सलमान खानच्या कुठल्याही गुन्हेगारी केसची सुनावणी होते तेव्हा सलमानच्या 'हिट अँड रन' ची चर्चा होतेच. मद्याच्या अंमलाखाली सुसाट गाडी चालवून फुटपाथवर झोपलेल्या निरपराध गरीब लोकांना चिरडून मारल्याचा आरोप सलमानवर आहे. आपल्याकडच्या रिवाजाप्रमाणे ही केस वर्षानुवर्षे कोर्टात चालली. अनेक साक्षीदार फिरले. सलमानसोबत त्या घटनेच्या वेळी असणारा पोलीस कॉन्स्टेबल गूढपणे हलाखीच्या परिस्थितीमध्ये मरण पावला. सलमानचा मित्र आणि घटनेचा साक्षीदार गायक कमाल खान गूढरित्या देशातून गायब झाला आणि सलमान या केसमधून सुटल्यागत जमा आहे. या घटनेबद्दल प्रचंड जनक्षोभ आहे असं मानलं जातं. पण सलमानची हिट अँड रन केस काही बॉलिवूडमधली या प्रकारची केस नाही. हा मान जातो तो एका अप्रसिद्ध अपयशी नटाकडे. त्याचं नाव पुरु राजकुमार. आपल्या संवादबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या राजकुमार या प्रख्यात नटाचा मुलगा.


1993 च्या डिसेंबरमध्ये थंडीच्या दुलईत गारठलेली मुंबई झोपली होती. नुकत्याच झालेल्या दंग्यातून आणि बॉम्बस्फोटातून मुंबई अजूनही सावरलेली नव्हती. वेळ रात्रीचे साडे तीन. एक आलिशान इम्पोर्टेड कार वेगाने बांद्र्याच्या रोडवरून सुसाट वेगाने निघाली. अचानक चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटलं. गाडी वेडीवाकडी एका फुटपाथवर चढली. तिथे पाच लोक झोपली होती. गाडी त्यांना चिरडून निघून गेली. तीन जणांचा मृत्यू झाला. दोघेजण गंभीर जखमी झाले. गाडीच्या चाकाखाली अडकलेल्या गंभीर जखमी लोकांना तसंच तडफडत ठेवून चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. ती आलिशान इम्पोर्टेड गाडी पुरुची होती. पुरु हा त्यावेळी बॉलिवूडमध्ये 'नेक्स्ट बिग थिंग ' म्हणून ओळखला जायचा. त्याची ओळख त्यावेळी राजकुमारचा मुलगा आणि पार्ट्यांमध्ये रमणारा श्रीमंत पोरगा अशी होती. त्या काळ्या रात्री पण पुरु दारूच्या अमलाखाली होता असा संशय व्यक्त करण्यात आला होता. पण त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल किती होतं हे चेक करणारी चाचणी झालीच नाही. त्यामुळे त्या रात्री तो दारू पिऊन होता का ही बाब शेवटपर्यंत अंधारातच राहिली. पुरु जेमतेम एक रात्र पोलीस कोठडीमध्ये होता. नंतर 950 रुपयाच्या जामिनावर तो बाहेर पडला. दोनच दिवसानंतर तो एका हॉटेलमध्ये पार्टी करताना दिसला. पण ही सगळ्यात धक्कादायक बाब नाहीये.  कोर्टामध्ये खटला उभा राहिला. पुरुचे वकील वीरेन वाशी यांनी असा आक्रमक युक्तिवाद केला की त्यांचा क्लायंट हा एक उदयोन्मुख अभिनेता असून जर त्याला तुरुंगवास झाला तर त्याचा परिणाम त्याच्या कारकीर्दीवर होईल. कोर्टाने दिलेला निकाल आश्चर्यकारक होता. त्यांनी पुरुच्या गाडीखाली आलेल्या लोकांना पुरूने नुकसानभरपाई द्यावी असा आदेश दिला. किती असेल ही नुकसान भरपाई ? मृतांच्या वारसदारांना तब्बल तीस हजार तर वाचलेल्या एका जखमीला, ज्याचा पाय कापावा लागला त्याला 5000 रुपये इतकी 'घसघशीत' नुकसानभरपाई देण्याचे निर्देश कोर्टाने पुरु राजकुमारला दिले. त्याकाळी आजसारखा आक्रमक सोशल मीडिया नव्हता की चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या नव्हत्या. काही  वर्तमानपत्रांनी गदारोळ करण्याचा प्रयत्न केला पण फारसा उपयोग झाला नाही. त्या काळात पण बॉलिवूडमधल्या अनेक लोकांनी पुरुची पाठराखण केली. स्वतः राजकुमार यांनी अनेक मुलाखती देऊन पुरुचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. (जाणवतंय का सलमान खान प्रकरणाशी काही साधर्म्य?) .

राधा राजाध्यक्ष ही तडफदार महिला पत्रकार हिमतीने या प्रकरणाचा पाठपुरावा करत होती. तिने पोलीस स्टेशन, केसशी संबंधित वकील आणि जज, मोटर  अॅक्सिडेंट क्लेम्स ट्रिब्युनल इथे प्रकरणाचा पाठपुरावा केला. सरकारी यंत्रणांकडून तिला मिळालेला प्रतिसाद अतिशय थंड आणि अनुत्साही होता. ज्याचा पाय कापला गेला होता त्या माणसाला एक कपर्दिकही मिळाली नव्हती. त्याच्यावर परिवाराला जगवण्यासाठी अक्षरशः भीक मागण्याची पाळी आली होती. कारण पाय कापला गेल्याने त्याला इतर काम करता येत नव्हती . संवेदनशील पत्रकार असलेल्या राधा राजाध्यक्षने या प्रकरणावर बरेच लिखाण केले आहे . या लेखातले काही संदर्भ तिथूनच आले आहेत. ह्या प्रकरणात अन्याय झाला हे उघड आहे. पुरुचे वकील म्हणून काम करणाऱ्या वीरेन वाशी यांना पण मनातून हे खात असावं. काही वर्षानंतर एका वर्तमानपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी पुरु राजकुमार 'हिट अँड रन' प्रकरणात 'न्याय' झाला नाही ही खंत बोलून दाखवली.

एवढं सगळं होऊन पुरु राजकुमारला एका मोठ्या बॅनरकडून मोठा ब्रेक मिळाला . करिष्मा कपूरसारख्या त्या वेळच्या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत त्याचा पहिला चित्रपट 'बाल ब्रम्हचारी' 1996 प्रदर्शित झाला. तो आपटला. नट म्हणून तो यथातथाच असल्यामुळे त्याची कारकीर्द फारशी चालली नाही. काही फुटकळ भूमिका करून त्याची कारकीर्द नट म्हणून संपली. शेवटचा तो 'वीर ' या चित्रपटात 2010 साली दिसला होता. या चित्रपटाचा नायक सलमान खान होता. याला योगायोग म्हणावं का नियतीचा क्रूर न्याय?

जॉली एलएलबी या अशाच केसवर आधारित सिनेमावर काही प्रमाणात या घटनेचा प्रभाव आहे .

भारतीय पुराणामध्ये पुरु राजाचा उल्लेख आहे. मराठी वाचकांना तो माहीत आहे, तो आपले वडील असणाऱ्या ययातीला आपलं तारुण्य देणारा मुलगा म्हणून. या आधुनिक पुरूने मात्र आपल्या बापाला फक्त मनस्ताप दिला. पुरु राजकुमार आणि सलमान खान यांच्या 'हिट अँड रन' प्रकरणात अनेक साम्यस्थळं आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचं आणि सर्वसामान्य माणसाला घाबरवून टाकणार साम्य म्हणजे तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही काहीही करू शकता, अगदी 'व्यवस्थेला' पण गुंडाळून टाकू शकता हे समोर येणारं भगभगीत सत्य. एक व्यवस्था म्हणून 2016 मध्ये पण तेच आहोत जे 2013 साली होतो ही कडू गोळी गिळण्याशिवाय आपल्याकडे पर्याय तरी काय आहे? सध्या तरी 'कुत्ता रोड पे सोएगा तो कुत्ते की मौत मरेगा' असं उद्दाम ट्वीट करणाऱ्या अभिजीतसारख्या लोकांचीच ही व्यवस्था बटीक आहे.. राहील..

संबंधित ब्लॉग :

'हम आपके है कौन' आणि आपली बदललेली लग्न


सोशल मीडिया, सिनेमा आणि आपण 

चित्रपटांवरच्या बहिष्कारामागचं अ(न)र्थशास्त्र 

जोडी नंबर वन

कायद्यापेक्षा सत्याशी इमान असणारा ब्योमकेश बक्षी 

जसपाल भट्टी-सामान्य माणसाचा कलाकार मित्र 

अल्ताफ राजा आणि त्याचा निमशहरी सोशल रिलिव्हन्स

राम लक्ष्मण-दुर्लक्षित मराठी सांगीतिक कर्तृत्व

सौंदर्यवती  : सोनाली बेंद्रे

ब्लॉग : ‘घायल’ आणि ‘घातक’ : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक

ब्लॉग : सारे रास्ते वापस हरिहरन के पास आते है

तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला

चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट

सिनेमा ‘बघण्याच्या’ प्रक्रियेत झालेली इव्होल्यूशन

नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल

गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू 

जतिन -ललित मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा

जेपी-असा दिग्दर्शक ज्याला पाकिस्तानातून धमक्या यायच्या 

एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी!

ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा

एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ?

जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान 

अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका

गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट 

श्रीदेवी नावाचं फेनॉमेन 

कुमार सानू -एका  दशकाचा  आवाज (1)