ओल्ड माँक आणि हरिहरन हे एक डेडली कॉकटेल आहे. हिवाळ्यातली शनिवारची संध्याकाळ असावी. लवकर अंधारून आलेलं असावं. हातात ओल्ड माँकचा पेग असावा. आपल्याला कुठं जायचं नसावं. आपल्याकडे कुणी येणार नसावं. कानावर हरिहरनचे स्वर्गीय सूर रेंगाळत असावेत.


काश ऐसा कोई मंजर होगा

मेरे कांधे पे तेरा सर होगा

आठवड्याभरच्या कामाचा शीण, ऑफिसमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या झालेल्या प्रगतीतून झालेला मनस्ताप, बॉसच्या खाल्लेल्या शिव्या, घरातल्या कटकटी, सतत येणारी अपयशी, यशस्वी लोकांशी स्वतःच स्वतःने करून घेतलेली तुलना आणि त्यातून आलेली खिन्नता हे सगळं काही घटका का होईना विसरवण्याचं सामर्थ्य या कॉकटेलमध्ये आहे. नंतर हँगओव्हर नेमका कशाचा राहतो हे सांगणं अवघड आहे. हरिहरनच्या आवाजाचा की ओल्ड माँकचा? पण त्याने फरक तरी काय पडतो? अपना दिन बन गया. सानू की!

माझा एक मित्र म्हणत असतो की ,"आपल्याकडे गुलाम अली आणि मेहेंदी हसन नाहीत म्हणून उसासे टाकण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडे हरिहरन आहे की." 120 टक्के सहमत. हरिहरनबद्दल अशी भावना असणारे आपल्याकडे बरेच आहेत. 90 च्या दशकातल्या चित्रपट संगीताचे फॅन असणाऱ्या लोकांचा नॉस्टॅलजिया हरिहरनच्या आवाजाशिवाय पूर्ण होत नाही. किती गाणी सांगायची हरिहरनची?

'बॉम्बे' सिनेमातलं 'तू ही रे ' गाणं ऐकताना आपल्या नसांमधून रक्ताऐवजी आनंद वाहत आहे असं वाटत राहतं. हे गाणं ऐकणं हा अनेकांसाठी केवळ संगीतिकच नाही तर अध्यात्मिक अनुभव आहे. याला जितकं कारणीभूत रहमानचं स्वर्गीय संगीत आहे, तितकाच हरिहरनचा लागलेला दैवी सूर पण कारणीभूत आहेत. हरिहरनला या गाण्यात कविता कृष्णमूर्तीने तोलामोलाची साथ दिली आहे. आपल्या प्रेयसीची प्रियकर वाट बघत आहे. समुद्र खवळला आहे. मनातल्या समुद्रातला पण उधाण आलंय. ती खळबळ असह्य होऊन जेव्हा प्रियकर आर्ततेने म्हणतो..

मौत और जिंदगी ,तेरे हातो मे दे दिया रे...

तेव्हा ती आर्तता जगातल्या प्रत्येक प्रेयसीची आतुरतेने वाट बघणाऱ्या प्रियकराची बनून जाते. हरिहरनचा या गाण्यात दैवी सूर लागला आहे. खरं तर सिनेमा डब असल्यामुळे या गाण्यातली अरविंद स्वामीची लिपसिंक (मूळ सिनेमा तमिळ असल्याने ) आपल्याला खटकू शकते. पण असं होणार नाही याची काळजी हरिहरनचा आवाज घेतो. रहमान आणि हरिहरन हे कॉम्बिनेशन निव्वळ अफलातून आहे. रहमानचा हिंदीतला पहिला सिनेमा असणाऱ्या 'रोजा' पासूनच  या दोघांची जोडी जमली आहे. हरिहरनचा जितका चांगला वापर रहमानने केला आहे तितका इतर संगीत दिग्दर्शक करून घेऊ शकले नाहीत ही शोकांतिका. अर्थातच हे विधान बॉलिवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या संगीत दिग्दर्शकांना उद्देशून आहे.

देखो छोड के जो रस्ते जाते है

सारे रस्ते वापस मेरे दिल को आते है

या दोन ओळींनंतर 'प्रेयसी ' अशी गगनभेदी आर्त हाळी हरिहरन 'ताल'मधल्या 'नही सामने' गाण्यात लावतो तेव्हा पडद्यावर दिसणारा समुद्र पण थिजलाय की काय असं काही क्षणांपुरतं का होईना वाटतं. 'गुरु' मधल्या 'ए दिले आशिकी' गाण्यात हरिहरन एकदमच खुलतो. खरं तर हरिहरनचं गाणं म्हंटल की जो एक इंटेन्स मूड तयार होतो, त्या जातकुळीतलं हे गाणं नाही. तरी रेहमानने हे गाणं हरिहरनला दिलं, कारण हरीहरनला कुठलं गाणं सूट होतं याचा रहमानला परफेक्ट अंदाज आहे. हरिहरनच्या आवाजाचा इन डेप्थ अभ्यास रहमानने केला आहे.

हरिहरनने आपल्या कारकिर्दीची सुरुवात जयदेव या संगीत दिग्दर्शकाचा सहाय्यक म्हणून केली. एका गायन स्पर्धेत जयदेवने हरिहरनला ऐकलं. या पोरात अफाट गुणवत्ता आहे, हे ओळखून जयदेवने हरिहरनला आपल्या पंखाखाली घेतलं. 'घरौंदा' आणि 'तुम्हारे लिये' या चित्रपटांसाठी हरिहरनने जयदेवसोबत काम केलं. अतिशय अप्रतिम गाणी देऊन पण दुर्लक्षित राहिलेला संगीतकार म्हणजे जयदेव.

लौकिकार्थाने जयदेवला फारस यश मिळालं नसलं तरी अतिशय उत्तम गाणी देणारा प्रयोगशील संगीत दिग्दर्शक म्हणजे जयदेव अशी त्याची ओळख आहे. जयदेवनेच हरिहरनला पहिलं हिंदी गाणं दिलं. 'गमन' सिनेमात 'अजीब सनेहा' ही गजल जयदेवच्या संगीत दिग्दर्शनाखाली हरिहरनने गायली. 'गमन' सिनेमा मुख्यत्वे सुरेश वाडकरच्या 'सिने मे जलन' या सुंदर गाण्यामुळे ओळखला जातो. पण या सिनेमातली हरिहरनची गझल पण तितकीच सुंदर आहे. 'गमन' नंतर हरिहरनला जाणवू लागलं की त्या दशकात बनत असलेल्या मसाला सिनेमांमधल्या गाण्यांमध्ये आपल्या आवाजाला फारसा स्कोप नाहीये. मग हरिहरनने गझलेकडे आपला मोर्चा वळवला. एक दाक्षिणात्य गायक, अवघड शब्दरचना असणारी (ज्यामध्ये उर्दू शब्दांचा भरणा असतो) गाणी कशी गाऊ शकेल म्हणून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली होती. पण हरिहरनने प्रचंड मेहनतीने आपल्या भाषेवर काम केलं. उच्चार घासून पुसून साफ केले. आज हरिहरन ज्या आत्मविश्वासाने तमिळ गाणी गातो त्याच आत्मविश्वासाने हिंदी, उर्दू आणि इंग्लिश गाणी गातो. हरिहरनचा पहिला गझल अल्बम मार्केटमध्ये आणण्याचं श्रेय आशा भोसले यांना जातं. हरिहरन हा ताकदीचा संगीत दिग्दर्शक आहे हे आशाताईंनी हेरलं. 'आबशार-ए -गजल' हा हरिहरनचा पहिला गजल अल्बम, त्यातली गाणी आशा ताईंनी गायली आहेत.

हरिहरनच्या घरीच संगीताची पार्श्ववभूमी होती. लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताच शिक्षण घेऊन त्याच्या आवाजाची बैठक तयार झाली आहे. हरिहरनचा जन्म जरी त्रिवेंदमचा असला तरी त्याच्या आयुष्याचा बहुतेक काळ मुंबईमध्ये गेला आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न पॉप अशा दोन्ही प्रकारच्या संगीताचं एक्स्पोजर हरिहरनला जडणघडणीच्या काळात मिळालं. त्यामुळे  शास्त्रीय संगीताच्या अभ्यासातून आलेले अहंगंड हरिहरनकडे नाहीत. हरिहरनच्या अभिरुची एका विशिष्ट चौकटीत बंदीस्त नाहीत. त्याला संगीतात वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. लेस्ली लुईससोबत जमलेली त्याची सांगीतिक भागेदारी हा याचा पुरावा. लेस्ली आणि हरिहरन ही संगीतिकदृष्ट्या दोन टोकांवरची लोक. पण 'कोलोनियल कझिन्स' या नावाने एकत्र येऊन त्यांनी भारतीय पॉप संगीताला एक वेगळं वळण दिलं. लेस्ली हा वेस्टर्न म्युझिकचा वापर करणारा माणूस आणि हरिहरन हा इंडियन क्लासिकलची पार्श्ववभूमी असणारा माणूस. दोघांच्या सांगीतिक शैलीत जो एक प्रचंड विरोधाभास आहे, तोच त्यांच्या कामाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. एकेकाळी अतिशय सोफिस्टिकेटेड लूक असणारा हरिहरन पोनी टेल आणि आधुनिक वेशभूषा असणाऱ्या हरिहरनमध्ये रूपांतरित झाला याचं श्रेय पण लेस्लीलाच आहे. दोघंही फक्त म्युझिक पार्टनर्स नाहीत तर जवळचे मित्र आणि सोलमेट आहेत याचा हा पुरावा. 'क्रिष्णा' हे अध्यात्मिक डूब असलेलं आणि भारताच्या वैविध्यतेवर भाष्य करणार गाणं हे या दोघांनी एकत्र येऊन केलेलं सर्वोत्कृष्ट काम असावं. आपली कर्मभूमी असणाऱ्या मुंबईच्या मराठमोळ्या संस्कृतीला ट्रिब्यूट म्हणून त्यांनी बनवलेलं 'ओहो काय झालं' हे गाणं पण मस्त झिंग चढवणारं आहे. स्ट्रिंग या पाकिस्तानी बँडसोबत हरिहरनने गायलेले 'बोलो ना' गाणं पण फार सुंदर आहे. संगीत संयोजनाच्या बाबतीत पण हरिहरन टेक सॅव्ही आहे . चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे  'कोलोनियल कझिन्स ' एका मोठ्या कालखंडाच्या गॅप नंतर या वर्षी पुन्हा पुनरागमन करत आहेत.

नव्वदच्या दशकातल्या संगीतावर पालनपोषण झालेल्या पिढीचे आवडते गायक म्हंटल की कुमार सानू, उदीत नारायण, अभिजित, सोनू निगम अशी अनेक नावं घेतली जातात. त्यात हरिहरनचं नाव नसतं. पण त्यात हरिहरनचा आवर्जून समावेश करायला हवा. 'लम्हे ' मधलं'कभी मै कहू' सारखं लतासोबत गायलेलं अजरामर डुएट, 'बाहो के दरमिया'सारखं अप्रतिम गाणं,'चप्पा चप्पा चरखा चले' सारखं ठेका धरायला प्रवृत्त करणार गाणं, 'तू ही रे', कोलोनियल कजिन्सची एक वेगळा अनुभव देणारी गाणी यांच्याशिवाय नव्वदच्या दशकातल्या पिढीचं बालपण आणि टीनएजचा नॉस्टॅलजिया पूर्ण होतच नाही. वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी हरिहरनचा सगळ्यात मोठा ठेवा त्याचा 'काश ' नावाचा गझल अल्बम आहे . त्यातली गाणी म्हणजे लखलखीत हिरे माणकं आहेत. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेलं 'काश ऐसा कोई मंजरं होता' हे गाणं तर पछाडून टाकणारं आहेच, पण 'मै कदे बंद करू' आणि 'हम ने एक शाम'सारखी गाणी पण मनात ठाण मांडून बसतात. तुमच्या अनेक कातरवेळीला हव्याहव्याशा दुःखांचा लेप चढवण्याची ताकद या गाण्यांमध्ये आहे. नव्वदच्या दशकातले वर उल्लेख केलेले अनेक गायक सध्या आऊटडेटेड झाले आहेत किंवा काम नसल्यामुळे घरी बसले आहेत. हरिहरन मात्र अजून गातच आहे. अजूनही पुढची कित्येक वर्ष गात राहील. कारण काळानुरूप कसं बदलायचं ,कस अपडेट व्हायचं याच उत्तम ज्ञान हरिहरनला आहे.  लाँग लिव्ह हरिहरन. कारण कुठंही गेलो, कुठलीही गाणी ऐकली तरी 'सारे रस्ते वापस मेरे दिल को आते है' सारखे आमच्या पिढीचे सारे रस्ते हरिहरन के पास आते है.

अमोल उदगीरकर