Solapur Rain : राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्याला देखील या अवकाळीचा मोठ फटका बसला आहे. या पावसामुळं आठ तालुक्यातील 104 गावांना मोठा फटका बसला आहे. या 104 गावातील सुमारे 3469 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे. 


अवकाळी पावसाचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, आंबा, पपई, ज्वारी, गहू, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हा कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राची पाहणी करुन पंचनामे करण्यास सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.


मालवंडीतील शेतकऱ्याची द्राक्ष बाग कोसळून 15 लाखांचे नुकसान


सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बार्शी तालुक्याला देखील बसला आहे. बार्शीतील मालवंडी येथील येथील शेतकरी जनार्दन थोरात या शेतकर्‍याची द्राक्ष बाग कोसळून सुमारे 15  लाखांचे नुकसान झाले आहे. यासह झाडी बोरगाव, तांबेवाडी या गावातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्यानं द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बाग पूर्णपणे तयार झाली होती. काही दिवसात पीक बाजारात येणार होते. मात्र, वादळी वारा आणि अवकाळी पावसानं हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.


राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी


राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सोलापूरसह, नांदेड, वाशिम, परभणी, लातूर,  हिंगोली, जळगाव या जिल्ह्यात पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. या पावसामुळं ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज, खरबूज यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच केळी, द्राक्ष आंब्याच्या बागांनाही या पावसाचा आणि गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. आणखी दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nandurbar News : अवकाळीमुळं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मिरचीला मोठा फटका, नुकसान भरपाई देण्याची मागणी