राजकारणाची आताशी कुठे अडीच घरं चाललेला आदित्य महाराष्ट्राशी संवाद साधतोय. पटावरील 78 वर्षीय ‘वजीर’ आडव्या उभ्या तिरप्या चालीनं शत्रूच्या सैन्यासोबत एकटाच लढतोय. सत्तेच्या सारीपाटावरील ‘राजा’ने हत्ती, घोडे, उंटासह चांद्यापासून बांद्यापर्यंत यात्रा काढली. बेरोजगारी, आर्थिक मंदीचे दाटलेले ढग, शेतकरी आत्महत्या, असे अनेक प्रश्न पुढे असताना देखील विरोधकांचे एक-एक सुभेदार आपल्या सैन्यात दाखल केलेत. ' पुन्हा मी येणार...' असं सांगत आपल्याला महाजनादेश मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर दुसरीकडे नेहमी आपल्या सडेतोड, बेधडक आणि मार्मिक वक्तव्याने हेडलाईनमध्ये असलेले राज ठाकरे मात्र सध्या ऑफलाईन आहेत.! ते ही ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर. लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नसताना राज यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. मोदी-शहा या जोडगोळी विरोधात रान पेटवलं. मोदींनी सभा घ्यावी आणि त्यांनतर राज यांनी ' लाव रे तो व्हिडीओ' असं म्हणत मोदींच्या वक्तव्याची, सरकारच्या धोरणाची चिरफाड करावी हे ठरलेलं. खरं तर राज ठाकरे आपल्या सडेतोड बोलण्यामुळे चर्चेत राहतात. मात्र सध्या चर्चा आहे ती त्यांच्या न बोलण्याची.


राज ठाकरेंच्या राजकारणाचा थोडा इतिहास पहिला तर लक्षात येईल की त्यांच्या प्रत्येक भूमिकेची चर्चा झाली. पक्ष स्थापनेपासूनच त्याला सुरुवात होते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी मार्च 2006 रोजी नवा पक्ष काढला. शिवसेनेतून बाहेर पडणारे राज एकटे नव्हते. त्यांच्या अगोदर भुजबळ, राणे यांच्यासारखे मत्ताबर नेते शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या वळचनीला गेले होते. तर राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला होता. त्यामुळे राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देशभर चर्चा झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्थापनेनंतर तीन वर्षांनी म्हणजे 2009  साली पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविली. यावेळी मनसेनं तब्बल 143 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी मुंबई, पुणे, नाशिक,  ठाणे येथील तेरा उमेदवारांना गुलाल लागला. आणखी तेरा उमेदवारांनी दोन नंबरची मत मिळवली. तर तब्बल एकोणतीस जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. मनसेनं पहिल्यांदा विधानसभा लढताना घवघवीत यश मिळवलं. त्यांनतर नाशिक महानगरपालिकेत मनसेचा महापौर बसला. पुणे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील मनसेच्या दणदणीत यशानं महाराष्ट्र ढवळून निघाला. उद्धवच्या शिवसेनेपेक्षा राज यांची मनसे कशी सरस हे सांगणारा हा काळ. राज हेच बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार असल्याची शिवसैनिकांची देखील मानसिकता तयार होत होती. राज यांच्या सभांना होणारी गर्दी, त्यांच्या भाषणाची स्टाईल, भूमीपुत्रांना नोकरी, मराठी पाट्याचं आंदोलन, परप्रांतीयांविरोधातील लढा असो की टोलचा प्रश्न मनसेची 'खळखट्याक' आंदोलनं नेहमीच चर्चिली गेली. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा हा सर्वोच्च काळ.

जशी राज यांच्या यशाची चर्चा झाली. तशी अपयशाची चर्चा ही होणारच. मग मनसेचा पडता काळ चर्चेत आला. दुसऱ्याच विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर गेलेल्या 13  शिलेदारांपैकी अनेकांनी मनसेला रामराम केला. त्यांची कारणं आणि परस्थिती वेगवेगळी असेल. नेते सोडून गेले तसा राज ठाकरे यांचा मतदारही दुरावला गेला. त्यांनतरच्या म्हणजे 2014 लोकसभा निवडणुकीत मनसेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचं डीपॉझिट जप्त झालं. विशेष म्हणजे निवडणुकी पूर्वीच राज ठाकरे यांनी मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता. मात्र असं असताना देखील मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात यश आलं नाही. विधासभा निवडणुकीतही मतदारांनी 'राजा'ला साथ दिली नाही. दीडशेहून अधिक जागा लढलेल्या मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला. या दारुण पराभवानंतर  पक्ष बांधणी, कार्यकर्त्यांना नवा कार्यक्रम देणं गरजेचं होतं. मात्र स्वतःच्या धुंदीत वावरणाऱ्या राज यांनी अलिप्ततेचं धोरण स्वीकारलं. मग पालिका निवडणुकीतही मनसेचा उलटा प्रवास सुरुचं राहिला. मतांच्या राजकारणाची बेरीज भलेही राज यांना जमली नसेल, मात्र त्यांच्या बेधडक बोलण्याचा महाराष्ट्र चाहता आहे. त्यामुळेचं गर्दी आणि राज यांचं समीकरण कायम राहील. आपल्या खास ठाकरी शैलीत राज यांनी केलेली भाषणं लोकांनी डोक्यावर घेतली.

राज यांच्या भाषणाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा झाली ती व्यंगचित्रकार राज ठाकरे यांची. कधीकाळी मोदींचे प्रशंसक असणाऱ्या राज यांनी कुंचल्यातून मोदींच्या धोरणाला फटकारले. व्यंगचित्रातून राज मोदी- शाह यांच्या नेमक्या वर्मावर बोट ठेवत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हे वातावरण राज यांनी एका उंचीवर पोहोचवलं. प्रत्यक्षात निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा राज लोकांना अधिक आश्वासक वाटत होते. त्यांच्या भाषणाचे मुद्दे, स्टाईल लोकांना अधिक भावली. मनसेप्रमुखांना सूर गवसला असं वातावरण पहायला मिळालं. मात्र पुन्हा एकदा ते मतात परावर्तित करण्यात अपयश आलं. हे अपयश नसून ईव्हीएमचं यश असल्याची भूमिका राज यांनी घेतली. मग ईव्हीएम विरोधी लढा, त्यासाठीच्या लढ्याचं नेतृत्व करत पार निवडणुकीवर बहिष्काराच्या भूमिकेपर्यंत राज पोहोचले. लोकसभा निवडणुकीत उमेदवार नाही, विधानसभेला बहिष्कार यामुळे उरला सुरला कार्यकर्ताही मनसेपासून निसटून जायचा म्हणून फेरविचार सुरु केला. मनसे निवडणूक लढेलही मात्र सध्या राज ठाकरे आणि मनसैनिक शांत आहेत. आता मनसेने रस्त्यावर उतरुन आंदोलनच करावं असं नाही. आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्याने समोरच्यांना उघडं पाडणारे राज ठाकरे सोशल मीडियावर देखील फक्त अभिवादन,  अभिनंदन आणि शुभेच्छा ऐवढ्या पुरतेच उरलेत. 26 जानेवारील स्वतंत्रते न बघवते... हे राज यांचं शेवटचं व्यंग चित्र. त्यांनतर कुंचल्यातून व्यक्त होणारा हा माणूस शांत आहे. त्यामुळे माध्यमं, विरोधकांच्या मुस्कटदाबीवर बोलणाऱ्या राज यांचीच मुस्कटदाबी सुरु नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण कोहिनूर प्रकरणात ईडीकडून झालेल्या साडे आठ तासाच्या चौकशीनंतर राज यांच्यातील ठाकरी बाणा बघायला मिळाला नाही. ना ते बोलतायत ना त्यांचा कुंचला... खरं तर राज यांचं असं मौनात जाणं नवं नाही. मात्र सध्या त्यांचा पक्ष अस्तित्वासाठी झुंज देत असताना या परिस्थितीत हे घडतंय ते जास्त चिंताजनक आहे. आता भाजपच्या चालीने राज ठाकरे 'चेक मेट' झालेत की नव्या चालीने पुन्हा नवा डाव मांडतायत हे येणारा काळ सांगेल.