मुंबई  : राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप काही जिल्ह्यामध्ये ऊस शिल्लक आहे. त्यानंतर  शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील, असे निर्देश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले आहे. 1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी 200 रुपये प्रति टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.


शेतकऱ्यांच्या  हितासाठी  1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.


यामुळे सुमारे  100 कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार असून राज्यात 1  मे 2022  नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे 52 लाख टन गाळप अपेक्षित आहे. यापैकी आजअखेर 32 लाख टन गाळप झाले आहे. तसेच 1  मे 2022 नंतर गाळप होणाऱ्या व 50  किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या साखर आयुक्तांनी अनिवार्य ऊस आदेश काढलेल्या ऊसास प्रतीटन पाच रुपये प्रती किलोमीटर वाहतूक अनुदान देण्यात येणार आहे. 


  गाळप हंगाम  2021-22 मध्ये राज्यात एकूण 13.67  लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. 2020-21- मध्ये 11.42 लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते. मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. तसेच 16 मे 2022 अखेर 100 सहकारी व 99 खासगी असे 199 साखर कारखान्यांकडून 1300.62 लाख टन ऊस गाळप झालेले आहे. मागील वर्षापेक्षा सुमारे 55, 920  टन प्रतीदिन जास्त गाळप क्षमतेने गाळप होत आहे. मागील वर्षी या वेळेस 1013.31 लाख टन गाळप झालेले होते. चालू वर्षी 287.31 लाख टन गाळप जास्त झालेले आहे. बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.