कित्येक जुन्या गोष्टी आयुष्यातून नाहीशा होऊन , कित्येक नवीन गोष्टींचं आयुष्यात आगमन होणं हे तस प्रत्येक पिढीमध्ये घडत असतंच . ऐंशी आणि नव्वदच्या दशकात जन्म झालेल्या आणि वाढलेली पिढी पण याला अपवाद नाही . पण या पिढीच्या आयुष्यातल्या जडणघडणीच्या काळात अशी एक घटना घडली आहे , ज्याचे चांगले आणि वाईट परिणाम अजूनही आपल्या खंडप्राय देशावर होत आहेत . ती घटना म्हणजे जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे आपल्या देशात झालेले आगमन . ही घटना घडली तेंव्हा वर उल्लेख केलेली पिढी एक तर पाळण्यात होती नाहीतर नुकतीच शाळेत जायला लागलेली होती . त्या अर्थाने या पिढीला जागतिकीकरणाचे अपत्य म्हणता येईल . कारण जागतिकीकरणपूर्व आणि जागतिकीकरणोत्तर ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या जगाला या पिढीने बघितले आहे . हे बदल एकाचवेळेस आर्थिक , राजकीय , सामाजिक , कौटुंबिक , शैक्षणिक ,व्यवसायिक पातळ्यांवर होत होते . सिनेमा हा जागतिकीकरण दारात येण्याअगोदर पण भारतीयांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता . जागतिकीकरणाने आपल्या आयुष्यात भेलकांडून जाणारे बदल केले असले तरी तो अजूनही तसाच आहे . जागतिकीकरणाने भारतीय सिनेमात आमूलाग्र बदल केलेच पण प्रेक्षकांच्या सिनेमा बघण्याच्या अनुभवात पण प्रचंड बदल घडवले . नव्वदच्या दशकात चित्रपटगृहात सिनेमे बघणे हा सोहळा असायचा . त्याकाळी टेलिव्हिजनच आजच्यासारखं प्रस्थ नव्हतं . दूरदर्शन हे एकमेव चॅनल होत .  त्यावेळेस मनोरंजनाची जी अल्प साधन उपलब्ध होती त्यात सिनेमाचा क्रमांक अग्रेसर होता . त्यावेळेस प्रचंड गर्दीत उभं लाईनमध्ये उभं राहून तिकीट काढणाऱ्या तरुण पोरांना घरातल्या कर्त्या पुरुषांइतकाच मान असे . त्यावेळेस 'बुक माय शो ' सारखे ऍप नव्हते . तिकीट काढण्याचे दोनच सोर्स . एकतर तिकीट खिडकी , आणि दुसरा तिकिटं ब्लॅक करणारा इसम . तिकीट ब्लॅक करणारी एक छोटी आर्थिक यंत्रणाच असायची . ही यंत्रणा मोठ्या शहरांमधून जवळपास नामशेष झाली आहे . ग्रामीण आणि निमशहरी भागात याचे पडझड झालेले अवशेष शिल्लक आहेत . 

सिनेमे दाखवणारी एक चित्रपटगृहांशिवाय समांतर यंत्रणा अस्तित्वात होती . व्हिडियो पार्लर , गणपती किंवा सार्वजनिक सोहळ्याच्या काळात गावातल्या किंवा गल्लीतल्या लोकांना सिनेमे दाखवणारी गणेशमंडळ , जत्रेमध्ये किंवा उरुसामध्ये दाखवले जाणारे सिनेमे हे या समांतर यंत्रणेचे भाग होते . इंटरनेट आणि स्मार्ट फोनच आगमन या यंत्रणेला प्रचंड घातक ठरलं . अजूनही ही यंत्रणा काही ठिकाणी तग धरून आहेत पण मृत्युशय्येवर असणाऱ्या रुग्णाची कळा त्यांना आली आहे .या यंत्रणेत सिनेमा बघणाऱ्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी डोळ्यासमोर ठेवून सिनेमा बनवणारी एक वेगळी इंडस्ट्री होती . त्यात काम करणारे शेकडो दिग्दर्शक , तंत्रज्ञ , कलाकार , गायक होते. हा वर्ग देशोधडीला लागला . ही नष्ट होत चाललेली इंडस्ट्री हा फार संवेदनशील विषय आहे . त्यावर या सदरात लेख येईलच . 

गेल्या पंचवीस वर्षात पडद्यावरचा सिनेमा बदलत गेला तसा प्रेक्षकांसाठी चित्रपट बघण्याचा अनुभव पण आमूलाग्र बदलत गेला . याला कारणीभूत ठरले ठिकठिकाणी सुरु झालेले मॉल्स आणि मल्टिप्लेक्स . पहिले प्रेक्षकांना सिंगल स्क्रीन थियेटर मध्ये चित्रपट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता . अनेक लोकांचा रम्य नॉस्टॅलजिया सिंगल स्क्रीन मध्ये पाहिलेल्या चित्रपटांच्या आठवणींशी निगडित असला तरी काही अपवाद वगळता हे सिंगल स्क्रीन थिएटर्स मोडक्या खुर्च्या , तंबाखूच्या पिचकाऱ्या , कोंदट हवा , हळू फिरणारे पंखे यामुळेच अनेक प्रेक्षकांच्या लक्षात आहेत . मल्टिप्लेक्सने हे चित्र बदललं . वातानुकूलित थियेटर , स्वच्छता , टापटीप , या गोष्टी मल्टिप्लेक्सच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळायला लागल्या . याला एक सामाजिक परिमाण पण होत . मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघणे याला एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली . मल्टिप्लेक्समध्ये जाऊन तिथले फोटो वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर डकवणे हे स्टेट्स सिम्बॉल बनलं . सिंगल स्क्रीन थिएटर्स हे आता फक्त आर्थिक दृष्ट्या खालच्या स्तरातल्या लोकांपुरते उरले आहेत . सिंगल स्क्रीन चित्रपटगृहाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली आहे . याचा फटका फक्त थियेटरच्या मालकांनाच बसणार नाहीये . प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटरची स्वतःची एक अर्थव्यवस्था असते . यात तिथे काम करणारा कर्मचारी वर्ग , आजूबाजूला वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावणारे लोक हे या अर्थव्यवस्थेचे घटक असतात . निमशहरी भाग आणि ग्रामीण भाग जिथे अगोदरच रोजगाराच्या संधी अतिशय कमी असतात तिथे हे चित्रपटगृह रोजगारनिर्मिती करत होते . पण मल्टिप्लेक्सच्या वादळात आणि पायरसीमुळे लोक घरीच चित्रपट बघणं पसंद करायला लागल्यामुळे ह्या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांभोवती एकवटलेल्या अर्थव्यवस्थेला जोरदार तडे जायला लागले आहेत . या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेले लोक आणि त्यांचा परिवार यांच्यापुढे एक अनिश्चित भविष्यकाळ आ वासून उभा आहे . दुर्दैवाची गोष्ट अशी की शासनाचं यांच्याकडे लक्ष नाही आणि कुठल्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हे लोक नाहीयेत . सिंगल स्क्रीन चित्रपटगृह बंद पडत जाण याचा सामाजिक आणि आर्थिक अभ्यास होण्याची नितांत गरज आहे .

ऐंशी किंवा नव्वदच्या दशकात जन्म घेतलेली पिढी चित्रपटगृहांचं बदलतं स्वरूप आणि पर्यायाने त्यातल्या बदलत्या खाद्यसंस्कृतीची साक्षीदार आहे. मीही त्याच पिढीचा प्रतिनिधी. माझ्या आयुष्यातली सुरुवातीची बरीच वर्षं परभणीमध्ये गेली. परभणी हे जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी ना ते धड शहर आहे, ना धड ग्रामीण भाग. परभणीला निमशहर म्हणणं अधिक योग्य ठरेल. परभणी हा जुन्या हैद्राबाद संस्थानाचा भाग होतं. तिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे . याशिवाय प्रत्येक जातीचे लोक परभणीत गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. परभणीची सामाजिक पार्श्वभूमी सांगायचं कारण की, आमच्याकडच्या सिनेमागृहांमधल्या खाद्य संस्कृतीमध्ये याचं ठळक प्रतिबिंब पडलं आहे. त्या काळी मल्टिप्लेक्स नावाचा प्रकार अस्तित्वात आलेला नव्हत्या. थिएटरमध्ये जे खाद्यपदार्थ मिळायचे, त्यांच्यात फारसं वैविध्य नसायचं. समोसे, मुंगफली (आमच्या भाषेत फल्ली), गुळपापडी, खारे दाणे, सोडा, थम्स अप असे मोजके पर्याय असायचे. अर्थात मी तुलना आजच्या काळाशी करत आहे म्हणून मोजके पर्याय असा शब्दप्रयोग करत आहे. त्यावेळेस हे पदार्थ बघूनही हरखून जायला व्हायचं. शिवाय हे पदार्थ त्यावेळेसच रूपयाचं 'मूल्य' लक्षात घेऊनही बरेच स्वस्त होते. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यावेळेस 'बाहेरून खाद्यपदार्थ आणण्याची परवानगी नाही' अशी उद्धट वाटणारी पाटी चित्रपटगृहाच्या बाहेर लावलेली नसायची. लोक खुशाल घरून डब्बे घेऊन जायचे. मध्यांतर झालं की एकाच वेळेस चित्रपटगृहात अनेक डब्बे उघडले जायचे. प्रत्येक जातीची आणि धर्माची खाद्यसंस्कृती त्या डब्ब्यांमध्ये बंद असायची. ते डब्बे उघडले की, घमघमाटाच्या स्वरूपात ती खाद्यसंस्कृती फसफसून बाहेर पडायची. या सगळ्या पदार्थांचा मिळून एक गंध विशिष्ट तयार व्हायचा. माझ्या सुरुवातीच्या चित्रपटांविषयीच्या आठवणी या गंधाशी निगडित आहेत. मी आजही मल्टिप्लेक्समध्ये हा नाव नसणारा गंध मिस करतो.हल्ली तर चित्रपटगृहात मिळणाऱ्या पदार्थांमध्ये कसलं वैविध्य असतं! अगदी पिझ्झा-बर्गरपासून ते फुल मिलही चित्रपटगृहांमध्ये उपलब्ध असतं. मेक्सिकन, थाई, लेबनीज पदार्थही मिळतात. नक्की आठवत नाही, पण काही चित्रपटगृहांमध्ये मद्यही मिळत असल्याचं कुठेतरी वाचलं होतं. १९९१ ला देशात आलेलं जागतिकीकरण आपण खाद्यसंस्कृतीच्या बाबतीतही सहजपणे अंगीकारलं आहे. मुख्य म्हणजे भरपूर पैसे देऊन हे पदार्थ मागवून खाणारा एक सुखवस्तू वर्ग तयार झाला आहे. माझ्या वैयक्तिक आवडीनिवडींमुळे मी या वर्गात मोडत नाही. मी स्वतः मल्टिप्लेक्समध्ये काहीही विकत घेऊन खात नाही.

हल्ली तुमची ऑर्डर तुमच्या जागेवर आणून दिली जाते. ती ऑर्डर आणून देणारे लोक सतत ये-जा करत असतात आणि बाकीच्या लोकांना डिस्टर्ब् करत असतात असं वाटतं. मल्टिप्लेक्सच्या मालकांना या महागड्या खाद्यविक्रीच्या विक्रीमधून भरपूर उत्पन्न असतं. अनेक मल्टिप्लेक्सच्या स्टाफमध्ये हॉस्पॅलिटी इंडस्ट्रीचा पूर्वानुभव असणाऱ्या लोकांचा भरणा असतो. ‘बुक माय शो’वर तिकीट बुक करत असतानाच तुम्हाला अनेक खाद्यपदार्थांची कुपन खुणावायला लागतात. तिकीट खिडकीवर तिकीट देणारा तुम्हाला कुपन ऑफर करत असतो. अशा प्रकारे सतत त्यांच्या मार्केटिंगचा भडिमार तुमच्यावर होत असतो.
 

सिनेमा बघण्याचा अनुभव बदलण्यात उदारीकरणाने काही चांगले बदल घडवले हे मान्य करावंच लागत . आमच्या लहानपणी -तरुणपणी जे जे होत तेच चांगलं आणि जे नवीन नवीन येत आहे , ते हिणकस असा अविर्भाव आणण्याचं काही कारण नाही .पण या बदलांनी काही अस्वस्थ करणारे प्रश्न उभे केले आहेत , हे नाकारता येणार नाही . सिंगल स्क्रीन चित्रपटगृह , व्हिडीओ पार्लर , बी ग्रेड असंघटित फिल्म इंडस्ट्री यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणारा एक मोठा वर्ग देशोधडीला लागत आहे . त्याच आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं नेमकं आता काय होईल . जागतिकीकरणानंतर जी एक नवीन आर्थिक व्यवस्था तयार झाली आहे त्यात या लोकांना सामावून घेतलं जाईल का . या प्रश्नाचं ठाम उत्तर मिळायला किती वर्ष जातील ? एका चिनी नेत्याला फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल विचारलं असताना त्यानं उत्तर दिल होत , "या घटनेला आताशी अडीचशे वर्ष झाली आहेत . इतक्या लवकर प्रतिक्रिया देण्याची घाई काय आहे ?" जागतिकीकरणाला भारतात आताशी कुठं अठ्ठावीस  वर्ष होत आहेत . आणि वर उपस्थित केलेल्या  प्रश्नांची उत्तर देण्याची घाई कुणालाच नाहीये . ना सरकारला , मध्यंतरात दोनशे रुपयाचे पॉपकॉर्न घेऊन खाणाऱ्याला , ना तुमच्या माझ्यासारख्या सिनेमाप्रेमींना . आल इज वेल .आल इज वेल . 


अमोल उदगीरकर यांचे याआधीच ब्लॉग :


नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल


  गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू 

जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा

जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या 

एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी!

ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा

एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ?

जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान 

अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका

गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट 

श्रीदेवी नावाचं फेनॉमेन 

कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)