Onion Price : सध्या देशात टोमॅटोची लाली वाढल्याचं चित्र दिसत आहे. बाजारत टोमॅटोचे दर हे 150 ते  200 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. यानंतर आता कांद्याच्या दरात (Onion Price) देखील वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे. 


व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या किंमतीत जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे कांद्याचे दर हे 55 ते 60 रुपये प्रति किलोवर जातील, अी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. देशात सध्या कांद्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, बराचसा कांदा खराब झाला आहे. त्यामुळं चांगल्या प्रतीचा कांदा महाग होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये कांद्याचे घाऊक भाव 5 रुपये प्रति किलो ते 24 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 25 ते 35 रुपये प्रति किलो वर गेले आहेत. 


बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला फटका


दरम्यान, बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक भागात झालेल्या पावसाचाही पिकावर परिणाम झाला आहे. तसेच काही भागात साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब देखील झाला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दर नसल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडून गेला. बाजारात कांदा विकायला नेणं देखील परवड नसल्यामुळं शेतकऱ्यांनी कांदा देखील काढला नव्हता. दरम्यान, सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा आता हळूहळू कमी होत आहे. साठा करुन ठेवलेला कांदा पुढील महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढणार आहेत. 


ज्या शेतकऱ्यांकडे कांदा त्यांना फायदा होणार


गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचा दर हे स्थिर होते. मात्र, सध्या कांद्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी कांदा मार्केटमध्ये दरवाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 15 ते 20 रुपये किलोनं मिळणारा कांदा आज 30 रुपये किलोपर्यंत गेला आहे. दरम्यान, सध्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे., त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik News : 'साठवला तर सडू लागला, विकायला काढला तर भाव नाही', नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी हतबल