Amit Shah : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी मोदी सरकार (Modi Government)  कटिबद्ध असल्याचे वक्तव्य देशाचे सहकार आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलं. केवळ सहकाराचे मॉडेलच अल्पभूधारक शेतकऱ्यांना विपणन आणि उत्तम बाजार व्यवस्था देऊ शकते असेही शाह म्हणाले. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ म्हणजेच  नाफेडतर्फे भोपाळमध्ये 'कृषी विपणनातील सहकारी संस्थांची भूमिका' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी अमित शाह बोलत होते.


एक हजाराहून कृषी उत्पन्न बाजार समित्या  ई-नाम पोर्टलवर जोडल्या


सहकार मंत्रालय स्थापन होण्यापूर्वीच  पंतप्रधान नरेद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी कृषी उत्पादनांच्या विपणनामध्ये अत्याधुनिक प्रणाली आणण्यासाठी अनेक पावले उचलल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM) हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ई-नाम पोर्टलवर आतापर्यंत 2 लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेली दिली. 18 राज्यातील एक हजाराहून कृषी उत्पन्न बाजार समित्या  ई-नाम पोर्टलवर जोडल्या गेल्या आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. 


मजबूत विपणन व्यवस्था निर्माण होण्याची गरज


देशात कृषी क्षेत्रात एक मजबूत विपणन व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. नाफेडबरोबर राज्य, जिल्हा आणि तहसील यांना देखील विपणन व्यवस्थेली जोडावं लागणार असल्याचे अमित शाह म्हणाले. एक वेगळं मॉडेल आपल्याला तयार करावं लागणार असल्याचे शाह म्हणाले. मोदी सरकार प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) बहुउद्देशीय बनवत आहे. PACS ते APEX पर्यंत मजबूत विपणन प्रणालीसाठी लवकरच एक मॉडेल कायदा आणला जाईल अशी माहिती देखील शाह यांनी दिली. 


अन्नधान्य उत्पादन 314 दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त


आपला देश डाळी आणि तेलबिया वगळता इतर उत्पादनांच्या बाबतीत स्वावलंबी झाला आहे. गेल्या 8 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बरीच ठोस कामं सरकारनं केली असल्याचे शाह यांनी सांगितले. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतमालाला किमान आधारभूत किंमत (MSP) देण्याचे काम मोदीजींनी केले आहे,. ज्याचा फायदा देशातील करोडो शेतकऱ्यांना झाला आहे. देशातील अन्नधान्य उत्पादन 314 दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त झाले आहे. कृषी उत्पादनांचे विपणन सुव्यवस्थित आणि आधुनिक करण्यासाठी अनेक कामे केली गेली आहेत. त्यातील मुख्य म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजार हे महत्वाचे व्यासपीठ असल्याचे ते म्हणाले. भारताच्या कृषी निर्यातीने 50 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे, ही कृषी आणि सहकार क्षेत्रासाठी मोठी गोष्ट असल्याचेही अमित शाह यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: