Agriculture News :  टोमॅटोला (Tomato) चांगला बाजारभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फयदा होत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील कांबळवाडी येथील शेतकऱ्यांना टोमॅटोने लखपती केलं आहे. मागील चार वर्षात या टोमॅटो उत्पादकांचा झालेला तोटा यावर्षी शेतकऱ्यांनी भरुन काढल. यावर्षी टोमॅटोला विक्रमी भाव मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. साधारणपणे 2000 रुपये ते 4000 रुपये असा एका टोमॅटोच्या कॅरेटला भाव मिळालाय. त्यामुळं पुरंदर मधील छोट्याश्या कांबळवडीतील दोन शेतकरी लखपती झालेत. त्यांना आत्तापर्यंत एकरी 20 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.


कमी पावसामुळं टोमॅटोची आवक कमी, दरात वाढ


कांबळवाडी येथील शेतकरी अरविंद काळभोर यांनी मे महिन्यात साधारण सव्वा एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. यंदा पाऊस कमी आणि टोमॅटोची आवक कमी असल्याने त्यांना बाजारात चांगला भाव मिळाला आहे. काळभोर यांना आतापर्यंत 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर यापुढे त्यांना आणखी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. अरविंद काळभोर यांच्या बरोबरच स्वप्नील काळभोर या तरुणाला देखील टोमॅटोने लखपती केलं आहे. विशेष म्हणजे मागील चार ते पाच वर्षात त्याला याच पिकातून मोठा तोटा झाला होता. पण यावेळेस त्याला चांगला फायदा झालाय. त्याला आत्तापर्यंत 20 लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. 


दोघांनीही घेतला शासनाच्या शेततळ्याच्या योजनेचा लाभ


अरविंद काळभोर आणि स्वप्नील काळभोर या दोघांची जमीन डोंगराच्या आगदी कडेला आहे. त्यामुळं उन्हाळ्यात या भागात पाणीच नसते पण या दोघांनीही शासनाच्या शेततळ्याच्या योजनेचा लाभ घेतला आहे. आपल्या शेतात शेततळे तयार केले आहे. यातून ठिबक सिंचनचा वापर करून पाच एकर क्षेत्र बागायत केले. यावर्षीच्या मिळालेल्या टोमॅटोच्या उत्पन्नातून त्यांचा हा खर्च वसूल झाला आहे.


नेपाळमधून टोमॅटोची आयात


टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर सरकारने या भावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या नेपाळमधून टोमॅटोची आयात केली जात आहे. त्यामुळं आता टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.  त्यामुळं टोमॅटोचे भाव पडतात त्यावेळेस सरकार कुठे जाते? असा सवाल स्वप्नील काळभोर यांनी केला आहे.


शरद पवार साधणार शेतकऱ्यांशी संवाद 


कांबळवाडी येथील शेतकऱ्यांच्या या विक्रमी उत्पन्नाची दखल माजी कृषीमंत्री शरद पवार यांनीही घेतली आहे. 14 ऑगस्टला या शेतकऱ्यांनी शरद पवार यंची बारामतीतील गोविंद बागेत भेट घेऊन त्यांना शेतातील टोमॅटो वाणवळा म्हणून भेट दिली. शरद पवार हे 24 ऑगस्टला या कांबळवाडी येथील शेतकऱ्यांची संवाद साधणार असल्याची माहिती शेतकरी निखिल घाडगे यांनी दिली.


बाजारात टोमॅटोच्या किंमती कमी झाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी आपला माल रस्त्यावर फेकून दिला होता. तर काही दिवसांनी त्याच टोमॅटोमधून अनेक शेतकरी लखपती झाले. लखपती झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे. मार्केटच्या दर चढ आणि उताराचा फटका हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसतो. एकंदरीतच यावर्षी काही शेतकऱ्यांना टोमॅटोची लॉटरी लागलीय. मात्र, त्यांना यापूर्वी अनेकदा तोटा सहन करावा लागला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Tomato prices : महाराष्ट्रात टोमॅटोच्या दरात घसरण, प्रमुख बाजार समित्यांमध्ये आवक वाढली