Prasad in Temple : आपल्याकडे कोणताही सण, समारंभ असला तर आधी देवाला नैवेद्य दाखवला जातो. आणि त्यानंतर त्या प्रसादाचं सर्व भक्तांमध्ये वाटप केलं जातं. अनेक मोठमोठ्या मंदिरांपासून (Temple) ते आपल्या घरापर्यंत हीच प्रथा, परंपरा चालत आलेली आहे. जे लोक देवपूजा करतात (पुजारी) ते सकाळचा नाश्ता, दुपारचं, रात्रीचं जेवण आधी देवाला दाखवतात नंतर ते स्वत: ग्रहण करतात.
बरं हा नैवेद्यसुद्धा देवाला आवडणारा दिला जातो. जसे की, गणपतीला मोदक, शंकराला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे देवाला आवडणारा नैवेद्य दाखवला तर देव प्रसन्न होतो अशी आपली श्रद्धा असते. पूजेत नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण, देवाला नैवेद्य नेमका का दिला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागची माहिती जाणून घ्या.
संत नामदेवांच्या गाथेत आहे उल्लेख
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भक्ताच्या अगाध भक्तीचा प्रतिध्वनी प्रभू स्वत:च खातात. ही संत नामदेवांगची पौराणिक गाथा आहे. नामदेवांच्या प्रखर भक्तीमुळे परमेश्वर प्रत्यक्ष प्रसाद खातो. त्यामुळे देव नैवेद्य खात नाहीत हा अनेकांचा जो समज आहे तो चुकीचा आहे असं म्हटलं जातं.
नैवेद्यात जास्त गोडवा येतो...
दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर त्यांच्यासमोर ठेवलेला नैवेद्य खातो यामुळे नैवेद्य कमी होत नाही. तर जास्त गोड आणि मधुर होतो. देव नैवेद्याला सूक्ष्म अंशाने चाखत असतो तेव्हाच देवासमोर ठेवण्यात आलेल्या पदार्थाला जास्तीत जास्त गोडवा असतो. घरामध्ये बनवलेला शीरा आणि सत्यनारायण देवाच्या पूजेच्या वेळी ठेवण्यात आलेला शीरा दोन्ही पदार्थाच्या दृष्टीने एकच आहे. पण, घरातील शीरा हा पदार्थ आहे तर पूजेचा शीरा प्रसाद आहे.
स्वभावात कृतज्ञता येते...
तिसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर खात नसला तरी नैवेद्य परमेश्वराला कृतज्ञतेने अर्पण करणाऱ्या भक्तामध्ये फार बदल घडून येतो. देवाप्रती असलेली कृतज्ञता भक्ताच्या जीवनात नम्रता आणते आणि या कृतज्ञतेमुळे किंवा नम्रतेमुळे त्याचे जीवन आनंदी होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :