कोकण, म्हटलं की नजरेसमोर उभा राहतो तो हिरवाईनं नटलेला परिसर. निसर्ग संपन्नता, जैवविधता, समुद्र, टुमदार कौलारू घरं, उंचच उंच डोंगररांगा आणि सह्याद्रीची कडेकपारी. पण, कोकणातील लोकपरंपरा, सण-उत्सव, खानपान संस्कृती देखील कोकणाची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यात गणोशोत्सव आणि कोकणचं नातं नेमकं काय? हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जगाच्या पाठीवर कुठंही असला तरी कोकणी माणूस आपल्या मुळगावी शिमगा आणि गणपतीकरता येणारच. पण, कोरोनामुळे शिमगा देखील आटोपशीर घ्यावा लागला. यातून गणेशोत्सव सुटेल अशी आशा होती. पण. ती देखील मावळली.


सारी परिस्थिती पाहता कोकणी माणसानं यंदा साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा कोकणात गणेशोत्सवाच्या काळात देखील 'इतना सन्नाटा क्यो है भाई?' अशी म्हणण्याची वेळ आली. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आताषबाजी करत कोकणातल्या घरोघरो बाप्पा विराजमान होत असे. हा सारा नजारा पाहण्यासारखा असाच. पण, यंदा मात्र सर्वांनी नियम काटेकोरपणे पाळत कोरोनाला हरवण्याचा निर्णय कोकणी माणसानं केलाय. परिणामी ऐरवी गणेश चतुर्दशीच्या दिवशी बाप्पा आणण्याकरता होणारी गर्दी टाळण्याचा निर्णय झाला. दोन दिवस अगोदरच बाप्पाला घरी आणलं गेलं. ते देखील साधेपणानं. प्रत्येकजण तोंडाला मास्क, सुरक्षित अंतर ठेवत, सॅनिटायझरचा वापर करत असल्याचं चित्र यंदा दिसत होतं. नव्वद टक्क्यांपेक्षा देखील जास्त गणपती यंदा दोन दिवस अगोदरच आपल्या घरी नेले होते. हे असं पहिल्यांदाच घडलं असावं. काहींनी तर आपली शेकडो वर्षांची परंपरा देखील मोडली.

माझा जन्म कोकणचा. माध्यमिक शिक्षक देखील कोकणात. पण, पुढील शिक्षणासाठी मुंबई (तसं मुंबईला नोकरीकरता जाणं हा मुळ उद्देश होता). जवळपास दहा वर्षे मुंबईत राहिल्यानंतर दरवर्षी गणपतीकरता गावी येणे हे आलंच. एक दिवस का असेना पण गणपतीकरता गावी जाणं हा मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक कोकणी माणसाचा जन्मसिद्ध अधिकार. जन्मताच त्याला जणू हे बाळकडू पाडलं जात असावं. याकाळात सुट्टी मिळत नसेल तर चाकरमानी काहीही कारणं देत गावी येतोच. आरती, भजनं, फुगड्या, टिपऱ्या, झाकडी आणि विविध कार्यक्रमांमुळे गाव-खेड्यांमधील वातावरण आणखीन भारावून जात असे. रात्रभर चालणारा बाप्पाच्या नावाचा गजर आणि जुन्या आठवणींना ऊत येत असे. एक ना अनेक कार्यक्रम यावेळी संपन्न होत असतं. चाकरमान्यांना तर फार मोठं महत्त्व. कारण, चाकरमानी गावी आला नाही असा आजवर एकही गणेशोत्सव कोकणात झाला नाही.

रात्रीच्या वेळी चिबुड, तौवशी (काकडी) चोरणं हा तर प्रत्येकाचा वेगळा छंद (यावरून कधी वाद झाले नाहीत. याकडे एक मजा म्हणूनच आम्ही पाहतो). नवी-जुनी पिढी एकत्र येणे. आपुलकी, आपलेपणा वाढवणे, वाटणे. मायेचा ओलावा जपणे, एकमेकांची ओळख, सुख - दु:खाची देवणघेवाण अशा एक ना अनेक गोष्टी याच बाप्पाच्या साक्षीनं दरवर्षी केल्या जात असत. पण, यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. बालपणापासून पाहत, अनुभवत आलेलं वातावरण पाहिल्यानंतर यंदा खरंच गणोशोत्सव आहे का? हा प्रश्न सर्वप्रथम मनात येतो. कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण जानेवारी महिन्यात नवीन कॅलेंडर आले की गणपती किती तारखेला आणि कोणत्या महिन्यात येत आहेत हे पाहून प्रत्येक कोकणी माणूस आपल्या वर्षभराच्या सुट्ट्या आणि ऑफिसमधील कामाचे नियोजन करत असतो. पण यंदा मात्र वर्षभराच्या साऱ्या प्लॅनवर कोरोनामुळे पाणी फेरले.

बाजारपेठा उशिरानं सजल्या तरी कमी प्रमाणात दिसून येणारी लगबग. आरती, भजनं यांचे सूर कानी पडत नसल्यानं मनात खिन्नता. ढोलकीचे सूर आणि फुगडीचे बोल कानावर येत नसल्यानं काही तरी चुकलं असल्याची भावना. अशा एक ना अनेक गोष्टी सध्या प्रत्येक कोकणी माणसाला जाणवत आहेत. अनेकांना तर आपले अश्रु देखील अनावर होत असल्याचं चित्र कोकणात दिसून येत आहे. तुम्ही आज कोकणातील कुणाही एका जुन्या-जाणत्या माणसाशी बोललात तरी त्याच्या तोंडून 'आम्ही हे पहिल्यांदाच अनुभवतोय' असे शब्द ऐकायला मिळतील.

कोकणी माणसाची त्याच्या मुळ गावशी असलेली नाळ आणि सण-उत्सव साजरे करण्यास कायम अग्रेसर असणारा कोकणी माणूस आज मागे आहे. उद्देश एकच कोरोनाला पुढे जाऊ न देणे. आज प्रत्येक जण आपली नाराजी बोलून दाखवतोय. चेहऱ्यावर देखील ती दिसून येतेय. महामारी काळातील हा गणेशोत्सव असला तरी त्याला समर्थपणे, बाप्पाच्या आशिर्वादानं तोंड देण्याचा धीरोदत्तपणा कोकणनं दाखवलाय. पण, एक मात्र नक्की कोरोनाला हरवून, कोरोनाचं संकट संपवून पुढच्या वर्षी कोकणातील गणेशोत्सव गणेशोत्सव हा दणक्यात साजरा होणार! गणपती बाप्पा मोरया!