Ratnagiri: हापूस! आपल्यापैकी अनेकांना आवडणारा आणि कोकणची ओळख बनलेला हा आंबा जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा हाच हापूस कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठं संकट घेऊन आला आहे. शेतकऱ्यांच्या मते यंदा केवळ 20 टक्केच हापूस उत्पादन होणार आहे. त्यामुळे केवळ आंबा उत्पादकच नाही तर हापूसशी संबंधित सर्व पूरक व्यवसायांवरही मोठा परिणाम होताना दिसतोय. वातावरणातील लहरीपणाचा फटका बसल्याने हापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे भरडला गेलाय. (Kokan Alphanso)

Continues below advertisement

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट

“यंदा जगायचं कसं? आणि जगवायचं कसं?” असा मोठा प्रश्न कोकणातील बागायतदारांसमोर उभा ठाकलाय. वातावरणातील बदलांमुळे हापूस उत्पादन घटलं असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आनंद देसाई यांच्यासारखे अनेक शेतकरी या संकटातून जात आहेत. वडिलोपार्जित हापूस बागा आणि कॅनिंग व्यवसाय सांभाळणाऱ्या देसाईंचं म्हणणं आहे की, यंदाची परिस्थिती अभूतपूर्व आहे.

हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हापूसची लागवड केली जाते. काही जाणकारांच्या मते, हापूस आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायातून सुमारे 2500 कोटी रुपयांची उलाढाल होते. रत्नागिरीत सुमारे 1.20 लाख हेक्टर, सिंधुदुर्गात 34 ते 35 हजार हेक्टर आणि रायगडमध्ये 11 ते 12 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे.

Continues below advertisement

मात्र, यंदा उत्पादन घटल्यामुळे ट्रान्सपोर्ट, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, गवत, पेट्यांसाठी लाकूड, मजूर, गाड्या अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. निरूळ गावातील स्वरूप गांगण यांसारखे हापूस वाहतूकदारही या संकटामुळे अडचणीत आले आहेत.

मजूर आणि कर्जाचा प्रश्न

कोकणात हापूसच्या हंगामात नेपाळमधून मोठ्या प्रमाणावर मजूर येतात. स्थानिक मजुरांनाही काम मिळतं. मात्र, यंदा उत्पादन घटल्यामुळे मजुरांना काम देणं आणि त्यांचे पगार देणं शेतकऱ्यांसाठी कठीण झालं आहे. अनेक शेतकऱ्यांवर आधीच लाखोंचं कर्ज असून त्यातून बाहेर पडण्याची चिंता वाढली आहे.

या अस्मानी संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शनाची मागणी केली आहे. औषध फवारणी आणि शेती व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाकडून यावर मार्गदर्शन मिळण्याची शेतकरी वाट पाहत आहेत.

निसर्गाचा फटका, शेतकरी हतबल

जगभरात कोकणच्या हापूसची ख्याती...पण, यंदा मात्र निसर्गाची वक्रदृष्टी त्याच्यावर पडलीय...निसर्गाच्या लहरीपणाच्या या चक्रात असलेला हापूस आणि त्यात भरडणारा कोकणातील शेतकरी यांची स्थिती यंदा मात्र बिकट आहे...त्यामुळे आता जगायचं कसं? आणि जगवायचं कसं? हाच सवाल उरात घेऊन कोकणातील शेतकरी परिस्थितीशी लढतोय....