आंदोलन आणि वेगळ्या सिंधू देशाची मागणी केल्याने जीएम सईद यांना पाकिस्तान सरकारने तुरुंगात टाकले. त्यांनी आपल्या आयुष्यातील 30 वर्षे तुरुंगात काढली. जीएम सईद यांनी 'जिए सिंध चळवळी'चे जनक मानले जाते. शेवटी 1995 साली कराचीतील आपल्या घरात नजरकैदेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


मुहाजिरांची संख्या मोठी
भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर उत्तर भारतातून, खासकरुन पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली या भागातून अनेक मुस्लिम लोकांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यातील बहुतांश मुस्लिमांनी आताच्या सिंध प्रांतात राहायला प्राधान्य दिले. त्यामुळे या भागात शरणार्थी मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या शरणार्थी मुस्लिमांना तिथले मूळचे मुस्लिम लोक 'मुहाजिर' या नावाने संबोधत. मुहाजिर या शब्दाचा अर्थ म्हणजे बाहेरचे, स्थलांतरित किंवा शरणार्थी होय. त्यामुळे त्यांच्या देशभक्तीवर आणि धर्म भक्तीवरही सातत्याने संशय व्यक्त केला जायचा.


आजही या मुहाजिरांशी वेगळा व्यवहार केला जातो. त्यांना आपल्या देशभक्तीचे आणि धर्माच्या श्रध्देचे सर्टिफिकेट द्यावे लागते. सैन्यात आणि राजकारणात त्यांना नेहमी दुय्यम प्रतीची वागणूक दिली जाते. ते बोलत असलेल्या सिंधी भाषेला तुच्छ समजले जाते. त्यामुळे सिंधमधल्या या लोकांना आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव आहे. पण नाईलाजास्तव त्यांना हे सहन करावं लागतं. सिंधमध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.


पाकिस्तानचा आर्थिक कणा
सिंध प्रांत हा सिंधू नदीमुळे सुजलाम सुफलाम आहे. कराची सारखे जागतिक बंदर आणि हैदराबाद सारखे मोठे शहर याच सिंधमध्ये आहे. पाकिस्तानचा 70 टक्के आयकर हा याच सिंधमधून जातो अशी एक आकडेवारी सांगते. सिंधमध्ये प्राकृतिक गॅसचे 69 टक्के उत्पादन आणि कच्च्या तेलाचे 75 टक्के उत्पादन घेतले जाते. पाकिस्तानमधील अनेक मोठे व्यापारी, व्यावसायिक याच भागातले आहेत.


असे असले तरी सिंधमधल्या साधन सामग्रीचा वापर करुन पंजाबचा विकास केला जातो अशी भावना या भागातील नागरिकांची आहे. पाकिस्तानच्या राजकारणावर पंजाबचा प्रभाव असल्याने सिंधचे शोषण केलं जातं आणि त्याच्या विकासाकडं दुर्लक्ष केलं जातं अशीही भावना या लोकांमध्ये आहे. माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो, बेनझीर भुट्टो, आसिफ अली झरदारी याच प्रांतातले आहेत.


तसे पाहता सिंधची आपली एक वेगळी संस्कृती, वेगळा इतिहास आहे. सिंधू संस्कृतीचे उगमस्थान म्हणून जगभर या प्रदेशाची ओळख आहे. त्या संस्कृतीवर पाकिस्तानमधील पंजाबच्या लोकांनी आक्रमण करून ती पुसून टाकण्याचा घाट घातलाय. सिंधवर उर्दूची सक्ती केली जातेय.


आझादीचा नारा
पाकिस्तानच्या या भेदभावला कंटाळलेल्या सिंधच्या नागरिकांनी आता पुन्हा आझादीचा नारा दिलाय. पाकिस्तानापासून सिंधू देशाला स्वातंत्र मिळावं म्हणून 'जिये सिंध मुत्तहिद्दा महज' ही संघटना आंदोलन करत आहे. या संघटनेच्या वतीनं कराची शहरातही मोठं आंदोलन करण्यात आलंय. सध्यातरी हे आंदोलन अहिंसक मार्गाने, शांततेने पार पडत आहे. तरीही पाकिस्तानाच्या राज्याकर्त्यांनी हे आंदोलन चिरडायचा प्रयत्न केलाय. भविष्यात बलुचिस्तानप्रमाणे इथेही आंदोलकांनी शस्त्र हाती घेतली तर आश्चर्य व्यक्त करायला नको अशी परिस्थिती आहे.


पाकिस्तानमधील वेगळ्या सिंधू देशाच्या आंदोलनातील नेत्यांना पाक लष्कर आणि आयएसआयकडून गायब केलं जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. तसेच पाकिस्तानाच्या आश्रयात वाढणारे कट्टर दहशतवादी या भागात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांत प्रचंड असंतोष साचला आहे.


पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची 2008 साली हत्या झाली. त्यानंतर पुन्हा एकदा वेगळ्या सिंधू देशाची मागणी जोर धरु लागली. सिंध प्रांतातील नागरिकांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हितसंबंधासाठी 2011 साली सिंध नॅशनल मुव्हमेन्ट पार्टीची स्थापना करण्यात आली. सिंधच्या स्वातंत्र्यासाठी आता सिंधूदेश लिबरेशन आर्मीचीही स्थापना झालीय.


बलुचिस्तानची धग
पाकिस्तानात स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीची धग वाढत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध अशा या प्रदेशाचे पाकिस्तानकडून शोषण केलं जातंय. हे कमी की काय, आता चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरच्या माध्यमातून इथल्या स्त्रोतांच्या अगणित शोषणास सुरुवात झाली आहे.


बलुचिस्तानमध्ये होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये उपस्थित केलाय. 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केला. त्यामुळे बलुचिस्तानच्या लोकांची आणि जगभरातील विविध भागात राहून त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या नागरिकांची आशा पल्लवित झाली आहे.


बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी ही पाकिस्तानच्या निर्मीतीपासून सुरु आहे. या भागावर पाकिस्तानच्या लष्कराने जबरदस्तीने कब्जा केला आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लोकांना पाकिस्तानच्या लष्कराकडून आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेकडून गायब केलं जातं. नंतर त्यांचा कोणताही ठिकाणा लागत नाही. या प्रदेशातही बलोच, पख्तुन आणि हिंदू धर्माच्या लोकांची संख्या मोठी आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख 'भाऊ' असा करणाऱ्या करिमा बलोच या मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या महिलेचा कॅनडा येथे खून करण्यात आला. अशा अनेक मानवी हक्क कार्यकर्त्यांना पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेनं ठार केलं आहे. 2005 नंतर या घटनांत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येतंय.


स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीने आतापर्यंत जगाचे लक्ष वेधून घेतलं होतं. आता स्वतंत्र सिंधू देशाचीही मागणी पुढे येत आहे. यातून हे समजते की पाकिस्तानमध्ये सर्व काही आलबेल नक्कीच नाही.


अमेरिकेची नाराजी
अमेरिकेसाठी आणि जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करावी असे अमेरिकेने वारंवार सांगूनही पाकिस्तानने अद्याप त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अमेरिका सध्याच्या घडीला पाकिस्तानवर नाराज आहे. पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये अमेरिकेने कपात करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय मदतीचा वापर दहशतवादाला चालना देण्यासाठी केला जातोय हे भारताने वारंवार जगाच्या निदर्शनाला आणून दिले आहे.


पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील तज्ज्ञ असलेल्या एका अधिकाऱ्याने यावर आपले मत मांडले. ते म्हणाले की, "अमेरिकेची नाराजी ओढावून पाकिस्तान चीनच्या बाजूने जास्त झुकतोय. देशाच्या दीर्घकालीन धोरणासाठी हे परवडणारे नाही. बलुचिस्ताननंतर आता वेगळ्या सिंधू राष्ट्राची मागणी समोर येत आहे. या वेगळ्या राष्ट्रांची मागणी करणाऱ्या गटांना भविष्यात अमेरिका छुपा पाठिंबा देऊ शकते. असं जर झालं तर पाकिस्तानचे दोन नव्हे तर तीन तुकडे पडतील हे नक्की."


स्वतंत्र्य सिधू देशासाठी जे आंदोलन झाले त्यामध्ये पंतप्रधान मोदींचे पोस्टर झळकल्याचं अवघ्या जगानं पाहिलंय. त्या अर्थी बलुचिस्तान प्रमाणे वेगळ्या सिंधू देशाची मागणी करणाऱ्या लोकांना नरेंद्र मोदींकडून काही अपेक्षा आहेत. बरोबर 50 वर्षापूर्वी इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडून बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. आता त्याही पुढे जाऊन पाकिस्तानचे तीन तुकडे पाडण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपसूकच चालून आली आहे.