Dadaji Bhuse : कृषी क्षेत्राचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी विचारात घेत पिकांचे वाण विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी केलं. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 107 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. 


कृषी विद्यापीठातून विद्यार्थ्यांना देण्यात येणारं शिक्षण रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देणारं असावं. त्यादृष्टीनं अभ्यासक्रमाची आखणी करण्यात यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण पर्यटन प्रकल्प, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही भुसे म्हणाले.
 
बाजाराच्या मागणीप्रमाणं पीक पद्धती विकसित करावी


आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन संशोधन करुन कृषी विद्यापीठाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. 'विकेल ते पिकेल' या अभियानानुसार बाजाराच्या मागणीप्रमाणं पीक पद्धती विकसित करावी. तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन स्थानिक पीक पद्धती विकसित करण्यासाठी काम करावं. सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी त्याबाबत संशोधन करुन सेंद्रीय प्रमाणिकरण अभ्यासक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु करावं, असेही भुसे यांनी सांगितलं. 


आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा


संत्रा, मोसंबी या फळापासून निर्मिती होणारे ज्यूस जास्त काळ कसे टिकवून ठेवता येईल याबाबत संशोधन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार पद्धतीचे रोप उपलब्ध करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. आजपर्यंत एकूण 28 वाणांना भौगोलिक मानांकन मिळालं असून, त्यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भौगोलिक मानांकन मिळालेल्या वाणांचे जतन व संवर्धन करावे असेही भुसे म्हणाले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती 1 जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहेत. तसेच कृषी सप्ताह साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असे आवाहन दादाजी भुसे यांनी केलं.  


मान्सूनचा अंदाज घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं


कृषी विभागाच्यावतीने मान्सूनचा अंदाज घेवून शेतकऱ्यांना वेळोवेळी पेरणीबाबत मार्गदर्शन करावे. पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी न करण्याबाबत कृषी विभागाच्या मदतीने आपल्यास्तरावरुन आवाहन करावे. बियाणे, रासायनिक खते, निविष्ठाबाबत वेळोवेळी आढावा घेवून त्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. आपल्याला याबाबत कुठेही गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी, असेही भुसेंनी यावेळी सांगितलं.


उत्पादन वाढवण्यासाठी उत्तम मॉडेल तयार करण्याच्या सूचना


राज्यात सोयाबीन आणि कापूस या पिकांची 60 टक्के क्षेत्रात लागवड केली जाते. या पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी उत्तम मॉडेल तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी विभाग काम करत आहे. एकूणच शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन स्तरावरुन विविध प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. 


या बैठकीला उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, राज्यपाल नियुक्त सदस्य कृष्णा लव्हेकर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषी परिषदेचे अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखेडे, अर्चना पानसरे, महासंचालक रावसाहेब भागडे आदी उपस्थित होते. 


महत्वाच्या बातम्या: