अमरावती :  दोन देशातील वादाचा फटका विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना  बसत आहे. आधी बांगलादेशातून (Bangladesh) येणाऱ्या कांद्यावर भारताने (India) कांद्यावर निर्यात शुल्क वाढवले. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याच्या बदल्यात बांगलादेशाने संत्रावर निर्यात शुल्कात प्रचंड मोठी वाढ केली. ज्याचा थेट फटका विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) बसला आहे.


वरुड-मोर्शी तालुका ड्राय झोनमध्ये  असला तरी संत्रा उत्पादक शेतकरी जिवाचे रान करत संत्रा फळ बागा वाचवत राहिला. चांगलं उत्पादन निर्माण होवून सुद्धा योग्य बाजार भाव आणि बाजारपेठ नसल्याने आज संत्रा उत्पादक संकटात आला आहे. बांगलादेश देशात मोठी बाजार पेठ संत्रा करीता तयार झाली आहे. मात्र, आयात शुल्क शेकडो पटीने वाढवल्याने व्यापाऱ्यांना बांगलादेशची संत्रा बाजारपेठ परवडत नाही. यामुळे बांगलादेशमध्ये जाणारा लाखो टन संत्रा विदर्भात पडला आहे. संकटात सापडलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आज आंदोलन पुकारले. संत्र्यांचे कॅरेट घेऊन आंदोलक शेतकरी उपविभागीय कार्यालयात दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना घोषणाबाजी केली. 


विदर्भातील मुख्य आर्थीक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांपैकी संत्रा हे एक फळपिक आहे. परंतू, बदलते हवामान आणि दरवर्षी होणारी फळगळती त्यामुळं संत्रा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीचा सामना करत आहेत. त्यातच आता बांग्लादेश सरकारनं संत्रा पिकावर आयात शुल्क वाढवल्याने संत्रा निर्यात जवळपास बंद झाली आहे. विदर्भातील संत्र्याकरीता बांगलादेश हा एकमेव आयात करणारा देश आहे. संत्रानिर्यात झाल्यास स्थानीक बाजारपेठेत शेतकऱ्यांना संत्र्याला बऱ्यापैकी दर मिळतात परंतु आता जवळपास निर्यात बंद झाल्याने स्थानीक बाजारपेठेत सुध्दा संत्र्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले आहे. हवामानातील बदल दरवर्षी वाढती फळगळ, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ त्यामुळे आधीच संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. 


'प्रहार'चेही आंदोलन 


संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन  माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रहार संघटनेच्यावतीने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या सख्येनं कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.


संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याकरीता उस उत्पादक शेतकन्यांच्या साखर निर्यतीला देत असलेल्या निर्यातीकरीता अनुदानाच्या धर्तीवर संत्रा निर्यातीकरीता अनुदान दयावे. हीच मागणी घेऊन आज प्रहार संघटनेने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची चांगलीच बाचाबाची झाली. अखेर पाच जणांना आतमध्ये सोडण्यात आले पण जिल्हाधिकारी यांनी आमच्याशी उद्धतपणेने वागणून दिल्याचं आरोप प्रहार आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलतांना केला.