व्यवस्थेविरुद्धचा आपला असंतोष पडद्यावर बघणं भारतीय प्रेक्षकाला नेहमीच आवडत असं एक गृहीतक आहे . बच्चनचा सुपरस्टारडम ज्या  'अँग्री यंग मॅन ' इमेजच्या आधारावर बनला त्याचा पाया पण याच गृहीतकाच्या आधारावर आहे . आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांना बच्चन पडद्यावर वाचा फोडत आहे. हा प्रेक्षकांचा  विश्वास बच्चनला सुपरस्टार बनवण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरला. जेव्हा  'घायल' 1990 ला प्रदर्शित झाला तेव्हा बच्चनचा सुपरस्टारडम उतरणीला लागला होता.  एक तर 'बोफोर्स' केसमध्ये नाव आल्यामुळे लोक या एकेकाळच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पण आता स्वतःच व्यवस्था बनून राहिलेल्या महानायकाकडे संशयाने बघू लागले होते. बच्चनच्या लोकप्रियतेलाच उतरती कळा लागली होती. आता जनतेच्या प्रश्नांवर पडद्यावर कोण आवाज उठवणार, असा प्रश्न होता. त्या काळात देशातली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पण अस्थिर होती. राजीव गांधींचं सरकार उलथवून व्ही .पी. सिंग सरकार सत्तेवर आलं होतं. त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून भारतात सामाजिक भूकंप घडवला होता. भाजपचं राम मंदीर आंदोलन पण जोरात होतं. या दोन गोष्टींमुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये परस्परांबद्दल अविश्वास आणि असंतोष होता. 'आहे रे ' आणि 'नाही रे ' वर्गातली दरी वाढतच चालली होती. जनतेच्या मनातली आणि सिनेमाच्या पडद्यावर निर्माण झालेली ही पोकळी एका तरुण, होतकरू दिग्दर्शकाने हेरली होती. त्याच्याकडे जनतेच्या  असंतोषाला वाट करून देणार एक कथानक तयार होतं. त्या दिग्दर्शकाचं नाव होतं, राजकुमार संतोषी 'घायल' च्या प्रदर्शनाला यापेक्षा योग्य मुहूर्त दुसरा मिळूच शकला नसता.


राज संतोषीने तब्बल पाच चित्रपटात निहलानींचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर घर चालवण्याची जबाबदारी अंगावर पडलेल्या राजने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. काही दिग्दर्शकांचा सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर राजची नाळ जुळली ती निहलानींसोबत. त्यांच्यासोबत काम करून राज संतोषी फिल्ममेकिंग बद्दल बरंच शिकला. निहलानींची फिल्मोग्राफी ज्यांना माहित आहे, त्यांना हे पण माहित आहे की निहलानी हे त्या काळात भरात असणाऱ्या समांतर चित्रपट चळवळीचे आघाडीचे शिलेदार होते. संतोषीने गोविंद निहलानीचा असिस्टंट म्हणून काम केलेलं असल्याने त्याच्यावर 'आर्ट' सिनेमात काम करणारा माणूस असा शिक्का बसला होता. त्यांच्या 'अर्धसत्य ' ह्या हार्ड हिटिंग चित्रपटाचा प्रभाव भल्या-भल्यांवर पडला. दस्तुरखुद्द राज संतोषींच्या 'घायल' या पहिल्या चित्रपटामध्ये निहलानींच्या 'अर्धसत्य'च्या छटा दिसतात असं माझं वैयक्तिक मत आहे. 'घायल' कसा बनला याची कहाणी मोठी रोचक आहे. अनेक वर्ष निहलानींचा असिस्टंट म्हणून काम केल्यावर आपण आता स्वतःचा चित्रपट बनवायला पाहिजे असं संतोषीने ठरवलं. त्याने आपल्या हरवलेल्या भावाचा शोध घेणाऱ्या नायकाची कथा लिहिली होती. राज संतोषीला नायक म्हणून कमल हसन हवा होता. पण कमल हसनची हिंदीमधली कारकीर्द फारशी काही चांगली चालू नव्हती. त्यामुळे त्या कथेसाठी निर्माते मिळेनात. कमल हसनचं नाव ऐकताच निर्माते नकारघंटा वाजवायचे. मग कमल हसनला सिनेमात घेण्याचा विचार संतोषीने रद्द केला. नंतर सिनेमात मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त आले आणि गेले. अजय मेहराचा रोल करणं सनी देओलची नियती होती. राज संतोषीने सनी देओलचे काही चित्रपट बघितले होते. या पोराच्या वरकरणी निर्जीव वाटणाऱ्या डोळ्यांमध्ये एक आग आहे असं राज संतोषीला वाटलं. मग कमल हसनचा पर्याय बाजूला ठेवून राज संतोषीने सनी देओलला माझ्या चित्रपटात काम करशील का अशी विचारणा केली. सनीला पण स्क्रिप्ट आवडलंच. त्याने होकार दिला. एक निर्माता पण चित्रपट प्रोड्युस करायला तयार झाला. चित्रीकरण सुरु करण्याचा दिवस जवळ आला. आता सगळं सुरळीत पार पडणार असं वाटत असतानाच कहानी मे पुन्हा ट्वीस्ट आला. प्रोड्युसर एकदम गायबच झाला. चित्रपटाचं चित्रिकरण तर जवळ होतं. आता काय ? पण सनी देओलने स्वतःच निर्माता बनण्याचा निर्णय घेतला. 1990 साली चित्रपट प्रदर्शित झाला आणि इतिहास घडला. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भ्रष्ट सिस्टमविरुद्ध लढणारा सनी देओलचा अजय मेहरा म्हणजे 'अँग्री यंग मॅन'चा नवीन चेहरा होता. सनी देओलने अजय मेहराच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला असला तरी कमल हसनने हा रोल कसा केला असता याची मी मनात कित्येकदा कल्पना करतो.



'घायल'मधला खलनायक असणारा बलवंत राय (अमरीश पुरी ) हे त्या काळात जे जे अमंगळ म्हणून समजलं जात होतं, त्याचं पडद्यावरच प्रतीक होतं. समाजात एक सभ्य सोफिस्टिकेटेड मुखवटा घेऊन वावरणारा बलवंत राय जुगार, स्मगलिंग, व्याजबट्टा अशा क्षेत्रात नामचीन हस्ती असतो. पोलीस आणि राजकारणी त्याच्या पैशाचे आणि ताकतीचे मिंधे असतात. बलवंत रायच्या दृष्ट्कृत्याला बळी पडलेल्या भावाचा शोध घेताना 'घायल'मधला सनीचा अजय मेहरा हा भ्रष्ट  उद्योगपती आणि पोलिसांच्या अभद्र युतीविरुद्ध संघर्ष करतो. या संघर्षात त्याला पदोपदी व्यवस्थेकडून अडथळे येतात. अजय मेहरा कायदा हातात घेऊन व्यवस्थेचा विरोध मोडून काढतो. या व्यवस्थेवर आसूड ओढणारे अजय मेहराचे संवाद तुफान लोकप्रिय झाले. 'झक मारती है ये पुलिस. उतार दो ये वर्दी और पहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले में', सारखे संवाद आज पण लोकांना पाठ आहेत.

राज संतोषीचा बलात्कार या गंभीर सामाजिक मुद्द्यावर बनलेला 'दामिनी' हा दुसरा चित्रपट. चित्रपट सनी देओलचे खटकेदार संवाद, अमरीश पुरीचा उन्मत्त वकील, मीनाक्षी शेषाद्रीचा ऑथर बॅक्ड रोल, ऋषी कपूरचा प्रभावी अंडरप्ले आणि जबरदस्त कोर्टरूम नाट्य यामुळे सुपरहीट झाला. 'घायल' आणि 'दामिनी' नंतर सोशल इश्युजवर प्रभावी भाष्य करणारा दिग्दर्शक अशी राज संतोषीची ओळख प्रस्थापित होऊ लागली होती.  राज संतोषीचा बलात्कार या गंभीर सामाजिक मुद्द्यावर बनलेला 'दामिनी' हा दुसरा चित्रपट. पण राज संतोषीने 'अंदाज अपना अपना' बनवून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. 'अंदाज अपना अपना' हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला कल्ट असला तरी रिलीज झाला त्यावेळेस त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. पण व्हिडीओ कॅसेट्स, केबल टीव्ही, अनधिकृत सीडीज, पायरसी आणि यूट्यूब या माध्यमांतून या चित्रपटाला रिपीट ऑडियन्स मिळत गेला. 'अंदाज अपना अपना' नंतर संतोषी पुन्हा 'घातक' मधून पुन्हा आपल्या मूळ ट्रॅकवर वापस आला.

'घातक' हा राज संतोषी आणि सनी देओलच्या आयुष्यातला अजून एक माईलस्टोन. त्यात पुन्हा अन्यायकारक 'समांतर' व्यवस्थेविरुद्ध लढणारा सनी होता. गावाकडून शहरात आपल्या वडिलांचा इलाज करण्यासाठी आलेला भोळाभाबडा शिवभक्त काशिनाथ (सनी देओल ) कातिया (डॅनी ) नावाच्या लँड माफियाच्या आणि त्याच्या सात क्रूरकर्मा भावांच्या अवैध साम्राज्याविरुद्धच्या संघर्षात नकळत ओढला जातो. चित्रपटातले संवाद अजून पण लोकांना लक्षात आहेत. या चित्रपटातल्या संवादातून संतोषीचा डाव्या विचारसरणीकडे असलेला ओढा दिसून येतो. 'ये मजदूर का हात है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है.' सारखे संवाद याची साक्ष देतात. पण सिनेमातल्या खलनायकाची वेशभूषा स्टॅलिनसारखी होती, हे अजून एक विशेष.

नव्वदच्या दशकात वाढलेल्या पिढीतल्या प्रेक्षकांवर त्याच्या चित्रपटांतून सर्वाधिक प्रभाव टाकणारा दिग्दर्शक म्हणजे राज संतोषी असं माझं वैयक्तिक आहे. 'हिरो वर्शीप' करणाऱ्या समाजात दिग्दर्शक हा तसा दुर्लक्षित प्राणी. पण राज संतोषी याला अपवाद आहे.  'घायल', 'घातक' आणि 'दामिनी' या तिन्ही चित्रपटांमध्ये सनीचा नायक हा अशाच भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवतो. 'घायल' मधला सनीचा अजय मेहरा हा भ्रष्ट उद्योगपती आणि पोलिसांच्या अभद्र युतीविरुद्ध संघर्ष करतो. 'घायल'मधला बनारसच्या घाटावरचा भोळाभाळा काशिनाथ मुंबईतल्या लँडमाफिया विरुद्ध लढा पुकारतो. 'दामिनी'मधला वैयक्तिक आयुष्यातल्या घटनांनी वैफल्यग्रस्त झालेला दारुडा वकील गोविंद एका बलात्कारित स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडतो. यातला त्याचा 'तारीख पे तारीख' हा संवाद न्यायव्यवस्थेमधल्या न्याय मिळण्याच्या विलंबावर अतिशय मार्मिकपणे बोट ठेवतो. ह्या चित्रपटांमध्ये मांडलेले मुद्दे हे प्रेक्षकांच्या अतिशय जिव्हाळ्याचे होते. सनीने आपल्या खड्या आवाजात अतिशय आक्रमकपणे या सर्वसामान्य जनतेला न्याय न देणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचे संवाद पडद्यावर म्हंटले. आपल्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या या नायकाबद्दल प्रेक्षकांना आपसूकच जिव्हाळा वाटू लागला. सनी देओल नावाचा लीजंड तयार होण्याची सुरुवात या राजकुमार संतोषीच्या चित्रपटांपासूनच झाली. देशाच्या व्यवस्थेने कायमच दुर्लक्ष केलेल्या निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या जनतेची नाळ सनी देओलशी जुळली ती इथे. पण दुर्दैवाने वैयक्तिक मतभेदांमुळे संतोषी आणि सनीची भागीदारी संपुष्टात आली. हे व्यक्तिशः दोघांचं नुकसान तर होतंच पण तितकंच प्रेक्षकांचं पण होतं. हे दोघे आपले मतभेद मिटवून पुन्हा एकत्र येणार अशा बातम्या मध्ये-मध्ये येतात पण ते मृगजळच सिद्ध होतं.

जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे, हे वाक्य घासून कितीही गुळगुळीत झालं असलं तरी आपल्या समाजाचं कायमस्वरूपी वास्तव आहे हे नक्की. योगायोगाने अर्थमंत्री जेटलींनी नुकत्याच सादर केलेल्या बजेटनंतर सर्व वर्गातला असंतोष पुन्हा उफाळून वर आला आहे. भ्रष्टाचार कमी होण्याचं नाव घेत नाही. वेगवेगळ्या जातीधर्मांमधली दरी अजूनच वाढत चालली आहे. पण हा सामाजिक असंतोष पडद्यावर दाखवणारे दिग्दर्शक आणि अभिनेते सध्या दिसत नाहीयेत. ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत असे 'स्टार्स' प्रस्थापितांचंच लांगुलचालन करतील असे चित्रपट करण्यात धन्य मानत आहेत. पुन्हा एका अजय मेहराची आणि काशिनाथची निकड आहे आणि भारंभार रोमँटिक चित्रपट आपल्या माथी मारले जात आहेत. जनतेचा असंतोष मांडणाऱ्या चित्रपटांची मोठी पोकळी पुन्हा तयार झाली आहे.

अमोल उदगीरकर