खरं तर बरेच दिवस झाले या सगळ्या प्रकाराला पण आज लिहितीये, कारण आज स्टोरीमध्ये एक अपडेट आहे...


एकोणीस एप्रिलला आमचं लग्न झालं आणि एकवीस एप्रिलला लग्नानंतरचं मॅंडेटरी देवदर्शन करायला मी आणि प्रसाद आमची वॅगन-आर घेऊन बाहेर पडलो. देवळात जाऊन परत निघालो आणि बोलत बोलत अल्काच्या चौकापर्यंत आलो. खरं तर प्रसादला राजमार्गानं गाडी चालवायची अॅलर्जी आहे की काय? इतकं तो गल्ल्या-बोळांमधनं गाड्या चालवतो. अनेकदा आमचे त्यावरुन खटके ही उडतात. पण त्यादिवशी मात्र, तो कुठल्या गल्ली-बोळात वळला नाही आणि मीही त्याला काही बोलले नाही.

एखाद्या निगेटिव्ह एनर्जीनं ओढत नेल्यासारखं आम्ही गेलो. देवा-बिवांवर विश्वास नसला तरी पॉझिटिव्ह-निगेटिव्ह एनर्जीवर विश्वास आहे माझा. तर अल्काच्या चौकातून डेक्कनकडे यायचं सोडून पुन्हा खेचल्यासारखे आम्ही शास्त्री रोडकडे गेलो. पुढे एका PMP बसनं दोन कारना डिव्हायडरकडे दाबलं. त्यातली पहिली कार पुढे निघून गेली. दुसरी आमची होती. कुठल्या वादाच्या फंदात पडायचं नव्हतं म्हणून थांबलो बस पुढे जायची वाट पहात, पण ड्रायव्हरनं खिडकीतून डोकावत शिवीगाळच सुरु केली.

बंद काचेआड ती मला ऐकू आली, इतका जोरजोरात तो ओरडत होता. प्रसाद खाली उतरला, तर कंडक्टर उतरुन आला, साहेब सोडून द्या, तो तसलाच आहे, मी सॉरी म्हणतो. आम्हीही फार विषय न वाढवता निघालो, तर ड्रायव्हर पुन्हा बाहेर डोकावत "माझ्या बापाचा रस्ता आहे, मी हवं ते करीन" म्हणत ओरडला. तिथे माझं डोकं सटकलं, मी बसच्या नंबरप्लेटचा फोटो काढून ठेवला, आणि PMPMLचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंना मेसेज लिहायला घेतला. पुढे निघालो.

सेनादत्त पोलीस चौकीच्या चौकात म्हात्रे पुलाकडे बस उजवीकडे वळली, आम्हीही वळलो पाठोपाठ. ड्रायव्हरनं आरश्यात ते पाहिलंही, त्यानं बस डावीकडे घेतली. बस-स्टॉप असेल असं वाटून त्यानं दिलेल्या मोकळ्या रस्त्यावरुन आम्ही पुढे निघालो आणि याच गोष्टीची वाट बघत असल्यासारखी त्यानं बस उजवीकडे घेऊन आमची कारला बस पूर्णपणे घासली. त्यानं हे मुद्दाम केलं हे उघडच होतं!

मी मुंढे सरांना लिहायला घेतलेला मेसेज पूर्ण ही झाला नव्हता. मी तो अपडेट करुन त्यांना तात्काळ पाठवला. जवळच पोलीस चौकी असल्यामुळे तिथं जाऊन तक्रार देणं वगैरे सुरु होतं तेव्हाच PMPML मधून एक फोन आला, मुंढे साहेबांनी फोन करायला सांगितलं म्हणत त्यांनी सगळा एपिसोड ऐकला. आम्ही कारवाई करतो म्हणाले. 20व्या मिनिटाला स्वारगेटहून त्या ड्रायव्हरचे साहेब आले. त्यांनी आमची गाडी बघितली आणि आम्हालाच सॉरी म्हणाले. माझ्या हातावरची मेंहदी, हिरव्या बांगड्या असला अवतार बघून त्यांनाही कळलंच की आमचं नुकतंच लग्न झालं आहे. वाईटात वाईट काय होऊ शकलं असतं याची त्यांनाही कल्पना आलीच असेल. त्यांनी त्या ड्रायव्हरला झापलंच, शिवाय सॉरी म्हण, तुझी चूक आहे म्हणत समजावलंही. पण तो ड्रायव्हर काही उर्मटपणा सोडायला तयार नाही.

शेवटी एफआयआर करुन रात्री साडेअकरा वाजता दोघं घरी पोचलो. कॉफी प्यायला थांबलो, मित्र भेटलेत म्हणत घरी थोपवलं होतं सगळ्यांना. त्यांना सगळी स्टोरी सांगेपर्यंत मुंढे सरांकडून मेसेज होता He has been suspended.

आज मुंढे सरांच्या एका पत्रकार परिषदासाठी PMPMLला गेले होते. प्रेस संपल्यावर त्यांना भेटले, तेव्हा एका मेसेजची दखल घेत त्यांनी तातडीनं मदत केली म्हणून थॅंक यू म्हणाले. तर त्यांनी आमच्या केसमधला ड्रायव्हर आणि अजून अशाच तीन-चार तक्रारी सामान्य नागरिकांकडून ही (म्हणजे मी ही सामान्यच आहे, फरक इतकाच की माझ्या नावाला एबीपी माझाची रिपोर्टर हा टॅग ही होता) आल्या होत्या म्हणून त्याही ड्रायव्हर्सची चौकशी केली आणि डिसमिस होतायेत ते या २/३ दिवसात असा रिपोर्ट दिला.

खरं तर कुणाची नोकरी जावी असं त्या ही दिवशी वाटत नव्हतं. आजही वाटत नाही. पण त्या ड्रायव्हरचा अॅटिट्यूड आणि आपल्याला कुणीच काही करु शकत नाही हा माज प्रचंड खटकला होता मला. मी तक्रार केली, त्याच्यावर कारवाईही झाली कारण तिथे तुकाराम मुंढेसारखा बारीक-सारीक तक्रारींचीही दखल घेणारा अधिकारी होता. आज ही ते म्हणाले, अगं अशा लोकांवर कारवाई करायची मलाही हौस नाही, पण चौघांवर कारवाई झाली की बाकी चारशे जण शहाणे होतात. मला पटलं. माझी एक छोटी तक्रार आणि मुंढे सरांसारखा अधिकारी यामुळे आपण सगळेच ‘आणखी एका’ संतोष मानेपासून वाचलो... एवढंच!