Animal Husbandry News : सेंद्रिय व विषमुक्त दुध निर्मिती टप्प्यातील प्रश्नाबाबत सविस्तर अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा राज्याचे दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केली. तसेच याबाबतचा अहवाल शासनाला तत्काळ दाखल करण्याची सुचनानाही केदार यांनी केली आहे.  महा ऑरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन अर्थात मोर्फाच्या पुढाकारातून मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही निर्णय घेण्यात आला. 


दरम्यान, माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या आठवड्यात सह्याद्री अतिथीगृहात मोर्फासोबत पाच विभागाची बैठक पार पडली होती. त्यावेळी शरद पवार यांनी सेंद्रिय व विषमुक्त शेतीबाबतचे विषय मार्गी लावण्याची सुचना उपस्थित सर्व मंत्र्यांना केली होती. त्यानुसार पशुसंर्धन मंत्री सुनिल केदार यांनी तत्काळ मोर्फाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, पशुसंर्धन विभागाचे सहसंचालक माणिक गुट्टे, कृषी विभागाचे उपसचिव, ह. गो. म्हपणकर,,दुग्धविकास विभागाच्या अप्पर सचिव शामबाला दबडे, पशुसंर्धन उपायुक्त डॉ. शैलेश केंडे, दुग्ध विकास अधिकारी एस आर शिरपूरक, डॉ. रविंद्र सावंत, मोर्फाचे संजय देशमुख, अमरजित जगताप, कैलास जाधव, डॉ. किशोर मठपती, डॉ. सोमनाथ माने, आरे कॉलनीचे CEO रविंद्र पवार उपस्थित होते.



बैठकीत झालेले निर्णय


1. विषमुक्त व सेंद्रिय दुग्ध निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या अडचणी व विभागाने करायाचे काम करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना
2. महानंद व आरेच्या जागा सेंद्रिय व विषमुक्त दूध विक्रीसाठी शेतकरी व गटांना देण्याचा निर्णय
3. पशुसंर्धन विभाग योजनांची माहिती शेतकऱ्यांना कळण्यासाठी ॲप बनवणार




या बैठकीत ॲन्टोबायोटिक फ्री दुग्ध उत्पादन वाढवणे, A1 व A2 मिल्क दुधाबाबातचा फरक समजून ग्राहकांची फसवणूक थांबवणे, कायदेशीर नियम बनवणे, सेंद्रिय व विषमुक्त चिकन व अंडी निर्मितीबाबत नियम बनवणे बाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विषमुक्त व सेंद्रिय दुध निर्मितीसाठी 10, 20, 50 व 100 गोठ्यांची निर्मिती करण्याची योजना अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार शासन अंमलात आणणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले. मोर्फाच्या वतीनं महानंद व आरेच्या मुंबई व पुण्यातील दुकानातून विषमुक्त व सेंद्रिय दुध विक्री करण्याची मागणी मंत्री केदार यांना केली. यावेळी ही मागणी तत्काळ मान्य करुन तशी कार्यवाही कराण्याच्या सुचना केदार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच पशुपालकांना विभागाच्या योजना, लसीकरण व मार्गदर्शन मिळण्यासाठी लवकरात लवकर ॲप बनवावे अशा सुचनाही केदार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


समाजाला सुरक्षित दुधाची निर्मिती करुन देणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत शासनाने सावध पावले टाकून विषमुक्त व सेंद्रिय दूध निर्मितीसाठी पुढाकार घेतला तर पुढील पिढी सुरक्षित राहणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक अतिशय सकारात्मक झाल्याची माहिती मार्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी दिली. तर नवीन पिढीला दुग्ध व्यवसायात आणण्यासाठी व उत्पादन होणारे दुध आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित निर्मिती करण्यासाठी तरुणांना मार्गदर्शनाची गरज आहे, यासाठी शासनाने लवकर पावले उचलावीत अशी माहिती त्रिमुर्ती डेअरीचे संचालक डॉ. रविंद्र सांवत यांनी दिली.