Andheri East Bypoll: अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेण्यामागचे खरे कारण काय? भाजपने हा निर्णय महाराष्ट्राची राजकीय परंपरा टिकवण्यासाठी घेतला आहे की पक्षाचे फायदे डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे? आगामी मोठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून छोट्या निवडणुकीत भाजपने आपल्या उमेदवाराचा कसा बळी दिला ते जाणून घेऊ.


भावना या केवळ दिखाव्यासाठी असतात हे भारतीय राजकारणाच्या इतिहासात वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पक्षाचा नफा-तोटा पाहूनच राजकीय निर्णय घेतले जातात. राजकारण्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही असेच काही घडले आहे का? या वर्षी मे महिन्यात या भागातील आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर येथे पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपने येथून मूरजी पटेल यांना तिकीट दिले, तर ठाकरे गटातील शिवसेनेने रमेश लटके यांच्या विधवा ऋतुजा यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला. ऋतुजा या बीएमसीमध्ये लिपिक म्हणून काम करत होत्या. निवडणूक लढविण्यापूर्वी राजीनामा स्वीकारणे आवश्यक होते. ऋतुजा यांचा राजीनामा स्वीकारण्यात अडथळे आणल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला. ऋतुजा यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर अखेर त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपला पत्र लिहून विनंती केली आहे की, महाराष्ट्रात अशी परंपरा आहे की कोणीही दिवंगत आमदाराच्या जागी त्यांच्या घरातील व्यक्ती निवडणूक लढवल्यास विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात उमेदवारी देत ​​नाहीत. अशा परिस्थिती ऋतुजा लटके यांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या उमेदवाराचा अर्जही भाजपने मागे घ्यावा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हीच मागणी केली आहे. सुरुवातीला भाजपने या विनंतीवर कोणताही निर्णय घेतला नाही, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीच्या अवघ्या 3 तास ​​अगोदर दिवंगत आमदाराच्या स्मरणार्थ उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले.


मात्र आता प्रश्न असा पडतो की, भाजपने दिवंगत आमदारांना आदर दाखवायचाच होता, तर त्यांच्या उमेदवाराने फॉर्म का भरायचा? वेळेचाही प्रश्न आहे. अर्ज माघे घेण्यासाठी शेवटच्या तासांपर्यंत का थांबायचे? भाजपला आपली प्रतिमा वाचवण्याचे निमित्त मिळावे म्हणून मनसे आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी पत्र लिहिले होते का?


राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेण्यामागे राजकीय कारण आहे. अंधेरीच्या जागेवर ऋतुजा लटके यांच्यासाठी सहानुभूतीची लाट असून अशा परस्थितीत भाजपला ही जागा मिळणे कठीण असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पोटनिवडणुकीपेक्षा मुंबई पालिका निवडणूक भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. यावेळी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी पक्ष आपली पूर्ण ताकद लावत आहे. अंधेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार उभा केला असता, तर ठाकरे गटातील शिवसेनेने मुंबईत भाजप मराठी माणूस दडपत असल्याचे सांगत निवडणूक प्रचारादरम्यान भाजपवर निशाणा साधला असता, अशी भीतीही भाजपला वाटत आहे. भाजपचे उमेदवार मूरजी पटेल गुजराती, तर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या मराठी आहेत. अंधेरीत गुजरातींची संख्याही मराठीच्या तुलनेत कमी आहे.


भाजपने आपला उमेदवार माघे घेऊन ऋतुजा लटके यांचा विजय सोपा केला आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. या जागेवरून सहाहून अधिक अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. 3 नोव्हेंबरला मतदान आहे.