Unseasonal Rain : पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7  मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल. शिवाय आज देखील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


Unseasonal Rain : नाशिकसह धुळे बुलढाणा आणि पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस


दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज नाशिकसह धुळे बुलढाणा आणि पालघर जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात आणि परिसरात मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात बदल झाला असून ढगाळ वातावरण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे मका, पपई, केळी आणि उशिरा लावलेल्या गहू, हरभरा या पिकांवर काही प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Unseasonal Rain :  पिकांना फटका


या अवकाळी पावसाचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. या पावसामुळं काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळं पिकांवर रोग पडण्याची शक्यता देखील आहे. तसेच फळबागांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा, पपई यांसारख्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.  


पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं आंबा पिकासह रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.  पालघर जिल्ह्याच्या पूर्वेच्या विक्रमगड, वाड्यासह काही भागात अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने आज हजेरी लावली.  


शेतकऱ्यांची रब्बी पिकांची काढणी सुरु केली आहे. यामध्ये तुर, हरभरा, वाल पिकाची काढणी सुरु आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्यानं शेतकऱ्यांची तारंबळ उडाली आहे.