शाळा....या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय, याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते. म्हणजे आता मलाही दहावी पास आऊट होऊन २५ वर्ष झालीयेत. बऱ्यापैकी मोठा काळ आहे हा... असो....


तर खास सांगायचं म्हणजे माझ्या या शाळेचा अर्थात गिरगावातील आर्यन एज्युकेशन सोसायटी शाळेचा १९ फेब्रुवारी हा १२१ वा वर्धापन दिन. यानिमित्ताने आठवणींच्या शाळेत जाण्याचं ठरवलं. अन् मन फ्लॅशबॅकमध्ये गेलं. मनात अनेक क्षणांची गर्दी झाली, शाळेची पहिली घंटा झाल्यावर विद्यार्थ्यांची होऊ लागते तशी. माझी शाळा माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर... मी या शाळेत सीनियर केजीला जॉईन झालो, तिथपासून ते थेट दहावीपर्यंतचं शिक्षण इथेच झालं.

त्यामुळे शाळेशी इमोशनल बॉन्डिंग खूप घट्ट आहे. किंबहुना ती वास्तू नुसती बाहेरुन जरी पाहिली ना तरी समाधानाने झोप येते, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. त्या काळातली दगडी इमारत आजच्या टॉवरच्या जमान्यातही आपलं असं वेगळं अस्तित्त्व राखून आहे. त्या दगडी पायऱ्या. फक्त शाळेच्या नव्हे, तर भविष्यातल्या वाटचालीच्या. आत गेल्यावर शाळेचा भव्य आणि प्रशस्त असा हॉल.  वर्गाप्रमाणेच इथे आम्ही अनेक यादगार क्षण घालवलेत. म्हणजे श्रीकृष्ण जयंती महोत्सवातील स्पर्धा असो, किंवा वर्गाच्या एखाद्या नाटकाचं सादरीकरण. आम्ही सभागृहातील स्टेजवरचे ते क्षण शब्दश: जगलोय. त्या स्टेजवर क्रिकेटही खेळलोय. थँक्स टू महाले सर. कासार सर. या स्टेजने मला खऱ्या अर्थाने स्टेज दिलं, व्यक्तिमत्त्व विकासासाठी. अनेक वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, मराठी पाठांतर स्पर्धा यांची पर्वणी असायची. आम्हीही मोठ्या हिरीरीने भाग घ्यायचो. शाळेतला आणखी एक दिवस आमच्या मनात घर करुन आहे. तो अर्थातच दहीहंडीचा. श्रीकृष्णाची भव्य प्रतिमा आमच्या हॉलमध्ये आहे. त्याच्यासमोरची श्रीकृष्णाची पूजा आणि नंतर अर्थातच ज्याची चव इतक्या वर्षांनीही जिभेवर रेंगाळतेय त्या दहीपोह्यांचा प्रसाद. फक्त कॅलेंडरची पानं बदललीयेत, हे सारं अजूनही तसंच आहे. म्हणजे तेव्हा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये जायचो. आज माजी विद्यार्थी म्हणून जातो. तसंच दर्शन घेतो, दहीपोहेही घेतो. मस्तपैकी ताव मारतो, त्यावर होय, ताव हाच शब्द त्यासाठी योग्य आहे.  आतापर्यंत मी जितके पदार्थ खाल्लेत, त्या कशालाही या दहीपोह्याची सर नाही. नुसतं दहीपोहे म्हटलं तरी आम्ही आजही जिभल्या चाटत राहतो. फक्त आम्हीच नव्हे, पण माझ्या बाबांसारखे आता साठी-सत्तरीत असलेले माजी विद्यार्थीही न चुकता येत असतात. आमच्यासाठी तर तो दिवस म्हणजे एक छोटंसं गेट टुगेदर असतं. आता जसे शाळेतले विद्यार्थी बदललेत, तसे आमच्यावेळचे बहुतेक सर्वच शिक्षक निवृत्त झालेत. प्राथमिक आणि माध्यमिक दोन्हीतले. काही दुर्दैवाने या जगात नाहीयेत.



आमचा प्रायमरी शाळेतला नारायण मामा जो दुर्दैवाने आज आपल्यात नाहीये. हसऱ्या चेहऱ्याचा नारायण मामा, त्याचा सहकारी विष्णू मामा, ज्यांचा फक्त डोळ्यांचा धाक विद्यार्थ्यांना वर्गात पिटाळायला पुरेसा होता त्या हिराबाई. हे सारे प्रायमरीत असताना आमचे फॅमिली मेंबर होते. म्हणजे आजही आमच्या मनातलं त्यांचं स्थान अगदी तसंच आहे. शिशु वर्गातली ती लाल रंगाची घसरगुंडी आजही आठवतेय. त्या घसरगुंडीने आम्हाला एखादी ठेच लागल्यावर पुन्हा उठून उभं राहत परत झेप घ्यायची आणि डोक्यात हवा जाऊ न देता पुन्हा जमिनीवरच राहायचं हे जणू शिकवलं.  शिशु वर्गातील आमच्या गांगोळी ताई, सुषमा ताई, मुख्याध्यापिका दांडेकर बाई, नंतर प्रायमरीमध्ये वैशंपायन बाई, पटवर्धन बाई, वैद्य बाई. मी साधी होडीच्या पलिकडे प्रगती कधी गेली नाही, त्या हस्तकलेच्या पांजरी बाई. तेव्हा नव्यानेच शाळेत दाखल झालेल्या आणि आताच्या प्रिन्सिपल कडलाक बाई. किती नावं घेऊ. काही नावं अनवधानाने राहिली असतील कोणी रागवू नका.  ही सारी आम्हाला घडवणारी मंडळी. म्हणजे आमचा मातीचा गोळा यांच्या हातात आला, आणि आज जे काही आम्ही आहोत, त्याचं सर्व श्रेय या मंडळींचं आहे. त्यांनी आमचे कान उपटले, त्याच वेळी आमच्यावर पोटच्या मुलासारखी माया केली. हे केवळ तोंडदेखलं नाहीये. खरंच मनापासून आहे. आमच्या आई-वडिलांसारखीच ही सगळी मंडळी आम्हाला उभं करणारे खांब आहेत.

या शाळेतला आणखी एक दिवस आमच्यासाठी काहीतरी खासच आहे, तो म्हणजे १३ डिसेंबर चौदा म्हणजे अंकात सांगायचं तर १३/१२/२०१४. आम्ही या दिवशी आमच्या १९९३ दहावी पास आऊट बॅचचं एक स्नेहसंमेलन केलं होतं, त्या कार्यक्रमाला आम्ही जमेल त्या मंडळींनी खाकी पँट-पांढरा शर्ट घालून यायचं असं ठरवलं. शाळेचा बॅचही लावला होता. सोबत अटेंडन्स शीटही बनवली आम्ही.

तो दिवस आमच्या मनावर कायमचा कोरला गेलाय. कारण, त्या दिवशी आम्हीही अनेक जण तब्बल २१ वर्षांनी म्हणजे १९९३ नंतर पहिल्यांदाच भेटत होतो. आता आमच्यापैकी अनेकांना मुलं झाली असली तरी आम्ही या कार्यक्रमात मात्र शाळेतली मुलंच झालो होतो. आमच्यापैकी अनेकांची वयानुसार, वाढलेली पोटं, त्यावरुन महाले सरांनी उपटलेले आमचे कान....सारं काही जसंच्या तसं आठवतंय.

त्या कार्यक्रमाशी संबंधित सगळं आर्टवर्क आमचा मित्र सतीश गुरवने केलं होतं. सतीश आज आमच्यात नाहीये. या निमित्ताने त्याची आठवण अस्वस्थ करतेय. त्याने फक्त त्याचं आर्टवर्कच कसब नव्हे तर जीव ओतला होता त्या कामामध्ये. या कार्यक्रमाला सुमारे ३७  विद्यार्थी आणि १७ शिक्षक उपस्थित होते. अतिशय हृद्य असा तो सोहळा होता.

आमच्या एकूणच वाटचालीत शिक्षक वर्गाचं आमच्या आयुष्यातलं योगदान खूपच मोठं आहे. हायस्कूलच्या परांजपे टीचर, पटवर्धन सर, वैद्य टीचर, करगुटकर टीचर, परब टीचर, भागवत टीचर, खाडिलकर टीचर, भोसले सर आदी मार्गदर्शकांनी आमची चांगली मशागत केली, त्याचं फळ आज आम्हाला मिळतंय. ( इथेही काही नाव राहिलीयेत, कृपया कुणीही रागवू नये) खास करुन माझ्यासारख्या मीडियातील व्यक्तीला शाळेत मराठी भाषेवर घेतल्या गेलेल्या मेहनतीचं मोल चांगलंच लक्षात येतंय. हायस्कूलला गेल्यावर परांजपे टीचर अटेंडन्स सुरु असताना आम्हाला रोज एक विषय लिखाणासाठी देत असत आणि तो शुद्धलेखनासह चेक करत असत. त्यामुळे विचार करण्यासोबतच लिखाण शुद्धच हवं ही शिस्त अंगी बाणली गेली.  इथे मी माझ्या कोणत्याही मित्र-मैत्रिणींचं नाव लिहित नाहीये. संख्या खूप मोठी आहे. तीही आहे माझी एक्सटेंडेड फॅमिली.

ज्या शाळेत आपण शिकलोय, त्याच शाळेतील एका बक्षीस समारंभाला पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचा बहुमानही मला एकदा मिळाला होता. तेव्हा भाषण करताना तोंडातून शब्द कमी आणि डोळ्यातून अश्रू जास्त येत होते. त्या अश्रूंसोबत मी शाळेमध्ये जगलेले क्षण वाहत होते म्हणून असेल कदाचित.

शाळेत कधी जाणं झालं की, हमखास एखाद्या वर्गात हजेरी लावायची आणि पुन्हा शाळेत जाण्याचा फील घ्यायचा प्रयत्न करत असतो. कारण, शाळेतल्या त्या वर्गातील बाकांवर मन अजूनही रेंगाळतं, घुटमळतं. त्या बाकांवर आम्ही ठेवलेल्या वही-पुस्तकांचा गंध अजूनही वातावरणात आणि आमच्या मनात दरवळतोय असं वाटतं. एखाद्या उंची परफ्युमपेक्षाही सुगंधित करणारे ते क्षण. आता कदाचित आम्ही त्या बाकांवर बसलो तर मावणारही नाही. इतक्या आकाराचे झालोय. पण, तरीही त्या बाकावर बसण्याचं जे समाधान आहे ना ते कुठल्याही एसी कारच्या लॅव्हिश सीटवर किंवा फाईव्ह स्टार हॉटेलच्या आलिशान रुममधील सीटवर बसून मिळणार नाही.

ते वहीवरचं क्रिकेट खेळणं, मधल्या सुट्टीतील डबा खाणं, सारं कालपरवा घडल्यासारखं वाटतंय. सोबतच शाळेतलं पटांगण, तिथलं ते आमचं स्काऊटचं संचलन, ध्वजारोहण सोहळा, मधल्या सुट्टीतील किंवा पीटीच्या वर्गातील क्रिकेट. हे आम्ही फक्त अनुभवलेले क्षण नाहीयेत, तर हे एकेक पोट्रेट आहे, आमच्या मनात कायमचं कोरलं गेलेलं. कधीही न पुसता येणारं. किंबहुना या क्षणांनी आम्हाला समृद्ध केलंय. आजच्या धकाधकीच्या, तीव्र स्पर्धेच्या काहीशा स्वार्थी जगात तग धरायला आम्हाला शिकवलंय ते याच अनमोल क्षणांनी. सोबत कँटिनमधला तो वडापाव. आजही ती भूतकाळातली वडापावची तिखट चाव वर्तमान गोड करते.

आज शाळेच्या १२१ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाबद्दल आवर्जून माहिती देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी आमोद उसपकरांचा फोन आला आणि मन रिवाईन्ड झालं. केजी ते दहावीच्या आठवणींची शाळा मनात भरली. म्हणजे हे सगळे क्षण आतमध्येच होते, ते या निमित्ताने एकत्र झाले. लहानपण देगा देवा....म्हणतात ना...तसं वाटलं. पुन्हा लहान होऊया, शाळेत जाऊया. पण, तसं वास्तवात शक्य नाही. म्हणून सध्या फक्त आठवणींच्या शाळेत, शाळेच्या आठवणींमध्ये. रममाण होऊया.