Ravikant Tupakr : जोपर्यंत सोयाबीन (Soybean) आणि कापसाला (Cotton) दर मिळत नाही. पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला. फासावर जाण्याची वेळ झाली तरी चालेल पण आता मागे हटणार नसल्याचे ते म्हणाले. आज (16 फेब्रुवारी) सकाळी रविकांत तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांची अकोला कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून टीका देखील केली.


सरकार गेंड्याच्या कातडीचे, जेलमध्ये टाकून आम्ही घाबरणार नाही


पोलिसांनी आम्हला नक्षलवाद्यांसारखी वागणूक दिली. आम्ही काय मागतोय कापूस आणि सोयाबीनला दर मागतोय. पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाई मागतो. परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. जेलमध्ये टाकून आम्ही घाबरणार नाही. जोपर्यंत सोयाबीन आणि कापसाला दर मिळत नाही, पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरुच राहणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आता एकजूट झाला आहे. मस्तवाल पुढाऱ्यांना शेतकरी आता जागा दाखवेल असा इशारा तुपकरांनी दिला आहे. जे लोक आंदोलनात नव्हते त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पुढचं आंदोलन 'आर या पार'चं असणार 


दरम्यान पुढची आपली दिशा काय असेल असेही तुपकरांना प्रसारमाध्यमांनी विचारले त्यावेळी ते म्हणाले की, "आता बुलढाण्यात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. पुढचं आंदोलन आर या पारचं असणार आहे. आता मागे हटणार नाही." पुढचं आंदोलन हे सरकारच्या बुडाखाली आग लावणार असेल असा इशारा तुपकरांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शहीद भगतसिंग आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांचा आदर्श आमच्यासमोर असल्याचे तुपकर म्हणाले.


11 फेब्रुवारीला रविकांत तुपकरांसह कार्यकर्त्यांना केली होती अटक


11 फेब्रुवारीला रविकांत तुपकरांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर रविकांत तुपकर यांच्यासह 40 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यातील रविकांत तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या सर्वांची रवानगी अकोला कारागृहात करण्यात आली होती. अखेर आज या सर्वांची सुटका करण्यात आली. त्यानंतर रविकांत तुपकरांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ravikant Tupakr : रविकांत तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांची सुटका, कारागृहाबाहेर आई आणि पत्नीनं केलं औक्षण