काल एक बातमी पाहिली आणि मन सुन्न झालं.. जसं एखाद्या आयसीसच्या आतंकवाद्यानं कुण्या पत्रकार अथवा सामान्य नागरिकाला हाल-हाल  करुन मारल्यावर होतं तसं...


जेव्हा अखलाख नावाच्या एका माणसाला मारलं होतं, तेंव्हा झालं होतं तसं...

जेव्हा कोपर्डीतल्या आपल्या एका भगिनीवर अत्याचार झाला, तिला प्राणाला मुकावं लागलं, तेव्हा झालं होतं तसं...

जेव्हा दक्षिणेत डाव्या आणि उजव्या विचारांच्या भांडणात क्रूर हत्या होतात, तेव्हा झालं होतं तसं...

जेंव्हा पुण्यातल्या एका पोरानं आपल्या जन्मदात्या आईबापाचा गळा चिरल्यावर झालं तसं...

मन नेहमीच सुन्न होतं आणि काही वेळात विसरुनही जातं... कारण पुढच्या बातमीवर काम करायचं असतं.. पुढची ब्रेकिंग चालवायची असते. आम्हा पत्रकारांचं आयुष्य हे असंच असतं आमच्या लेखी माणसं ही फक्त माणसंच असतात. ती कोणत्या जातीची असतात त्याचा विचार आम्ही करत नाही. आम्हाला फक्त एक माहिती असतं की माणूस मेलाय. एक बळी गेलाय, त्याची जात कोणती हे आम्ही विचारत नाही. तो का मेला किंवा मारला गेला हे आम्ही विचारत असतो, व्यवस्थेला, समाजाला, आणि माणसांना...

काल राजस्थानमध्ये एका व्यक्तीची हत्या झाली. अर्धमेल्या त्या माणसाला एका माणसानं जिवंत जाळून टाकलं. त्याचं सोशल मीडियावर लाईव्ह कव्हरेज संपूर्ण भारतानं पाहिलं. सर्व वर्तमान पत्रांच्या मुख्य पृष्ठांवर ती बातमी झळकतेय. एक ठरवून केलेला खून त्याची केलेली पूर्वतयारी, ते माध्यमांमध्ये व्यवस्थितपणे छापून यावं त्याची चित्रफीत माध्यमांमध्ये व्यवस्थित झळकावी यासाठी केलेले प्रयत्न हा एकटा व्यक्ती करू शकत नाही अशा घटना ह्या संघटीत असतात, त्या कोणीही करो. त्याच्यामागे संघटीत शक्ती असतात. अशा व्यक्तींना कुणीतरी अभय दिलेलं असतं. कुठूनतरी चिथावणी, प्रेरणा, अनुकरण या गोष्टी अशा घटनांमध्ये क्रमप्राप्त असतातच. अशा क्रूर घटना भारतामध्ये घडत असतील आणि घडणार असतील तर आपण कोणत्या दिशेने वाटचाल करतोय? पोलिस प्रशासन कदाचित त्या व्यक्तीवर एफआयआर करेल त्याला शिक्षाही होईल. पण ही मानसिकता बदलण्याची गरज आहे ती बदणार कोण?

पूर्वी खून हे गूपचूप व्हायचे नंतर पोलिस त्याचा तपास करायचे तपास करण्यासाठी बिचाऱ्यांना बरेच कष्ट करावे लागायचे, परंतु आजकालचा हा ट्रेंड पोलिसांच्या दृष्टीने उत्तम आहे, जास्त कष्ट न करता खूनी कोण आहे तो लगेच समजतो, कदाचित अशा खुन्यांना लगेच सुटून बाहेर येण्याची घाईही असेल कारण कालच्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती बोलत होता की एक एक करके सबको मिटाना है, ही मानसिकता बदलण्याची जबाबदारी कोणाची किंवा या मानसिकतेला जबाबदार कोण?  असे बरेच प्रश्न निर्माण होतात.

जेंव्हा ही जबाबदारी निश्चित होईल तेंव्हा आपण पुढच्या चर्चेला वाट मोकळी करून देऊ शकतो..पण जबाबदारी आपली असूनही जेंव्हा ती आपण झटकतो तेंव्हा समोरचा माणूस हा केवळ ही जबाबदारी तुझी कशी आहे हे समजावण्यात आपली शक्ती आणि वेळ खर्ची घालवतो. मूळ प्रश्न हा बाजूला राहतो.या प्रकरणातही हेच होण्याची शक्यता आहे.प्रत्यक्ष खून करणाराची जबाबदारी ही खून करणे आहे ती त्याने स्विकारलीही परंतु त्याच्यामध्ये जी क्रूरता निर्माण केली गेली त्याच्या मनात हे ठासवलं गेलं ‘हा तुझा शत्रू आहे. ह्याच्या पूर्वजांनी तुझ्यावर अत्याचार केले. हे म्हणजे पृथ्वीवर जन्माला आलेले राक्षस आहेत. इतिहासात आपल्या महापुरूषांनी जसा राक्षसांचा संहार केला तसा तुलाही करायचाय फरक एवढाच आहे की त्यांनी समोरुन वार केला होता तू किमान मागून तरी वार कर पण सुरूवात तरी कर’.  अशा उपदेशांना, आदेशांना जबाबदार कोण?

जे महानुभाव आजही समाजाला घडवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात, घरदार सोडून समाजाला नवी दिशा देण्याचं काम करतात, आपलं सर्वस्व या देशासाठी,समाजासाठी समाजातल्या वंचित, शोषित घटकांसाठी अर्पण करतात संपूर्ण आयुष्य केवळ एका ध्येयासाठी खर्ची करतात अशा पवित्र साधुवृत्तींच्या माणसांवर अशा वेळी प्रश्नचिन्ह उभे राहणे साहजिकच आहे.  पण ही जबाबदारी त्यांचीच आहे का? ज्यांनी देश आणि समाज सुधारण्यासाठी पुढाकार घेतलाय

ही जबाबदारी माध्यमांची, समाजातील बुध्दीवाद्यांची आणि सरकारचीहि आहे. समाजातील विचारवंतांनी केवळ सरकार आणि स्थानिक प्रशासनावर ओरखाडे ओढत त्यांना खडसावणं जेवढे गरजेचे आहे तेवढचं अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून समाज घडवण्याची जबाबदारीही घेतली पाहिजे केवळ पोकळ चर्चा करून असे प्रश्न सुटणं शक्य नाही

एका माणसाचा निर्घृणपणे खून झालाय, तो ओरडतोय, किंचाळतोय आणि जिवंत जळतोय. हा प्रकार पाहिल्यानंतर इसीसच्या आतंकवाद्यांनाही शरम वाटेल की क्रूरतेमध्ये आपल्याही पुढे कोणीतरी गेलंय. इसिसमध्ये लोकांना मारण्याची पध्दती आणि कालच्या हत्येची पध्दती पाहून भारतातल्या काही मुस्लिमांचा जसा इसिसशी संबंध आहे तसा मुस्लिमेतरांचाही आहे की काय असा प्रश्न पडतो. प्रथमदर्शनी त्या व्यक्तीच्या भाषणावरून तर हा प्रकार लव्ह जिहाद प्रकरणावरून घडलेला आहे असं दिसतंय. म्हणजे माणसानं माणसावर प्रेम केल्यानंतर अशी अवस्था केली जाणार हे नक्की. मुस्लिम मुलाने हिंदु मुलीवर प्रेम करणं म्हणजे लव्ह जिहाद आणि असा जिहाद करणाऱ्याला  समाजातील ठेकेदारांकडून अशा प्रकारे शिक्षा दिली जाणार. प्रशासन त्यानंतर कारवाई करणार म्हणजे येथे प्रशासनाचं स्थान दुय्यम करण्यात आलंय. धर्मसत्ता प्रबळ झाल्यास सर्वसामान्यांचं जिणं मुश्कील होऊन जाईल हे सरकारला समजत नाहीये किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही.

मी इथे कशाप्रकारे मुस्लिमांना किंवा दलितांना मारलं जातंय याचा उहापोह करत नाहीये. किंवा तशी सहानुभूती कोण्या एका समूहाला मिळवून देण्याचा प्रयत्नही करत नाहीय. भारतात सर्वच धर्म प्रबळ होण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना तसं पूरक वातावरणही या देशात निर्माण झालेलं आहे. मग त्यामध्ये हिंदू असोत किंवा मुस्लिमांचा उपद्रव असो अथवा ख्रिश्चन असोत.  या सर्व धर्मसत्ता प्रबळ होण्यात एकमेव कारण आहे राजसत्तेचं कमजोर असणं म्हणजेचं सरकारची हतबलता. कधीकाळी मुस्लिम अत्याचारी होते आज मुस्लिमेतरही अत्याचारी झालेत. अतिशय क्रूर मानसिकतेला आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय.  ही मानसिकता काळानुसार फोफावली तर माणसं ही अशा प्रकारेच मारली जाणार, जिवंत जाळली जाणार...

आणि जेंव्हा अशा हत्या होतील तेंव्हा आम्ही प्रश्न विचारणारच मग त्या हत्या उत्तरेत होवोत, दक्षिणेत होवोत किंवा भारतातल्या अन्य कोणत्याही प्रांतात होवोत. संबंधितांना जाब हे विचारले जाणारच. माणसांना माणसांकरवी मारून त्यांच्या कबरींवर किंवा चितेंवरती भारताचं  स्टँडअप करायचं असेल, पुनर्निर्माण करायचं असेल तर अशा उभ्या राहिलेल्या भारताचा पाया किती भक्कम असेल, जेंव्हा हे सांगाडे कुजतील त्यावर उभा राहिलेल्या या भारताला आपला तोल सांभाळण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील याची कल्पना आम्हाला आजच्या घडीला येत नाही. जगात एकमेव या देशात शांतता नांदत असताना ती भंग न होऊ देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत का?

त्यामुळं हा प्रश्नही निर्माण होतोय की, क्रूर हत्यांची आणि अशा हत्या न होऊ देण्याची.. जबाबदारी कोणाची ?

(संबंधित लेखातील सर्व मते ही लेखकाची व्यक्तीगत आहेत)