काही कारणांमुळे 'गर्दीश' या सिनेमाचं महाराष्ट्रात मोठं फॉलोईंग आहे . 'गर्दीश' मध्ये शिवाची जी फॅमिली आहे ती महाराष्ट्रीयन दाखवली आहे, त्यामुळे अनेक मराठी तरुणांना आपलं घरच त्यात दिसत असावं. त्याशिवाय अमरीश पुरी आणि जॅकी श्रॉफ यांच्यातले पिता पुत्राचे प्रेमाचे पण अवघडलेले आणि एकमेकांसमोर व्यक्त न होणारे जे संबंध आहेत ते तर शंभरातील नव्वद घरांमध्ये दिसतात. जॅकीच्या शिवाचं समाजात दहशत पसरवणाऱ्या गुंडाना अंगावर घेणं पण अनेकांना भावलं असावं. माझ्या मित्रपरिवारात आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये 'गर्दीश' तुफान आवडणारा एक मोठा वर्ग आहे हे नक्की.


1993 साली 'गर्दीश' आला तेंव्हा दर्जाच्या दृष्टीने हिंदी सिनेमाचं काही फारस बर चालू नव्हतं . चित्रपटांमध्ये ग्रे शेड असलेल्या नायकाचं किंवा अँटी हिरोच प्रस्थ वाढायला लागलं होत . शाहरुख खानचा 'बाजीगर ' आणि संजय दत्तचा 'खलनायक ' याच वर्षी प्रदर्शित झाले होते . डेव्हिड धवन -गोविंदा जोडी फॉर्मात यायला लागली होती .सिनेमात जरी हा अँटी हिरोंच्या उदयाचा काळ असला तरी याच काळात निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन आणि पंजाबमधील दहशतवाद संपवणारे के पी एस गिल यांच्यासारखे खऱ्या आयुष्यातले नायक प्रचंड लोकप्रिय होते.

भारतातला ओपिनियन मेकर असणारा मध्यमवर्ग हा शेषन आणि गिल यांच्यासारख्या लोकांकडे हे भ्रष्ट व्यवस्था साफ करतील या अपेक्षेने डोळे लावून बसला होता . बाबरी मस्जिद पाडल्यानंतर आणि जागतिकीकरण घरात आल्यामुळे वातावरणात एक प्रकारची सामाजिक अस्वस्थता होती . वर्तमानकाळ अस्थिर होता आणि भविष्यकाळ अनिश्चित . 'गर्दीश ' च कथानक ज्या मुंबई शहरात घडत ती मुंबई पण त्याच काळात घडलेल्या बॉम्बस्फोटांमुळे आणि दंगलींमुळे दहशतीखाली होती . कुठलाही सिनेमा हा त्या विविक्षित काळाच प्रॉडक्ट असत . 'गर्दीश ' च्या कथानकात मध्ये जो एक अस्वस्थपणा दिसत राहतो हा त्याच काळाच प्रॉडक्ट होतं.

'गर्दीश ' हा एका मल्याळी फिल्मचा 'किरिदम' चा रिमेक होता. 'गर्दीश' मध्ये जॅकी श्रॉफने केलेली भूमिका मूळ सिनेमात मोहनलाल सारख्या तगड्या अभिनेत्याने केली होती . केरळमधल्या एका शहरामध्ये घडणारे कथानक हिंदी व्हर्जन तयार करताना प्रियदर्शनने मोठ्या खुबीने मुंबईमध्ये घडवलं. त्याला वर उल्लेख केल्याप्रमाणे मुंबईतली सामाजिक-राजकीय परिस्थिती कारणीभूत असावी. 'गर्दीश ' हा  इच्छा नसताना पण गुन्हेगारीच्या चक्रात अडकत जाणाऱ्या तरुणाची गोष्ट सांगतो . शिवा (जॅकी श्रॉफ ) हा पुरुषोत्तम साठे (अमरीश पुरी )ह्या कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक पोलीस हवालदाराचा मुलगा असतो . आपल्या मुलाने मोठा पोलीस ऑफिसर व्हावं अशी साठेची इच्छा असते . शिवा पण हुशार आणि होतकरू असतो . तो आज ना उद्या पोलीस ऑफिसर होणार याबद्दल कुणालाच शंका नसते . शिवाच्या आयुष्यात एक मुलगी विद्या पण असते . दोघांचं लग्न पण होणार असत . पण आदर्श सिनॅरिओ सिनेमात फार काळ टिकत नाही . कॉन्फ्लिक्ट हा हवाच . तसा तो 'गर्दीश ' मध्ये पण येतो . एका आमदाराच्या पोराला साठे एका गुन्ह्यानंतर गजाआड टाकतो .

कर्तव्य बजावल्याची शिक्षा साठेला लवकरच मिळते . त्याची बदली काला चौकी या मुंबईमधल्या गुन्हेगारीमुळे अतिशय बदनाम झालेल्या भागात होते . साठे सहपरिवार मुंबईला स्थायिक होतो . काला चौकी भागात बिल्ला जिलानी (मुकेश ऋषी ) या नामचीन गुंडाचं साम्राज्य असत . पोलीस पण या बिल्लाला वचकून असतात . अशात कर्तव्यकठोर साठे आणि बिल्ला यांच्यात संघर्ष उडणं क्रमप्राप्त असत . बिल्ला साठेच्या जीवावर उठलेला असताना शिवा आपल्या वडिलांना वाचवायला या संघर्षात उतरतो . रस्त्यावर झालेल्या हाणामारीत चक्क बिल्लाला आसमान दाखवतो.

बिल्लाच्या दहशतीखाली दबलेली स्थानिक जनता शिवामध्ये आपला मसीहा पाहायला लागते . लोक शिवाला डोक्यावर घेतात .पण काही कारणांमुळे शिवाची इच्छा नसताना पण त्या भागाचा डॉन अशी इमेज तयार व्हायला लागते . शिवाच्याच बहिणीचा नवरा शिवाच्या नावाने खंडणी वसूल करायला लागतो.

शिवाची सर्वत्र बदनामी व्हायला लागते . वडील आपल्या मुलामधलं स्थित्यन्तर बघत असतात. शिवा त्याच्या इच्छेविरुद्ध या जाळयात अडकत चालला आहे हे न समजून घेता ते त्याचाच राग करायला लागतात. बाप पोराच्या नात्यात एक मोठी भिंत उभी राहते. सर्वत्र झालेल्या बदनामीमुळे शिवाचं विद्याशी ठरलेलं लग्न पण मोडत. हताश शिवा एकाकी पडत जातो. या काळात त्याला समजून घेणारी असते ती शांती (डिंपल कपाडिया ) नावाची वेश्या. शेवटी बिल्लासोबत रस्त्यावर सुरु  झालेला रक्तरंजित संघर्ष रस्त्यावरच संपतो. पण त्याची मोठी किंमत शिवाला द्यावी लागते. पोलीस अधिकारी बनण्याच्या आपल्या स्वप्नाला मूठमाती देऊन.

अनेकदा आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी मग ते प्रेम असो , आवडत करियर असो वा जवळची माणसं अनेकदा हाताच्या मुठीतून वाळू निसटून जावी तशी आपल्या डोळ्यासमोरून निघून जातात . 'गर्दीश ' ची गोष्ट पण अशीच आहे . शिवाच्या डोळ्यासमोर पोलीस अधिकारी बनून वडिलांना गर्वोन्मित करण्याचं त्याचं स्वप्न उध्वस्त होत आणि तो काहीच करू शकत नाही . त्याच्या ह्या हतबलपणाशी अनेक प्रेक्षक रिलेट करू शकतात . त्यामुळेच गर्दीश आज पण लोकप्रिय असावा . प्रियदर्शनने मल्याळम सिनेमातल्या अनेक चांगल्या गोष्टी आणि गुणवत्तावान माणसं त्याच्या सुरुवातीच्या सिनेमामधून हिंदी सिनेमात आणली . 'मुस्कुराहाट ', 'सजा ए कालापानी' आणि 'गर्दीश' या त्याच्या सुरुवातीच्या सिनेमांमध्ये हे ठळकपणे लक्षात येत.

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संतोष सिवन हा प्रियदर्शनच्या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी करायचा. त्यावेळेसच्या इतर हिंदी सिनेमांचं छायाचित्रण आणि प्रियदर्शनच्या सिनेमातलं संतोष सिवनच छायाचित्रण यांच्यातला फरक लगेच समजून येतो . 'गर्दीश '  सिनेमाचा बहुतेक भाग  हा लाईटिंगचा वापर न करता नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून शूट झालेला आहे . सिनेमात साचत चाललेल्या अस्वस्थतेला डूब देण्यासाठी ग्रे फिल्टरचा वापर करण्यात आला आहे . त्यातून सिनेमाच्या परिणामकारकतेत भर पडते. साबू सिरील हा कलादिग्दर्शक पण प्रियदर्शनच्या टीमचा अविभाज्य हिस्सा. 'गर्दीश' मध्ये गजबजलेली, माणसांनी ओसंडून वाहणारी ,मुंबईत असून पण खेड्याची कळा असणारी काला चौकी साबू सिरिलने फार अप्रतिम उभारली आहे . 'गर्दीश ' हा जॅकी श्रॉफच्या कारकिर्दीतला एक सर्वोत्कृष्ट सिनेमा.

खरं तर त्यावेळेस नायक म्हणून जॅकीची कारकीर्द थोडीशी उतरणीला लागली होती . त्याचवर्षी आलेल्या 'आईना ' या नायिकाप्रधान चित्रपटात आणि संजय दत्तचा वन मॅन शो असणाऱ्या 'खलनायक ' मध्ये त्याने थोड्या दुय्य्म भूमिका केल्या होत्या . पण या उतरणीच्या काळातच त्याला एवढी चांगली भूमिका मिळाली. प्रामाणिक, हुशार पण गर्तेत फसत चाललेला शिवा जॅकीने केला पण अप्रतिम.

शेवटच्या प्रसंगातल्या फाईटनंतर तो लोकांसमोर आपली भडास काढतो तो प्रसंग पुन्हा पुन्हा बघण्यासारखा .हा चित्रपट जितका जॅकीचा तितकाच वडिलांच्या भूमिकेतल्या अमरीश पुरीचा पण आहे . आपला लाडका मुलगा  आपल्या पासून क्षणाक्षणाला दूर जाताना हतबलपणे बघणारा कर्तव्यकठोर बाप अमरीश पुरीने फार छान केला आहे. बिल्लाच्या भूमिकेतल्या मुकेश ऋषीबद्दल पण दोन शब्द लिहायला हवेत. धाडधिप्पाड ,अस्ताव्यस्त  दाढी बाळगणारा आणि नजरेतच क्रौर्य भरलेला बिल्ला पडद्यावर येताच बहुतेक प्रेक्षकांच्या मनात दोनच भावना येतात. दहशत आणि राग. आता हा आडदांड इसम काय करतो या कल्पनेने ते अस्वस्थ होतात. याचं श्रेय मुकेश ऋषीच्या अभिनयाला.

चित्रपटाच्या कथानकाशी फारसा संबंध नसणारा एक अनु कपूरचा विनोदी ट्रॅक पण सिनेमात आहे . एरवी अतिशय डार्क असणाऱ्या या सिनेमात प्रेक्षकांना थोडा रिलीफ देण्यासाठी हा ट्रॅक टाकला असावा . त्या काळातल्या चित्रपटांशी तुलना करता 'गर्दीश ' मध्ये प्रचंड हिंसाचार होता . अगदी अंगावर येण्याइतपत रक्तपात होता . बिल्ला आणि शिवामधल्या हाणामारीचे दोन प्रसंग हे रक्तबंबाळ फाईटसीन आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ट्रीट आहेत.

चित्रपटाचं संगीत आर डी बर्मनच आहे . गाणी जावेद अखतर यांची आहेत .जेंव्हा या चित्रपटाचं संगीत आर डी . ने केले तेंव्हा तो काही टॉप फॉर्ममध्ये नव्हता . पण मला व्यक्तिशः 'गर्दीश ' ची गाणी आवडतात . 'बादल जो बरसे तो ' हे आशा भोसलेच आणि 'ये मेरा दिल ' हे एस .पी .बालसुब्रमण्यम आणि आशाने गायलेलं गाणं सुंदर आहेत . पण या चित्रपटातलं सगळ्यात लोकप्रिय आणि अजूनही लोकांच्या लक्षात असलेलं गाणं म्हणजे एस .पी .ने गायलेलं 'हम ना समझे थे ,बात इतनी सी ' हे आहे . भारतीय लोकांना सॅड सॉंग्जच फार आकर्षण असत.त्यामुळे हे गाणं अजूनही लोकप्रिय असावं .

आय एम डी बी या वेबसाईटवर 'गर्दीश' ला तब्बल सात एवढं गुणांकन आहे . परवा  कितव्यांदा तरी पुन्हा एकदा 'गर्दीश' बघितल्यावर पुन्हा जाणवलं की तो जुना प्रियदर्शन कुठं तरी हरवलाय. 'मुस्कुराहाट', 'गर्दीश', 'विरासत' वाला प्रियन. इंटेन्स सिनेमा देणारा प्रियन.

हेराफेरी माझा खूप आवडता सिनेमा असला तरी तिथूनच प्रियदर्शन टाइपकास्ट होण्याची सुरुवात झाली असं वाटत . अक्षय कुमार आणि कॉमेडी हा हमखास हिटचा फॉर्म्युला सापडताच त्याचे एकच प्रकारचे सिनेमे यायला सुरुवात झाली.

गर्दीश मधलं वडील आणि मुलामधलं दाखवलेलं सुंदर नातं , 'मुस्कुराहट ' मधलं मुलींमधलं आणि वडिलांमधलं उलगडत जाणार हळुवार नातं आणि 'विरासत ' मधली इंटेन्सिटी हे माझे काही विक पॉईंट्स आहेत . दक्षिणेकडे तो अजूनही चांगले प्रयोगशील सिनेमे करतो असं ऐकिवात आहे . मग दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री त्याला जे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य देते ते बॉलिवूड देत नसेल तर त्याच्या कार्यप्रणालीत काही तरी लोचा आहे . जुना प्रियदर्शन पुन्हा बघायला मिळायला पाहिजे . पुन्हा एखादा 'गर्दीश ' यायला पाहिजे .