रमेश इंगळे उत्रादकर यांची सारे प्रश्न अनिवार्य नावाची कादंबरी आहे. त्यामध्ये तीन भाषणे दिली आहेत, पैकी भाषण क्रमांक 2


''आज पंधरा ऑगस्ट नाही का सव्वीस जानेवारी नाही. पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आस्ती तं आपुन झेंडा फडकवला असता. आज झेंडा फडकवायचा दिवस नाही. आज दोन मिंटं शांत उभं राहून श्रद्धांजली द्यायचा दिवस हाये. आधीच्या वक्त्याने सांगितलं की आजच्या दिवशी गांधीजींचा खून झाला. तो कोण माथेफिरू गोडसे का घोडसे त्याने गांधीजींचा खून केला. गांधीजी चाल्ले होते आरामशीर प्रार्थनेले. हा समोरून आला बहाद्दर.....गांधीजींकड पाहिलं...पिस्तुल काढली...ढिश्यूम..ढिश्यूम...ढिश्यूम...तीन गोळ्या सोडल्या एकामागून एक. गांधीजी पडले खाली. तोंडात...हरे राम हरे राम राम राम हरे हरे. आणि हे हरामखोर गेलं पळून. लगेच जिकडं तिकडं बातमी गेली. कोणीतरी कस्तुरबाले जाऊन सांगितलं. कस्तुरबा पळतच आली. लांबून हंबरडा फोडला माऊलीनं. गांधीजी खाली पडेल. सगळीकडं रगतच रगत. कस्तुरबा चार चार बायाहिले आवरत नव्हती. गांधीजींच्या अंगावरच जाऊन पडायले करे. छाती पिटे, डोकं झोडे. धाय मोलकून म्हणे...महा बापू गेला वं.. महं कपाळ फुटलं बप्पा..मी मागं राहून काय करू आत्ता... माह्या भी छातीत गोळ्या घाला बाप्पा... मोठा कठीण प्रसंग होता त्यो. तर अशा या दिवशी या थोर पुरुषाला श्रद्धांजली म्हणून दोन मिनटं शांत उभा राहतो. सगळे जण आपल्या हातचे कितीबी अर्जंट काम असो ते सोडून जिथल्या तिथं उभा राह्यतात. मांस तर उभा राहतातच पण रस्थ्यावरच्या गाड्या दोन मिंट थांबतात, आगगाड्या थांबतात. एवढंच नाही तं वर आभाळात उडणारे विमानंबी थांबतात.''


याच कादंबरीत पुढे शाळा तपासणीचा एक प्रसंग आहे..


महात्मा गांधी...


''गावं तिसरं, शाळा तिसरी. शाळेचं ऑफिस. साहेब ऑफिसात शिरले. सगळ्यांना बोलावून घेतलं. सगळे पकडून आल्यासारखे उभे. त्यात नवीन एक शिक्षणसेवक म्हणून लागलेला पोरगा होता. कोवळासा भेदरलेला. त्याच्याकडे पाहत साहेब हेडमास्तर ला म्हणाले हा कोण.? 'शिक्षणसेवकहे नुकताच लागलाय'. साहेबानी त्याला नांव, गाव, डीएड चे मार्क्स विचारले. मग समोरचा फोटो पाहून विचारलं तो फोटो कुणाचाहे ? शिक्षण सेवक चाचरत म्हणाला ..'इंदिरा गांधी'. इंदिरा गांधी चे वडील कोण होते ? शिक्षणसेवक चाचरत..'महात्मा गांधी'. साहेब अवाक...तळपायाची आग मस्तकात.ही नवी जनरेशन. लाथा घालायला पाहिजे ढुंगणावर भोसडीच्यांच्या.''


वरकरणी हे प्रसंग जरी विनोदी वाटत असले तरी परिस्थिती यापेक्षा जास्त वेगळी नाही. गेली 73 वर्षात आपण आपली शिक्षणपद्धती ठरवू करू शकलेलो नाहीत हे आपले अपयश आहे. याला जबाबदार केवळ शिक्षकच आहेत का? तर नाही, याला समाजातील प्रत्येकजण तितकाच जबाबदार आहे. आपण शासन दरबारी कितीवेळा दर्जेदार शिक्षणासाठी भांडलेलो आहोत? आपण कितीवेळा शाळेत जाऊन आपल्या मुलाची शाळा कशी आहे याबाबत आवाज उठवला आहे? गावातील शाळेत शिक्षकांना टॉयलेट्स आहेत का हे सुद्धा आपल्याला माहीत आहे काय? शालेय शिक्षण समितीत असलेले कितीजण किमान शैक्षणिक जाण असलेले आहेत? शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाच्या नावाखाली देण्यात आलेले संगणक अनेक ठिकाणी धूळखात पडलेत, याबाबत आपण सवाल केले आहेत का? या सर्व बाबीकडे आपण दुर्लक्ष करत आहोत कारण आपल्याला नगदी स्वार्थ हवा आहे. शिक्षण ही एक गुंतवणूक आहे हे आपल्याला माहितीच नाही. आपल्याकडे शिक्षण सोडून इतर कामे शिक्षकावर लादली जातात. शिक्षक हा सांगकाम्यासारखा आपल्याकडे वापरला जातो. सगळी पडेल ती शासकीय कामे त्याच्यावर लादली जातात. यावर पालक म्हणून आपण कधीच आवाज उठवत नाही. हे सगळे थांबले पाहिजे. या अशा शिक्षणपद्धतीमुळे बऱ्याच लोकांनी आता होम स्कुलिंगचा पर्याय निवडला आहे. मी देखील माझ्या पोराला शाळेत न टाकण्याचा विचार करत आहे. हे खरेच दुःखद आहे पण सध्यातरी यावर उपाय दिसत नाही.


मुळात 12 वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा केलेला माणूस आपल्याकडे शिक्षक म्हणून नेमला जातो हेच चूक आहे. हायर एज्युकेशन घेतलेले विद्यार्थी शिक्षक म्हणून नेमायला हवे आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. आजही इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे जे खुळ आले आहे ते सुधारणावादी विचारातून आलेले नसून त्यामागे प्रचंड मोठे अर्थकारण दडलेले आहे हे आपल्याला लक्षातच येत नाही. आपल्याला शिक्षक शाळा सोडून मंदिरात दिसला तर आदर्श वाटतो आणि एखादा शिक्षक दिवसभर काम करून मटण घरी घेऊन जाताना दिसला तर नालायक वाटतो. आपण काही सामाजिक सेन्सॉरशिप निर्माण केलेली आहे ती मोडीत निघायलाच हवी.


हल्ली शिक्षक देखील भारी वागताना दिसतात. स्वतःच्या गावात बदली करून घेऊन गावचे राजकारण आणि स्वतःची शेती करत उरलेल्या वेळेत प्लॉटिंगचा व्यवसाय करत जमलेच तर शाळा पाहणारे कित्येक महाभाग आपल्या आसपास दिसतील. आपण यावर कायम गप्प असतो. शाळेची जागा गावातील मोठाल्या धेंडानी वाटून घेतलेली आपण गप्प पाहत बसतो. शाळेला चिटकून पत्त्याचा क्लब चालवणारा माणूस कित्येक वर्ष आपल्या ग्रामपंचायतीचा सदस्य असतो. हे सगळे आपल्याला चालते पण पठडीच्या बाहेर काम करू पाहणारा एखादा शिक्षक यावर आवाज उठवायला लागला तर तू तुझं गप शाळेचं पहा, परक्या गावात राजकारण करायचा शहाणपणा नको म्हणून धमकावले जाते हे देखील सत्य आहेच.


आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्यासाठी अडाणी नेत्याला रोज दोन वेळा मुजरा करणारे, नेत्याच्या कार्यकर्त्यांना घेऊन नेत्यांना भेटायला जाणारे, नेत्याला स्वतःच्या मागे किती मतदार आहेत हे आकडे पटवून देणारे आणि आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन येताना कार्यकर्त्यांना धाब्यावर घेऊन बसलेले कित्येक शिक्षक मी दाखवू शकतो. हे सारे किळसवाणे आहे. स्वतःच्या चड्डीची नाडी बांधता न येणाऱ्या टीचभर पोराच्या गळ्यात पक्षाचा झेंडा घालणारा बाप आणि आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्यासाठी जिल्हापरिषदेच्या शिक्षण सभापतींच्या घराचे उंबरे चाटणारे शिक्षक हे मला सारख्याच पातळीवरील मूर्ख वाटतात.


माझ्यासह किती लोकांना कालपर्यंत डिसले सर करत असलेले काम माहीत होते? खूप कमी लोक असतील अशी. अण्णाभाऊ साठेंसारखे साहित्यिक आपल्या आधी रशियाला समजतात मग आपल्याला अक्कल येते अगदी तसेच डिसले सरांबाबत झालेले आहे. आपल्याला वेळच नसतो असल्या गोष्टी पहायला. मुळात कुणी काही वेगळे करत आहे हे समजले की आपण त्याला अतिशहाणा म्हणून रिकामे होतो. स्वतःला मिळालेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम इतर 9 जणांना देण्यासाठी दानत लागते. एखाद्या खेड्यात राहून जगात एक नंबर येणे हे साधे काम नाही. किती मेहनत आणि कामाप्रति प्रेम असेल त्या माणसाचे. अशा शिक्षकांच्या जीवावर देश घडत असतो. आपल्या आसपास देखील अशी मनातून चांगले काम करू इच्छिणारी भरपूर शिक्षक मंडळी आहेत. केशव खटिंग यांना आदर्श शिक्षक पुरस्कार ऑफर केल्यावर "मी चांगले काम करत आहे ते पहावत नाही का म्हणत त्यांनी पुरस्कार घेण्यास निकार दिला आणि आपले काम चालू ठेवले. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जगभरचे नॉलेज मिळावे म्हणून जगभरातील तज्ञ लोकांना व्हिडीओ कॉलद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना बोलायला लावणारे शंकर अंकुश, सोप्या पद्धतीने गुणाकार भागाकार करायला शिकवण्याची पद्धती शोधलेले अशोक नजाण आणि ज्या गावात साधा रस्ता नाही अशा गावातील शाळा देशाच्या नकाशावर आणणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जरेवाडीचे पवार सर हे पाहिले की मन प्रसन्न होते.

आपल्याला जर चांगला समाज आणि चांगले राष्ट्र उभारायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे जाणून आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे असे मला वाटते.