Padma Shri Farmers : कृषी क्षेत्रात (Agricultural Sector) बदल घडवणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना (Farmers) यावर्षी पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Awards) जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कारांचा घोषणा करण्यात आली. यामध्ये देशातील चार शेतकऱ्यांना देखील हा मानाचा सन्मान जाहीर झाला आहे. या शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. तसेच इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं सिक्कीम, ओडिशा, केरळ आणि हिमाचल प्रदेशमधील प्रत्येकी एका शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. 


पारंपारिक शेती आणि देशी बियाणांचे संवर्धन करत काही शेतकऱ्यांनी देशभरात नावलौकिक मिळवला आहे. तर काही शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपल्या यशोगाथा लिहल्या  आहेत. पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये  सिक्कीमचे 98 वर्षीय शेतकरी तुला राम उप्रेती यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर ओडिशाचे पतायत साहू, केरळचे चेरुवायल रमन आणि हिमाचल प्रदेशचे नेकराम शर्मा यांचा समावेश आहे. पाहुयात या चार शेतकऱ्यांच्या यशोगाथा...


 Tula Ram Upreti :  सिक्कीमचे तुला राम उप्रेती


आज सिक्कीम (Sikkim) हे संपूर्ण जगात एक सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून उदयास येत आहे. सिक्कीमच्या सेंद्रिय उत्पादनांना देश-विदेशात विशेषात मोठी मागणी आहे. येथील उत्पादनांनी मोठी ओळख निर्माण केली आहे. याचे संपूर्ण श्रेय सिक्कीमच्या शेतकऱ्यांना जाते. येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीद्वारे पर्यावरण आणि आरोग्याचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिक्कीमचे 98 वर्षीय शेतकरी तुला राम उप्रेती हे देखील अशा शेतकर्‍यांपैकी आहेत, की ज्यांनी बालपणापासून आपले संपूर्ण आयुष्य सेंद्रिय शेतीसाठी समर्पित केले आहे. इतर शेतकऱ्यांना देखील त्यांनी सेंद्रिय शेती-नैसर्गिक शेती करण्याचे मार्गदर्शन केलं आहे. तुला राम उप्रेती यांनी आयुष्यभर पारंपारिक पद्धतीने सेंद्रिय शेती करुन नाव कमावले आहे. आजच्या युगात जिथे शेतकरी सेंद्रिय शेती करण्यास टाळाटाळ केली जाते, तिथे तुला राम उप्रेती यांच्यासारखे शेतकरी प्रेरणास्त्रोत आहेत.


Patayat Sahu : ओडिशाचे पटायत साहू


काही शेतकरी अनेक दशकांपासून औषधी वनस्पतींचे उत्पादन घेत आहेत. शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. या शेतकऱ्यांमध्ये ओडिशाच्या (Odisha) पटायत साहू यांचाही समावेश आहे. साहू यांनी केवळ दीड एकर जमिनीत 3 हजाराहून अधिक आयुर्वेदीक औषधांची निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी त्यांचे अनुभव सांगणारे लेखही प्रकाशित केले आहेत. विशेष म्हणजे साहू यांनी कोणत्याही रसायनाशिवाय औषधांची निर्मिती केली आहे. त्यांचे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.


Cheruvayal Raman : केरळचे चेरुवयल रामण


आज भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तांदूळ उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. तांदळाचे प्रगत संकरित वाण आज देशात प्रचलित झाले असले तरी औषधी, हवामान बदलांना प्रतिरोधक आणि विशेष देशी भाताचे वाण अनेक शतकांपासून अस्तित्वात आहेत. यातील अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. केरळच्या (kerala) चेरुवयल रामण हे गेल्या अनेक वर्षांपासून तांदळाच्या देशी प्रजातींचे संवर्धन करत आहेत. त्यांनी तांदळाच्या 54 देशी वाणांचे संवर्धन केलं केलं आहे. चेरुवयल रामण यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशी बियाणांच्या संवर्धनासाठी समर्पित केलं आहे.


 Nekram Sharm : हिमाचल प्रदेशचे नेकराम शर्मा


हिमाचल प्रदेशचे ( Himachal Pradesh)  नेकराम शर्मा यांना देशी धान्यांचे रक्षणकर्ता असं म्हटलं जातं. कारण शर्मा यांनी गेल्या 30 वर्षांपासून 40 अनोख्या धान्यांच्या वाणांचं संवर्धन केलं. नेकराम शर्मा यांनी 'नऊ धान्य' पारंपरिक पीक पद्धतीचे पुनरुज्जीवन केलं आहे. आजच्या आधुनिक युगात जिथे शेतकरी नवीन तंत्रे आणि संकरित बियाणांच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्यावर भर देतात. तिथे निसर्गाचं संवर्धन करुन पारंपरिक पद्धतीनं नेकराम शर्मा यांनी देशी बियाणांचं संवर्धन केलं आहे.



बीजमाता राहीबाई पोपेरे यांना 2020 साली पद्मश्री पुरस्कार


महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांच्या कामाचीही केंद्र सरकारने दखल घेतली होती. त्यांना 2020 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी कठीण परिस्थितीत  आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक सुरु केली आहे.  त्यांनी शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन केलं आहे. त्यांच्या या कामाचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Padma Award 2023: ORS चे दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, झाडीपट्टी रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री