21 मे या तारखेचं भारतीय इतिहासात एक मोठं महत्त्व आहे . 21 मे याच तारखेला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी, ज्यांनी भारतात संगणक युग आणलं, त्यांची निर्घृण हत्या झाली. सगळा देश शोकात बुडाला. पण याच दिवशी एक चांगली घटना घडली. देशातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असणाऱ्या मोहनलालचा जन्म पण २१ मेचाच. मोहनलालच्या देशभरातल्या चाहत्यांसाठी हा दिवस म्हणजे जणू उत्सवच असतो. पण याच दिवशी अजून एक महत्त्वाची घटना अशी घडली, जी दुःखद आहे कि, सुखद याबद्दल लोकांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात. 21 मे याच दिवशी (21 मे, 1999 प्रिसाईजली ) 'सूर्यवंशम ' प्रदर्शित झाला होता. जो माणूस सिनेमा बघतो आणि ज्या माणसाच्या घरी टेलिव्हिजन सेट आहे त्या माणसाला 'सूर्यवंशम' माहित नाही, असं होऊच शकत नाही.


वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक वेळा  'सूर्यवंशम' पाहणारे लोक आणि या सिनेमाचा पराकोटीचा तिरस्कार करणारे लोक अशा दोन प्रकारच्या गटांमध्ये भारतीय चित्रपटरसिक विभागले गेले आहेत. 'सूर्यवंशम' या सिनेमावर जितके मीम आणि जोक्स बनले आहेत तेवढे अजून कुठल्याच भारतीय सिनेमावर बनले नसतील. विनोदी अर्थाने का होईना 'सूर्यवंशम' हा अमिताभच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा सिनेमा आहे. कारण त्या सिनेमाची 18 वर्षानंतर पण समाजमाध्यमांमध्ये चर्चा किंवा उल्लेख होत नाही असा एकही दिवस जात नाही. IMDB सारख्या वेबसाईटवर या चित्रपटाला 6.1 रेटिंग आहे. म्हणजे 'गुंडा' आणि बाबा राम रहिमच्या चित्रपटांपैकी थोडंच कमी. तर बच्चन साहेबांच्या या चित्रपटाचा आढावा घेणं आवश्यक आहे. ते इंग्रजीमध्ये म्हणतात ना ,You can hate it, you can love it, but you can not ignore it. 'सूर्यवंशम' याच कॅटेगरीमध्ये मोडतो.

जेव्हा अमिताभने 'सूर्यवंशम' साइन केला,  तेव्हा बच्चनचं फार काही बर चालू नव्हतं. काही वर्षांपासून 'निवृत्ती' घेतल्यानंतर बच्चन कमबॅक करण्यासाठी धडपडत होता. आपण निवृत्ती घेतल्यावर इंडस्ट्री थांबून राहील, असं त्याला कदाचित वाटत होते. पण जग देवासाठी पण थांबत नाही; तर अभिनयाच्या देवासाठी कशाला थांबेल. दरम्यानच्या काळात खान मंडळींनी बस्तान बसवलं. गोविंदा आणि नाना पाटेकर पण फॉर्मात होते. आपल्या एबीसीएल मार्फत सिनेमे काढून बच्चन जे सिनेमे बनवत होते, त्यात बच्चनना बघणं हा प्रामाणिकपणे सांगायचं तर वाईट अनुभव होता. 'मृत्यूदाता', 'कोहराम', 'मेजरसाब' आणि 'लाल बादशाह' सारख्या सिनेमांमध्ये बच्चनला अर्ध्या वयाच्या नायिकांसोबत नाचताना पाहणं आणि आऊटडेटेड कथानकांमध्ये पाहणं हा असह्य अनुभव होता. जणू त्या काळात खऱ्याखुऱ्या बच्चनचं कुणीतरी अपहरण करुन त्याच्या जागी कुणीतरी दुसराच आणून उभा केला आहे कि काय अशी शंका येण्याइतपत बच्चन त्यावेळेस पडद्यावर हरवलेला दिसायचा. 'कोहरा'मध्ये नाना पाटेकर समोर आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' मध्ये गोविंदासमोर बच्चनला दुय्यम भूमिकांमध्ये बघून हा एकेकाळचा सुपरस्टार आहे हे आम्हाला पटतच नव्हतं. त्याच काळात बच्चनने मिरिंडा नावाच्या कोल्डड्रिंकसाठी ऍड केली होती. त्याच्या त्यावेळेस लागणाऱ्या कुठल्याही चित्रपटापेक्षा ती ऍड जास्त चांगली होती. त्या ऍड ची टॅगलाईन बच्चनच्या चाहत्यांना चपखल लागू पडत होती- जोर का झटका धीरे से लगे. अशा वेळेस प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशम'ने बच्चनच्या चिंतेत अजूनच भर टाकली. 'सूर्यवंशम' चा आता कल्ट तयार झाला असला, तरी त्यावेळेस तो बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला होता.

हिंदी 'सूर्यवंशम' हा एका सुपरहिट तमिळ सिनेमाचा रिमेक होता. हिंदीमध्ये बच्चनने केलेली भूमिका मूळ सिनेमात शरथ कुमारने केली होती. त्यावेळेसच्या कुठल्याही तामिळ व्यवसायिक सिनेमाप्रमाणे या सिनेमात पण अतर्क्य घटना, बटबटीतपणा यांची रेलचेल होती. 'सूर्यवंशम ' ही कर्तव्यकठोर बाप आणि त्याच्या अपेक्षांना न उतरु शकणाऱ्या मुलाची गोष्ट सांगतो. मुलाचा आणि बापाचा असे दोन्ही रोल बच्चनने केले आहेत. कथेमध्ये एवढंच सांगण्यासारखं आहे. या चित्रपटातल्या एका प्रसंगात हिरा ठाकूर काही किलोमीटर अंतरावरुन अंगाई गीत गाऊन आपल्या बाळाला झोपवतो. गाण्यामधून कथानक पुढे सरकवणे ही एक कला आहे. 'सूर्यवंशम' च्या डायरेक्टरने या कलेमध्ये महारथ प्राप्त केली असावी. पाच मिनिटाच्या एका गाण्यात हिरा ठाकूर लग्न करतो, हनिमून करतो, त्याला मुलगा होतो, हिरा ठाकूरची बायको कलेक्टर बनते. काही मिनिटात कथानक इतकं पुढं कस ढकलायचं याची ट्रेनिंग एकता कपूरने (जिच्या मालिकांची कथानक टाईम मशीनमध्ये बसल्याप्रमाणे अनेक वर्ष पुढं जातात) या दिग्दर्शकाकडून घ्यायला पाहिजे. याशिवाय बसमधली उफाड्याची महिला कंडक्टर आणि 'जहरीली खीर'चा प्रसंग बघितल्यावर आयुष्यातला विनोदाचा अनुशेष दूर होण्याची शक्यता वाढते.

आपल्याकडे मोठ्या पडद्यावरच्या अनेक प्रेमकहाण्या गाजल्या. पण छोट्या पडद्यावरची एक प्रेमकहाणी पण बरीच लोकप्रिय आहे. ही लव्हस्टोरी आहे सेट मॅक्स आणि सूर्यवंशम मधली. सेट मॅक्स चॅनलवर सूर्यवंशम सिनेमा इतक्या वेळा दाखवला गेला आहे कि, त्यावरुन अनेक विनोद बनले आहेत. बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटून पण 'सुर्यवंशम'चा आज जो कल्ट बनला आहे त्याला सेट मॅक्स चॅनलची  सूर्यवंशम सिनेमावर असणारी विशेष मेहेरबानी कारणीभूत आहे. सूर्यवंशम सिनेमा प्रदर्शित होण्याच्या वेळेस जन्माला पण न आलेल्या पिढीला हा सिनेमा माहित आहे याचं श्रेय सेट मॅक्सला.

1999 साली जेव्हा सूर्यवंशम प्रदर्शित झाला, त्याच्या काही वेळ अगोदरच सेट मॅक्स चॅनल लॉन्च झालं होत. काही अनाकलनीय कारणांमुळे त्यांनी सूर्यवंशमचे टेलिकास्ट राईट्स शंभर वर्षांसाठी घेतले होते. आता जेव्हा दुभती गाय विकत घेता, तेव्हा तिच्यापासून जास्तीत जास्त दूध मिळवण्याचा प्रयत्न करणारच. 'सूर्यवंशम ' ही दुभती गाय आहे, असं सेट मॅक्सच्या लोकांना का वाटलं असावं हा संशोधनाचा विषय आहे.

खूप जण हा लेख वाचून आक्षेप घेतील कि, 'सूर्यवंशम ' सारख्या सिनेमावर इतकं लिहिण्याची गरज आहे का? असा आक्षेप घेणाऱ्यांनी समजून घ्यायला हवं की आवड निवड हा सापेक्ष प्रकार आहे आणि 'सूर्यवंशम' आवडणारा पण एक वर्ग अस्तित्वात आहे. शिवाय 'ट्रॅशी ' फिल्म्स आणि त्याचा लोकांवर असणारा प्रभाव हा माझ्या  संशोधनाचा विषय आहे . 'ट्रॅशी' सिनेमे किंवा कलाकृती प्रेक्षकांना का आवडतात याची अनेक कारणं आहेत. एकतर ताणतणावांनी भरलेल्या आयुष्यात या कलाकृती विनोदाची सुखद झुळूक आणतात. भले बहुतेक सुमार कलाकृतींचा उद्देश हा विनोदनिर्मिती नसली, तरी त्यातून अजाणतेपणी जी विनोद निर्मिती होते, त्यामुळे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होतं. 'ट्रॅशी' कलाकृतीची स्वतःची काही वैशिष्ट्यं आहेत. त्या लो बजेट असतात. दुसरं म्हणजे त्यांची निर्मिती मूल्यं हिणकस असतात. या चित्रपटांची पटकथा वाईट असते. संवाद विनोदी असतात. अभिनय आक्रस्ताळा असतो. या हिणकस निर्मितीमूल्यांमुळे अजाणता विनोदनिर्मिती होते, ती जगभरातल्या प्रेक्षकांना अपील होते, असं निरीक्षण आहे. एकाच वर्तुळात फिरणारे मेनस्ट्रीम सिनेमे बघून बघून काही प्रेक्षकांना कंटाळा आलेला असतो. त्यांना 'ट्रॅशी' सिनेमे एक हटके अनुभव देतात. त्यामुळे 'ट्रॅशी' सिनेमा किंवा कलाकृतींचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. फक्त अभिजात आणि यशस्वी चित्रपटांचंच मूल्यमापन करायचं असा निकष लावायचा ठरवला तर प्रवाहाच्या  दुसऱ्या काठावर  असलेल्या या चित्रपटांची नोंद कुठेच होणार नाही. हे चित्रपटसृष्टीच्या इतिहासाच्या डॉक्युमेंटेशनसाठी जितकं हानीकारक आहे तितकंच असे चित्रपट एन्जॉय करणाऱ्या प्रेक्षकांसाठी पण अन्यायकारक असेल. त्यामुळे जितकं 'कोर्ट' किंवा 'दिल चाहता है'सारख्या चित्रपटांचं मूल्यमापन व्हायला हवं तसंच ते 'गुंडा' आणि 'सूर्यवंशम'सारख्या चित्रपटांचं पण व्हायला हवं. हा लेख हा त्याच दृष्टीने एक छोटासा प्रयत्न आहे.

अगदी कालच खिचडी हा देशाचा 'राष्ट्रीय पदार्थ' होणार अशा बातम्या आल्या आणि सोशल मीडियावर विनोद व्हायला लागले. त्यातला एक विनोद होता -जर खिचडी हा राष्ट्रीय पदार्थ असेल तर, सूर्यवंशमला राष्ट्रीय सिनेमा म्हणून का घोषित केले जाऊ नये? दर्जा कसाही असो, काही सिनेमे टाइमलेस बनून राहतात हेच खरं.

संबंधित ब्लॉग

जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान 

अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका

गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट 

श्रीदेवी नावाचं फेनॉमेन 

कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)