इंडस्ट्रीमधल्या एखाद्याच्या कारकीर्दीचे मुल्यमापन नेहमीच हिट आणि फ्लॉप्स, तिकीट खिडकीवरचे आकडे यांनीच करायला नको. त्या माणसाने इंडस्ट्रीमध्ये भले पैसा आणला नसेल, पण तेवढंच किंबहुना त्यापेक्षा महत्वाचं काहीतरी आणलं असतं. मुकुल आनंद हा असाच एक अवलिया दिग्दर्शक होता. हिट चित्रपटांची संख्या हाच निकष लावायचा, तर कदाचित मुकुल हा यशस्वी लोकांच्या प्रभावळीत येणार नाही. अभिनव संकल्पनांचा वापर आणि बॉलिवूडवर जमलेली जुनाट संकल्पनांची जळमट ओरबाडून काढणं हा निकष लावायचा तर नक्कीच मुकुलला बॉलिवूडमधल्या 'ट्रेंडसेटर्स' च्या यादीत आघाडीच स्थान द्यावं लागतं. मुकुल आनंद अनपेक्षितपणे हृदयविकाराच्या धक्क्याने 1997 साली गेला नसता तर त्याने अजून काही तरी भारी आणि भव्य दिव्य केलं असत हे नक्की.


मुकुल आनंदच एक वैशिष्ट्य म्हणजे तो मोठी सिनेमॅटिक स्वप्न बघायचा. त्याचे सिनेमे भव्य असायचे, हिट्स भव्य असायचे आणि फ्लॉप्स पण तसेच भव्य असायचे. मुकुल आनंदच्या घराण्याच्या रक्तातच सिनेमा असावा. त्याचे काका इंदर राज आनंद हे एकेकाळचे प्रसिद्ध आणि यशस्वी संवादलेखक. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक टिनू आनंद हा त्याचा चुलत भाऊ. सख्खा छोटा भाऊ टीव्हीवर मालिका दिग्दर्शित करायचा. संगीत दिग्दर्शक आनंद राज आनंद हा पण नात्यात आहे.

सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हा त्याचा पुतण्या. घरातच सिनेमाचा वारसा असल्यामुळे मुकुलला लहानपणापासूनच माहित होत की त्याला सिनेमात जायचं आहे. मुकुलचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता 'कानून क्या करेगा'. 'केप फियर' या हॉलिवूड सिनेमावरून तो घेतला होता. 'कानून क्या करेगा' हा अतिशय उत्तम खिळवून ठेवणारा थ्रिलर होता. डॅनी डेंगझोप्पा हा खलनायकी भूमिकेत होता. त्याचा दुसरा सिनेमा 'एतबार ' पण हिचकॉकच्या 'डायल एम फॉर मर्डर ' वरून घेतला होता. पण मुकुल प्रसिद्धीच्या झोतात सर्वप्रथम आला तो 'सल्तनत ' या भव्य दिव्य सिनेमामुळे. या सिनेमात धर्मेंद्र आणि सनी देओल एकत्र आले होते. या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जुही चावलाचा हा पहिला सिनेमा. ह्या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी हा बॉलिवूडच्या इतिहासातला मैलाचा दगड मानला जातो. पण चित्रपट दणकून आपटला.

1987 साली आलेल्या 'इन्साफ ' मधून मुकुलने काही काळ प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या विनोद खन्नाच्या कारकिर्दीचे पुनरुज्जीवन केलं. 'इन्साफ' च्या रुपाने मुकुलला बॉक्स ऑफिसवरच पहिलं यश मिळालं. आदित्य पांचोलीला खलनायकी इमेजमध्ये सेट करणारा 'महा संग्राम' हा पण आपटला. आतापर्यंत मुकुलची प्रतिमा अतिशय उत्तम पण तिकीट खिडकीवर अपयशी ठरणारा दिग्दर्शक अशी बनली होती.

पण याच सुमाराला उतरणीला लागलेल्या सुपरस्टार बच्चनसोबत मुकुलची जोडी जमली आणि मुकुलच्या कारकिर्दीला चांगल्या अर्थाने कलाटणी मिळाली. साल 1990. बच्चनचा राजकारणात भ्रमनिरास होऊन तो पुन्हा सिनेमात पुनरागमन करण्याची धडपड करत होता. पण बॉक्स ऑफिसवरच यश बच्चनला सातत्याने हुलकावण्या देत होत. 'तुफान', 'मै आजाद हू' , 'अजूबा' तिकीट खिडकीवर दणकून आपटले होते. याचवेळेस मुकुल आणि बच्चनचा 'अग्निपथ' आला . मुकुल आनंदच्या बहुतेक सिनेमाच्या प्रेरणा या हॉलिवूड सिनेमावरून आलेल्या असतात.

'अग्निपथ' वर पण 'स्कारफेस'चा जाणवण्याइतका प्रभाव होता. 'अग्निपथ' हा बिग बजेट सिनेमा होता . या सिनेमातून कॅमेरावर्क आणि संकलन यात मुकुल आनंद दहा पावलं समकालीन दिग्दर्शकांपेक्षा पुढं गेला. या चित्रपटात एक प्रसंग आहे जो मुकुल किती स्किलफुल दिग्दर्शक होता, हे दाखवतो. आपल्या बहिणीला सोडवायला विजय दीनानाथ चौहान (बच्चन) अण्णा शेट्टीच्या (दीपक शिर्के)चा अड्डा असणाऱ्या झोपडपट्टीत दाटीवाटीच्या रस्त्यावरुन चालत आणि तिथल्या लोकांचा प्रतिकार मोडून काढत आत जातो तो प्रसंग मुकुलच्या टेकिंगसाठी बघावा. तिथे चिखलात लडबडलेल्या चौहान आणि शेट्टीची मारामारी म्हणजे कळसाध्याय आहे. या सिनेमात 'गॉडफादर' मधल्या मार्लन ब्रँडोप्रमाणे बच्चनने तोंडात कापसाचे बोळे ठेवून वेगळ्या आवाजात संवाद बोलण्याचा प्रयत्न केला होता. भारदस्त आवाज हाच ज्याचा यूएसपी आहे अशा बच्चनचा आवाज बदलण्याचा हा प्रयोग प्रेक्षकांना रुचला नसावा. चित्रपट तिकीट खिडकीवर फारसा चालला नाही. पण बच्चनला अभिनयासाठीचा कारकिर्दीतला पहिला वहिला राष्ट्रीय पुरस्कार 'अग्निपथ ' मुळे मिळाला. नंतर आला मुकुल-बच्चन जोडगोळीचा 'हम'. यात बच्चनसोबतच रजनीकांत आणि गोविंदा हे मोठे स्टार पण होता. 'हम' मधल्या तिन्ही कलाकारांना जोडणारा एक योगायोगाचा दुवा आहे. हे तिघेपण राजकारणात आले. बच्चन तर 1984 सालीच लोकसभा निवडणूक लढवून बसला होता. गोविंदाने पण लोकसभा निवडणूक लढवली आणि चक्क राम नाईक यांच्यासारख्या दिग्गजाचा पराभव करून खासदार बनला. आणि आता रजनीकांतने पण राजकारणात उतरण्याची घोषणा केली आहे. एक चक्र पूर्ण झालं.

'हम' बॉक्स ऑफिसवर चालला. बच्चनचा 'टायगर' आणि त्याची केसांना झटके देत मान हलवण्याची लकब प्रेक्षकांना खूप आवडली. नंतर बच्चनसोबत मुकुलने 'खुदा गवाह' सिनेमा केला. त्यात घोड्यांच्या शर्यतीचा जो प्रसंग आहे तो फक्त मुकुलसारखा गुणवत्तावान दिग्दर्शकच शूट करू शकतो. 'खुदा गवाह' चं बरचस शूटिंग अफगाणिस्थानमध्ये पार पडलं. हे शूटिंग जेंव्हा पार पडलं, तेंव्हा तिथे नजीबुल्ला यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही सरकार सत्तेवर होतं. 'खुदा गवाह' मध्ये एका माणसाला वधस्तंभावर चढवण्याचा प्रसंग आहे. तो प्रसंग जिथे चित्रित झाला, नेमकं त्याच जागी काही वर्षांनी तालिबान्यांनी नजीबुल्लाला क्रूरपणे हत्या करून लटकावलं. मुकुल आनंद नजीबुल्लाची आठवण निघाली की नेहमी अस्वस्थ व्हायचा. सुभाष घईसाठी 'त्रिमूर्ती' बनवणं ही मुकुलची मोठी चूक होती. सिनेमाचं चित्रिकरण चालू असताना घईने मुकुलच्या कामात खूप ढवळाढवळ केली असं म्हणतात. 'त्रिमूर्ती' दणकून आपटला. शाहरुखची कारकीर्द नुकतीच जोर पकडायला लागली होती त्याला 'त्रिमूर्ती' ने चांगलाच ब्रेक लावला.

'त्रिमूर्ती'चं अपयश मुकुलने मनाला लावून घेतलं. आपल्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये आपण ज्या ज्या चुका केल्या त्या आपण टाळायच्या अशी खूणगाठ त्याने बांधली. पुढच्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिण्यातच त्याने दोन वर्ष घालवली. तो प्रोजेक्ट होता 'दस'. सलमान खान आणि संजय दत्त मुख्य भूमिकांमध्ये होते. यात हे दोघे भारतीय गुप्तहेर अधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये होते. कथानकाला पुन्हा अफगाणिस्तानची पार्श्वभूमी होती. गुल (राहुल देव) नावाच्या आतंकवाद्याला पकडण्याच्या मोहिमेवर हे दोन अधिकारी असतात. या सिनेमातून मुकुलने शंकर-एहसान-लॉय या नवीन संगीतकार त्रिकुटाला मुकुलने संधी दिली होती.

सिनेमाचे काही प्रसंग आणि काही गाणी चित्रित झाली होती. एक जबरदस्त कलाकृती आपल्या हातून घडत आहे याची जाणीव चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकारांना होती. पण चित्रपटाचं शूटिंग चालू असतानाच डाव अर्ध्यावर उधळून मुकुल जगातूनच निघून गेला. नंतर 'दस' चा साउंडट्रॅक रिलीज करण्यात आला आणि काही गाण्यांचे व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले. 'सुनो गौर से दुनिया वालो, बुरी नजर ना हम पे डालो' हे गाणं तुफान हिट झालं. अजूनही सव्वीस जानेवारी-पंधरा ऑगस्टला हे गाणं हमखास वाजतं. 'दस' पूर्ण झाला असता तर तो बॉलिवूडच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरला असता हे नक्की. पण नियतीला हे मंजूर नव्हतं. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी मुकुल गेला. अनेक लोकांना आणि दर्दी प्रेक्षकांना हुरहूर लावून.

2001 सालानंतर बॉलीवूडने कंटेंट, तंत्रज्ञान, कॉर्पोरेटायझेशन याबाबतीत एकूणच जी कूस बदलली त्यात मुकुल अजून खूप काही करु शकला असता. असं काही करु शकला असता जे तो ज्या कालखंडात कार्यरत होता त्या काळात त्याला त्या काळाच्या मर्यादेमुळे करायला जमलं नव्हतं. काळाच्या पुढचा असण्याची बरीच किंमत त्याला चुकवावी लागली. लहान वयात आलेला मृत्यू हा बहुतेक काळाच्या पुढे असण्याच्या नैराश्यातून आला असावा. काळाच्या पुढं असणं हा बहुतेकांसाठी शाप असतो. ऑस्कर वाईल्ड म्हणून गेलाच आहे, "Why was I born with such contemporaries?" मुकुल आनंदच्या नशिबी पण ऑस्कर वाईल्डसारखंच भागधेय होतं.

अमोल उदगीरकर यांचे याआधीच ब्लॉग :


चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट


नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल


  गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू 

जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा

जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या 

एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी!

ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा

एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ?

जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान 

अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका

गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट 

श्रीदेवी नावाचं फेनॉमेन 

कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)