सिनेमा, गाणी, नाटक आणि साहित्य याबाबतींमध्ये आणि अभिरुचीच्या बाबतीत एका विशिष्ट कालखंडात अडकून बसलेल्या लोकांबद्दल मला कायमच सहानुभूती वाटत आली आहे. नॉस्टॅलजिया प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य हिस्सा आहेच, हे अमान्य करण्यात अर्थ नाही. प्रत्येकाच्या मनाचा एक कोपरा हळुवार नॉस्टॅलजियाने व्यापलेला असतो. पण जेंव्हा आमच्या काळातल्याच कलाकृती या महान, कालातीत आहे आणि जे जे म्हणून काही नवीन सृजन होत आहे, ते सगळं कचरा असं जेंव्हा लोकांना वाटायला लागतं, तेंव्हा खरा प्रॉब्लेम सुरु होतो. 'हरवलेल्या दशकाची डायरी' हे सदरच नव्वदच्या दशकातल्या नॉस्टॅलजियावर आधारित आहे, पण नव्वदच दशक भारी आहे आणि सध्याचा सिनेमा आणि गायक -कलाकार वाईट आहेत, असा सूर लेखांमध्ये लागू नये यासाठी मी काळजी घेत असतो.


मला नव्वदच्या दशकातले सिनेमे जितके आवडतात, तितकेच किंबहुना किंचित जास्त सध्याचे सिनेमे आवडतात. नमनाला घडीभर तेल यासाठी की एक नव्वदच्या दशकातली अशी गोष्ट आहे, ज्याबाबतीत  मी प्रचंड बायस्ड आहे. ती गोष्ट म्हणजे नव्वदच्या दशकातला टीव्हीवरचा कंटेंट. तो कंटेंट सध्याच्या टेलिव्हिजन कंटेंट पेक्षा दर्जेदार, धाडसी आणि जास्त धोका पत्करणारा होता. भारतीय टेलिव्हिजनचा इतिहास जेंव्हा जेंव्हा लिहिला जातो तेंव्हा  प्री-एकता कपूर आणि पोस्ट -एकता कपूर अशा दोन भागात त्याचं विभाजन करावं लागत. आपण टेलिव्हिजनच्या एकता कपूर युगात रहात आहोत. नव्वदच्या दशकात पैशांची आणि संसाधनाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता असून पण 'ब्योमकेश बक्षी' सारखी भन्नाट मालिका बनली होती. टीआरपीची गणित मांडून नफा तोट्याची समीकरण जुळवण्याचा काळात 'ब्योमकेश बक्षी' सारखी मालिका पुन्हा बनू शकेल का याबद्दल शंका वाटते.

शरदेंदु बंडोपाध्याय या प्रसिद्ध बंगाली लेखकाकडे  ब्योमकेश बक्षी या पात्राचे जनकत्व जात. १९३२ मध्ये बंडोपाध्याय यांनी एका लिहिलेल्या लघुकथेमध्ये ब्योमकेश सर्वप्रथम अवतरला. पुढच्या कालखंडात बंडोपाध्याय यांनी अजून अडोतीस कथा लिहिल्या. दुर्दैवाने शेवटच्या कथेचं, जिचं शीर्षक 'बिशुपाल बधा' होत, लिखाण चालू असतानाच बंडोपाध्याय यांचं निधन झालं. भारतीय डिटेक्टिव्ह पात्रांवर अनेकवेळा पायरो किंवा होम्स सारख्या अजरामर डिटेक्टिव्ह पात्रांचा ठसा जाणवतो. तसा तो ब्योमकेश बक्षी वर पण आहेच. पण ब्योमकेशला स्वतःच असं व्यक्तिमत्व आहे आणि स्वतःच असं तत्वज्ञान आहे. पायरो असेल किंवा होम्स, त्यांच्या निष्ठा कायद्याशी आहेत. गुन्हेगाराला कायद्यानेच शिक्षा व्हावी असा त्यांचा प्रयत्न असतो. पण ब्योमकेशची बांधिलकी कायद्यापेक्षा सत्याशी जास्त आहे.

ब्योमकेश स्वतःला 'सत्यान्वेषी' (सत्याचा शोधक ) म्हणवून घेत असतो. 'मकडी का रस' 'बालक जासूस' आणि 'रेत की दलदल' या एपिसोडमध्ये पण व्योमकेश कायद्यापेक्षा सत्याला जास्त प्राथमिकता देतो. बंगालमध्येच सत्यजित राय यांनी 'फेलूदा' सारखं दुसरं अजरामर डिटेक्टिव्ह पात्र निर्माण केलं होत. पण फेलूदाची निर्मिती राय यांनी टीनएजर लोकांसाठी केली होती. त्यामुळे फेलुदाच्या कथानकाला प्रचंड मर्यादा यायच्या. त्या कथांना डार्क टोन नसायचा आणि त्यात अपराधांच्या लैंगिक पैलूचा धांडोळा घेता यायचा नाही. ब्योमकेश बक्षीच्या पात्राला अशी काही मर्यादा नव्हती. वासना, गुन्ह्यामागच्या लैंगिक प्रेरणा, अंगावर येणारं क्रौर्य ह्या गोष्टी ब्योमकेशच्या कथांमध्ये नेहमी दिसून येतात.

बंगालमध्ये लोकप्रिय असलेला हा डिटेक्टिव्ह देशभरात पोहोंचला तो १९९३ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या त्याच्याच नावाच्या मालिकेने. ही मालिका बासू चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केली होती. त्या काळात टीव्ही मालिकांवर दूरदर्शनची मक्तेदारी होती. आज जसा वेगवेगळ्या चॅनल्सचा बुजबुजाट झाला आहे तसा त्या काळी नव्हता. या मालिकेमध्ये ब्योमकेशच पात्र रजित कपूर या हरहुन्नरी नटाने साकारले होते. मालिकेतलं दुसरं महत्वाचं पात्र म्हणजे ब्योमकेशचा सहाय्यक असणाऱ्या अजितकुमार बॅनेर्जीच. मालिकेत अजितच पात्र के .के .रैना या अभिनेत्याने साकारले होते. पायरो आणि होम्स पेक्षा ब्योमकेश बक्षी एका बाबतीत अजून वेगळा आहे. ब्योमकेश बक्षीच्या कथा जशा जशा पुढे जात राहतात तसा ब्योमकेश बदलत जातो. त्याचं वय वाढत, त्याचं लग्न होत, त्याला मुलं होतात, तो अजितसोबत भागीदारीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करतो.

पहिल्या एपिसोडमधला ब्योमकेश आणि शेवटच्या एपिसोडमधला ब्योमकेश यांच्यात जमीन अस्मानचा फरक असतो. ब्योमकेश बक्षीचे लेखक शरदेंदु बंडोपाध्याय यांनी एका बाबतीत शेरलॉक होम्सचे लेखक कॉनन डायल यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला होता. कॉनन डायल यांनी होम्सला मरतो असं एका कथेत दाखवून त्या पात्राला रिटायर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. शरदेंदु बंडोपाध्याय आपल्या मानसपुत्राच्या बाबतीत एवढे कठोर नव्हते. त्यांनी पण एका टप्प्यावर ब्योमकेशला रिटायर करण्याचा प्रयत्न केला. ब्योमकेश लग्न करतो आणि डिटेक्टिवगिरी थांबवतो असं एका कथेत त्यांनी दाखवलं होत. पण कॉनन डायल यांना ज्याप्रमाणे लोकांच्या मागणीमुळे शेरलॉकला वापस आणावं लागलं अगदी तसाच लोकांच्या प्रेमळ आग्रहामुळे शरदेंदु बंडोपाध्याय यांना ब्योमकेशला वापस आणावं लागायचं.

बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेली मालिका ही शरदेंदु बंडोपाध्याय यांच्या कथांशी एकदम प्रामाणिक होती. स्वतःचे interpretation करून करुन अनेक लोक मूळ कलाकृतीचा  विचका करतात. बासू चटर्जी यांनी असं करणं टाळलं. रजित कपूरने ब्योमकेशच्या भूमिकेत अक्षरशः परकाया प्रवेश केला होता. मृदू पण ठाम शैलीत बोलणारा बोलणारा रजित हा माझ्यासारख्या अनेकांसाठी बुद्धिमत्तेचे चालते बोलते प्रतीक होता. त्याची खास बंगाली पोशाख शैली आणि केशरचना पण एकदम खास होती. पण ब्योमकेश बक्षी मालिकेत निर्मिती मूल्यांचा श्रीमंती चकचकाट नव्हता. मालिका थोडी 'गरीब' वाटायची. पण ही कमतरता बासू चटर्जींनी संहिता लेखन आणि संवाद लेखनात भरुन काढली होती. नव्वदच्या दशकात वाढलेल्या पिढीच्या अनेक रम्य आठवणी या मालिकेशी निगडित आहेत. अनेकजणांना डिटेक्टिव्ह मालिका म्हंटली की हमखास अजूनही ब्योमकेश बक्षीच हमखास आठवतो. रात्री बाहेरच्या खोलीत सगळ्या परिवाराने लाईट बंद करून ही मालिका पाहायची आणि मालिका संपल्यावर तिथंच झोपायचं असा त्या काळात अनेक घरात शिरस्ता होता.

ब्योमकेश बक्षीची अजूनही काही सिनेमॅटिक वर्जन्स आहेत. अंजन दत्त आणि रितूपर्णो घोष सारख्या  प्रख्यात दिग्दर्शकांनी ब्योमकेशच्या पात्रावर सिनेमा बनवला. पण बात कुछ जमी नही. दिबांकर बॅनर्जीला पण ब्योमकेशवर सिनेमा बनवण्याचा मोह आवरला नाही. सुशांत सिंग राजपूतला मुख्य भूमिकेत घेऊन त्याने सिनेमा केला. पाठीमागे यशराज सारखं मोठं बॅनर होत. पण या सिनेमाने माझा खूप मोठा अपेक्षाभंग केला. दिबांकर खरं तर माझा आवडता दिग्दर्शक. पण त्याला काही हे ब्योमकेशरूपी शिवधनुष्य पेलवल नाही असच म्हणावं लागेल. आमच्या मनातल्या ब्योमकेशचा चेहरा हा रजित कपूरचाच राहिला. सुशांत सिंग राजपूत काही त्याची जागा घेऊ शकला नाही. काही गोष्टी जितक्या जुन्या होत जातात  तितक्या अजूनच सुंदर वाटायला लागतात. आज पंचवीस वर्षानंतर पण बासू चटर्जींचा ब्योमकेश बक्षी माझ्यासारख्या लाखो लोकांना अजूनही काही दिवसात एकदा तरी आठवतोच. आम्हाला आमच्या आठवणीतलाच ब्योमकेश अजूनही तसाच हवाय. सत्यान्वेषी ब्योमकेशच्या भाषेत सांगायचं तर, 'ये ही सत्य है'.

हा लेख लिहिण्यासाठी प्रख्यात बंगाली पत्रकार सांदीपन देब यांची खूप मदत झाली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच ब्योमकेशच बंगाली सांस्कृतिक आयुष्यातलं महत्व मला चांगलं कळलं. अनेक अनवट संदर्भ समजावून सांगितले. त्यांचे मनपूर्वक आभार.

संबंधित ब्लॉग : 

जसपाल भट्टी-सामान्य माणसाचा कलाकार मित्र 


अल्ताफ राजा आणि त्याचा निमशहरी सोशल रिलिव्हन्स

राम लक्ष्मण-दुर्लक्षित मराठी सांगीतिक कर्तृत्व

सौंदर्यवती  : सोनाली बेंद्रे

ब्लॉग : ‘घायल’ आणि ‘घातक’ : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक

ब्लॉग : सारे रास्ते वापस हरिहरन के पास आते है

तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला

चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट

सिनेमा ‘बघण्याच्या’ प्रक्रियेत झालेली इव्होल्यूशन

नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल

गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू 

जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा

जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या 

एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी!

ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा

एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ?

जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान 

अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका

गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट 

श्रीदेवी नावाचं फेनॉमेन 

कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)