केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजीनगरच्या अयोध्या मैदानात मध्यप्रदेशातील बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम भरवला होता. गेल्या काही वर्षात बागेश्वर बाबांची रामकथा आणि दिव्य दरबार देशभरात चर्चेत आले. हिंदू धर्म, सनातन धर्मासाठी ते कार्य करतात. युवा संत म्हणून त्यांनी लाखो अनुयायी कमावले आहेत. अलिकडेच साईबाबा यांच्या बद्दलच्या वक्तव्यावरुन मोठा वादही झाला होता. अशा बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाची बुधवारी सांगता झाली. त्यावेळी निरोप घेतांना बागेश्वर बाबा यांनी काही मुस्लीम कुटुंब हिंदू धर्मात घरवापसी करत असल्याचे सांगितले आणि अनेकांना धक्का बसला.


अहमदनगर येथील जमीर शेख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांची हिंदू धर्मात घरवापसी करण्यात आली. धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते दीक्षा घेत त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. 'काही पिढ्यांआधी आम्ही हिंदूच होतो, परकीय आक्रमकांनी तलवारीच्या धाकाने मुस्लिम केलं होतं', आता परत हिंदू झालो असं शिवराम सांगतात.


जमीर शेख यांना घरवापसीसाठी बजरंग दलाने मदत केली. भारतातील बहुतांश मुस्लिम समाज हा मूळचा हिंदूच आहे, परदेशी आक्रमणामुळे त्याला धर्मांतर करावं लागलं अशी मांडणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा करत आलाय. सरसंघचालक मोहन भागवत यांनी तर फक्त भारतातीलच नाही तर भारतीय उपखंडातील सर्वांचं मूळ, सर्वांचा डीएनए एकच असल्याचं अनेकदा बोलून दाखवलंय.


एक काळ असा होता की आमिष दाखवून किंवा तलवारीच्या धाकाने सर्रास हिंदूंची धर्मांतरं केली जायची. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हे घडायचं. काही जण बजाजीराव निंबाळकरांचंही उदाहरण देतात. शिवरायांचे जवळचे सहकारी, स्वराज्याचे सरनौैबत नेतोजी पालकर यांचंही नाव समोर येतंं. पुरंदरच्या तहाच्या वेळी काही गैरसमज निर्माण झाले आणि नेतोजी पालकर शिवरायांपासून दूरावले.  पुढे औरंगजेबाने त्यांना अरबस्थानात पाठवल्याचा उल्लेख आहे.  मनाविरुद्ध त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला होता. मात्र काही काळ लोटला, ते परत हिंदुस्थानात आले, स्वराज्यात आले. या जिगरबाज योद्ध्याला पुन्हा हिंदू धर्मात परत घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी केलेले प्रयत्न आजही आदर्श मानले जातात.


त्यामुळे धर्मपरिवर्तन आणि घरवापसी हे आपण समजतो तेवढे नवीन मुद्दे नाहीयत. गेल्या काही वर्षात हिंदू संघटनांनी त्याबाबत जागरुकता वाढवली आहे. त्याचाच परिपाक म्हणजे जमीर शेखचं शिवराम आर्य होणं. सनातन धर्मावरील श्रद्धेमुळेच आपण धर्मांतर करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


आत्ताच्या प्रगत, आधुनिक युगातही धर्म हा मानवी जीवनाचा अतिमहत्वाचा भाग बनला आहे आणि हे नाकारण्यात फार अर्थ सुद्धा नाही. तसं नसतं तर जगभरात शेकडो वर्ष धर्मासाठी हजारो लढाया, क्रुसेड्स झाले नसते, जिहाद छेडला गेला नसता. हजारो किलोमीटरचं अंतर पार करत परकीय आक्रमक भारतात आले नसते, इथे लुटपाट, विध्वंस केला नसता. कधी विहिरीत पाव टाकून, कधी तांदळाचं पोतं देऊन, कधी वेगवेगळी आमिषं-प्रलोभनं दाखवून, तर कधी मानेवर तलवार ठेवून धर्मांतरं झाली नसती. भारताची फाळणी सुद्धा झाली नसती. स्वराज्याचे दुसरे छत्रपती. संभाजी महाराज यांनी धर्मासाठी वीरमरण पत्करलं. क्रुरकर्मा औरंगजेबाने त्यांचे हाल हाल केले पण त्यांनी इस्लाम स्वीकारण्याऐवजी यातनांनी भरलेलं मरण स्वीकारलं, हे आपण विसरायला नको.


इतकंच नाही संभाजी महाराजांच्या काही वर्ष आधी गुरु तेग बहादूर यांच्यासारख्या शिख गुरुंची सुद्धा औरंगजेबाने याच पद्धतीने हत्या केल्याची नोंद आहे. एवढ्या मागे ज्यांना जायचं नाही त्यांनी आयसिस-इस्लामिक स्टेटची तत्व आणि त्यांनी केलेले शिरच्छेद आठवावेत, आदिवासी भागातील धर्मांतरं, ओरिसातील फादर स्टेन्सची हत्या किंवा अगदी आत्ता सुरु असलेल्या इस्रायल पॅलेस्टिन संघर्षाबद्दल माहिती घ्यावी. त्यामुळे जगभरात जे काही सुरु आहे, त्यात धर्म हे कारण नाहीच असं मानत असू तर आपण स्वत:चीच फसवणूक करतोय इतकाच त्याचा अर्थ निघेल. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म अस्तित्वात नव्हता, साधारण चौदाशे वर्षापूर्वी इस्लाम धर्म अस्तित्वात नव्हता. आज हे दोन्ही धर्म लोकसंख्येच्या मानाने जगातील नंबर एक आणि नंबर दोनचे धर्म आहेत.


जात असो की धर्म असो अशा गोष्टी एकट्यादुकट्याने किंवा सोयीने नाकारण्यातही अर्थ नसतो हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. जबरदस्तीने धर्मांतर करावं लागणारांना परत आपल्या मूळ धर्मात यावं वाटणं साहजिक आहे.  पण त्यांची घरवापसी झाली, फोटो ऑप, बातम्या झाल्या म्हणजे काम झालं असं व्हायला नको. काहींच्या पूर्वजांचे शेकडो वर्ष आधी धर्मांतरं झाले होते. अशा व्यक्तींची जात कुठली असणार? त्यांना समाज स्वीकारेल, त्या नंतर एकटं पाडणार नाही याची काळजी घेतली तरच अशा घरवापसीबद्दल समाजातील विश्वास वाढेल.


धर्म ही खरं तर खाजगी बाब. घराच्या आत, उंबऱ्याच्या आत धर्म पाळा असं अनेक सुजाण पालक-नागरिक सांगत आले आहेत. तसं पाळणारे बहुसंख्येनं आहेत तोवर भारताच्या सोशल फॅब्रिकला धोका नाही. आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्यात चुकीचं काही नाही पण दुसऱ्याच्या धर्माला कमी लेखू नका एवढं तत्व पाळलं तरी देश सुखी होईल, जगणं आणखी सुंदर बनेल.