PM Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जातात. आत्तापर्यंत 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 15 वा हफ्ता कधी मिळणार याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, 15 वा हफ्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना काही महत्वाची काम करावी लागणार आहेत. अन्यथा शेतकरी या हफ्त्यापासून वंचित राहू शकतात. 


पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना या चुका करू नका


तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, पत्ता आणि इतर माहिती अशी बरोबर द्या. चुकीची माहिती देऊ नका. अन्यथा तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता. तसेच तुमच्या बँक खात्याबाबत चुकीची माहिती देऊ नका. तुमचा खाते क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती चुकीची असली तरीही तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळं तुमची माहिती एकदा काळजीपूर्वक तपासा.


 ई-केवायसी लवकरात लवकर करुन घ्या


तुम्‍ही ई-केवायसी केली नसेल तर ती लवकरात लवकर करुन घ्या. ई-केवायसी लवकर न केल्यास  तुमचा हप्ता अडकू शकतो. नियमांनुसार, योजनेशी संबंधित प्रत्येक लाभार्थीसाठी हे आवश्यक आहे. म्हणून, तुम्ही अधिकृत शेतकरी पोर्टल pmkisan.gov.in वर भेट देऊन, तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा बँकेत जाऊन ते पूर्ण करू शकता.


दरम्यान, पीएम किसान सन्मान निधीचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांविरोधात सरकारने कारवाई तीव्र केल्याची बातमी समोर येत आहे. जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीदरम्यान, पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र लोकांकडून पैसे काढण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. पैसे परत न झाल्यास अशा लोकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


अडचण आल्यास कुठे संपर्क कराल?


पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर - 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.


सरकार निधीत वाढ करण्याची शक्यता 


2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Yojana) रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करुन मोदी सरकार महागाईने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. PM किसान योजनेची रक्कम सरकार 6000 रुपयावरुन 8000 रुपयांपर्यंत वाढवणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


'या' योजनेच्या निधीत सरकार करणार वाढ, दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 10000 रुपयांची मदत?